भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाचा निर्णय ठाकरे सरकारनं का घेतला? जाणून घ्या राजकीय विश्लेषकांचं मत

| Updated on: Jul 05, 2021 | 10:49 PM

भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. मात्र, पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजप आमदारांचं निलंबन का करण्यात आलं? ते ही 12 आमदारांचंच निलंबन का? अशा प्रश्नांची उत्तरं देताना ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान यांनी महत्वाचे मुद्दे मांडले आहेत.

भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाचा निर्णय ठाकरे सरकारनं का घेतला? जाणून घ्या राजकीय विश्लेषकांचं मत
भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन
Follow us on

मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ओबीसी आरक्षणासंदर्भातील ठरावावरुन झालेल्या गदारोळानंतर भाजपच्या 12 आमदारांचं 1 वर्षासाठी निलंबन करण्यात आलंय. विधानसभा अध्यक्षांसमोरील हौदात उतरुन सत्ताधारी आणि भाजपच्या आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली. तसंच विधानसभा अध्यक्षांच्या दालनात आपल्याला धक्काबुक्की आणि शिवीगाळ झाल्याचा आरोप तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी केलाय. या प्रकारानंतर भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. मात्र, पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजप आमदारांचं निलंबन का करण्यात आलं? ते ही 12 आमदारांचंच निलंबन का? अशा प्रश्नांची उत्तरं देताना ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान यांनी महत्वाचे मुद्दे मांडले आहेत. (Why the suspension of 12 BJP MLAs from Thackeray government?)

विधानसभा अध्यक्ष निवडणूक

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची मागणी सत्ताधारी महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या काँग्रेसकडून करण्यात येत आहे. भाजपनेही या निवडणुकीवरुन आक्रमक पवित्रा घेतला आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक ही गुप्त मतदान पद्धतीद्वारे घेण्याचा प्रघात आहे. अशावेळी आपल्यातील काही आमदार फुटून भाजपच्या बाजूने मतदान करण्याची भीती सरकारला असावी किंवा भाजप आपल्या काही आमदारांना मतदानासाठी गळाला लावण्याची भीती सत्ताधाऱ्यांना असावी, त्यामुळे त्यांनी भाजपचं संख्याबळ कमी करण्याचा प्रयत्न या निलंबनाद्वारे केला असावा, असं मत संदीप प्रधान यांनी व्यक्त केलंय.

दुसरीकडे आवाजी मतदानाने जरी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक झाली तरी निलंबन झालेले आमदार हे सर्वजण आक्रमक प्रतिमा असलेले आहेत. त्यामुळे त्यातही कुठला अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी या ठराविक 12 आमदारांचं निलंबन करण्यात आलं असेल, असंही संदीप प्रधान म्हणाले.

12 आमदारांच्या रखडलेल्या नियुक्तीला उत्तर

एकीकडे विधानसभा अध्यक्ष निवडणूक हे एक कारण असण्याची शक्यता आहे. पण दुसरीकडे विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची नियुक्ती गेल्या 6 महिन्यापेक्षा अधिक काळापासून रखडलेली आहे. अशावेळी भाजपला उत्तर म्हणून भाजपच्याही 12 आमदारांचं एक वर्षासाठी निलंबन करण्यात आलं असावं, असंही संदीप प्रधान यांनी म्हटलंय.

भाजपच्या कोणत्या आमदारांचं निलंबन?

ओबीसी आरक्षणावरील ठरावावर चर्चा सुरू असताना राजदंड उचलणे, माईक ओढणे आणि सभागृह अध्यक्षांना शिवीगाळ केल्याप्रकरणी आज एकूण 12 सदस्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. आशिष शेलार, योगेश सागर, अभिमन्यू पवार, संजय कुटे, अतुल भातखळकर, पराग अळवणी, गिरीश महाजन, राम सातपुते, हरीश पिंपळे, नारायण कुचे, जयकुमार रावत किर्तीकुमार बागडीया आदी आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आलं आहे. या वर्षभरात त्यांना मुंबई आणि नागपूर येथील अधिवेशनात सामिल होण्यास मज्जाव करण्यात आला आहे. संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी ही माहिती आज विधानसभेत दिली.

संबंधित बातम्या :

तालिका अध्यक्ष म्हणून भास्कर जाधव यांचं नाव डांबराने लिहिलं जाईल, अतुल भातखळकरांचा घणाघात

Video : विधानसभेत तुफान राडा! अध्यक्षांच्या दालनात नेमकं काय घडलं? भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन का?

Why the suspension of 12 BJP MLAs from Thackeray government?