खडसेंच्या बालेकिल्ल्यातील भाजपच्या पक्षबांधणी बैठकीचा उडाला फज्जा; कार्यकर्त्यांनी फिरवली पाठ

| Updated on: Oct 29, 2020 | 6:11 PM

एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशानंतर मुक्ताईनगर भुसावळ, रावेर याठिकाणी भाजपकडून बैठका घेण्यात आल्या. | Eknath Khadse BJP

खडसेंच्या बालेकिल्ल्यातील भाजपच्या पक्षबांधणी बैठकीचा उडाला फज्जा; कार्यकर्त्यांनी फिरवली पाठ
Follow us on

जळगाव: एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तरी भाजपला काही फरक पडणार नाही. जळगावात आमच्याकडे एकनाथ खडसे यांची उणीव भरून काढणारे नेते आहेत, ही भाजप नेत्यांची वक्तव्ये कागदावरच खरी ठरताना दिसू लागली आहेत. कारण, एकनाथ खडसे यांचा बालेकिल्ला असलेल्या मुक्ताईनगरमध्ये पक्षबांधणीसाठी आयोजित केलेल्या बैठकीकडे नेते आणि कार्यकर्त्यांना पाठ फिरवल्याचा प्रकार समोर आला आहे. (BJP meet in Jalgaon muktainagar)

एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशानंतर मुक्ताईनगर भुसावळ, रावेर याठिकाणी भाजपकडून बैठका घेण्यात आल्या. गुरुवारी मुक्ताईनगरमध्ये प्रथमच भाजपकडून पक्षबांधणीसाठी बैठक बोलावण्यात आली होती. मात्र, या बैठकीला तुरळक स्थानिक कार्यकर्त्यांनीच हजेरी लावली. माजी मंत्री आणि एकनाथ खडसे यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी गिरीश महाजन यांनीही बैठकीकडे पाठ फिरवली. मुक्ताईनगर बैठकीत प्रदेश संघटन सरचिटणीस विजय पुराणिक संघटनमंत्री रवींद्र अनासपुरे खासदार रक्षा खडसे ,भाजपा जिल्हाअध्यक्ष आमदार सुरेश भोळे , अशोक कांडेलकर डॉक्टर राजेंद्र फडके एवढेच लोक या बैठकीला उपस्थित होते. त्यामुळे एकूणच या बैठकीचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसून आले.

एकनाथ खडसे यांनी तब्बल चार दशके भाजपसाठी काम केले होते. या काळात मुक्ताईनगरसह जळगाव जिल्हा हा एकनाथ खडसे यांचा बालेकिल्ला झाला होता. याठिकाणी एकनाथ खडसे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. परिणामी खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर हा वर्ग भाजपासून दुरावणार, अशी अटकळ बांधली जात आहे. तर दुसरीकडे एकनाथ खडसे यांच्याशिवायही जळगावात आमची पक्ष संघटना मजबूत असल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे. परंतु, आजच्या बैठकीतील चित्र पाहता भाजपचा हा दावा कितपत खरा मानायचा, याबाबत शंका घेण्यास वाव आहे.

खडसे गेल्याने भाजपाला कोणत्याही प्रकारचा फटका बसणार नाही- गिरीश महाजन
एकनाथ खडसे गेल्याने भाजपला कोणत्याही प्रकारचा फटका बसणार नाही. याउलट आगामी काळात पक्षसंघटन मजबूत करण्यासंदर्भात चाचपणी सुरू असल्याचा दावा भाजप आमदार गिरीश महाजन यांनी केला होता. भाजप हा पक्ष विचारांवर चालणारा पक्ष आहे. हा व्यक्ती केंद्रित पक्ष नाही. त्यामुळे पक्षातील कोणी एक जण गेल्याने त्याचा काहीएक परिणाम पक्षाच्या संघटनेवर होत नसतो, असे गिरीश महाजन यांनी म्हटले होते.

संबंधित बातम्या:

खडसे गेल्याने भाजपाला कोणत्याही प्रकारचा फटका बसणार नाही- गिरीश महाजन

खडसेंच्या पक्षांतरानंतर गिरीश महाजन अ‍ॅक्टिव्ह, रक्षा खडसेंच्या गैरहजेरीवर पहिली कमेंट

गिरीश महाजनांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीची धडक, जामनेरमध्ये कार्यालय सुरू

(BJP meet in Jalgaon muktainagar)