नवी मुंबई महापालिका प्रारुप मतदार याद्यांमधे नावांची हेराफेरी, आशिष शेलार यांचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप

| Updated on: Feb 23, 2021 | 6:35 PM

नवी मुंबई महापालिका निवडणुकीचं बिगूल वाजण्याआधीच राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत (BJP MLA Ashish Shelar allegations on Maha Vikas Aghadi).

नवी मुंबई महापालिका प्रारुप मतदार याद्यांमधे नावांची हेराफेरी, आशिष शेलार यांचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप
Follow us on

मुंबई :  नवी मुंबई महापालिका निवडणुकीचं बिगूल वाजण्याआधीच राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. “नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रारुप मतदार याद्यांमधे मोठ्या प्रमाणावर हेराफेरी, बनवाबनवी करण्यात आली आहे. मंत्रालयात केबीनमध्ये बसून हे केले जात आहे. अशाप्रकारे सत्तेचा गैरवापर सुरु आहे”, असा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे. आशिष शेलार यांनी आज (23 फेब्रुवारी) भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन नवी मुंबईतील मतदार यादीत हेराफेरी होत असल्याचा दावा केला (BJP MLA Ashish Shelar allegations on Maha Vikas Aghadi).

न्यायालयात दाद मागू, शेलारांचा इशारा

“शिवसेनेच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारने आजपर्यंत उमेदवारांची पळवापळवी केली. त्यानंतर आता मतदार पळवापळवीचा अनोखा कार्यक्रम सुरु केला आहे. त्याबाबत अधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले तर ते स्वीकारले जात नाही. त्यामुळे जर याबाबत आमच्या तक्रारीची दखल घेतली नाही. 3 मार्चपर्यंत जर कायदेशीर मार्गाने बदल केले नाही तर आम्ही न्यायालयात दाद मागू”, असा इशारा आशिष शेलार यांनी दिला (BJP MLA Ashish Shelar allegations on Maha Vikas Aghadi).

‘एसआयटी मार्फत चौकशी व्हावी’

“सोसायटी आणि चाळीतील नावे दुसरीकडे घेऊन जाणे म्हणजे मतदार पसार करणे सुरु आहे. दुसरा प्रकार म्हणजे अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवायला गेल्यावर तक्रार घेतली जात नाही. म्हणजे हा कामचुकारपणा आहे. अनेक ठिकाणी मतदार यादीतील घोळ पाहता याद्याच टूकार आहेत. म्हणजे त्यांनी एकप्रकारे मतदारांच्या अधिकारालाच नकार दिला असल्याचे चित्र आहे. मंत्रालयात एसी केबीनमध्ये बसून हे सारे केले जात आहे. याची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी”, अशी मागणी आमदार शेलार यांनी केली.

भाजपच्या दाव्यानुसार नेमकं काय घडलंय नवी मुंबईत?

“नवी मुंबईत 111 प्रभागात एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात नावे स्थलांतरीत करण्यात आली आहेत. जो व्यक्ती ज्या प्रभागात राहतो तसेच त्याने गत निवडणुकीमध्ये त्या प्रभागामध्ये मतदान केले आहे, अशा व्यक्तींची नावे इतर प्रभागातील मतदार याद्यांमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. प्रभागरचनेनुसार ज्या प्रभागात सोसायट्या / चाळी येतात त्या सोसायट्या आणि चाळीमधील मतदारांची नावे इतर प्रभागात टाकण्यात आली आहेत”, असा दावा आशिष शेलार यांनी केला आहे.

हेही वाचा : मंत्र्याला वाचवण्यासाठी मंत्रालयाच्या 6 व्या मजल्यातील केबिनमध्ये दडलंय काय?, आशिष शेलार यांचा सवाल