Parambir Singh: परमबीर सिंग यांना वाचवण्याचा केंद्रसरकारचा आटोकाट प्रयत्न सुरू; नवाब मलिक यांचा गंभीर आरोप

| Updated on: Feb 03, 2022 | 1:34 PM

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे अँटालिया प्रकरणातील मास्टरमाइंड आहेत. एनआयएलाही त्याची माहिती आहे. मात्र, या प्रकरणातून परमबीर सिंग यांना वाचवण्याचा केंद्र सरकार आटोकाट प्रयत्न करत आहेत, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

Parambir Singh: परमबीर सिंग यांना वाचवण्याचा केंद्रसरकारचा आटोकाट प्रयत्न सुरू; नवाब मलिक यांचा गंभीर आरोप
Parambir Singh: परमबीर सिंग यांना वाचवण्याचा केंद्रसरकारचा आटोकाट प्रयत्न सुरू; नवाब मलिक यांचा गंभीर आरोप
Follow us on

मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (parambir singh) हे अँटालिया प्रकरणातील मास्टरमाइंड आहेत. एनआयएलाही त्याची माहिती आहे. मात्र, या प्रकरणातून परमबीर सिंग यांना वाचवण्याचा केंद्र सरकार (central government) आटोकाट प्रयत्न करत आहेत, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांनी केला आहे. तसेच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सिंग यांच्याबाबत दिलेली माहिती खरी असल्याचा दावाही मलिक यांनी केला आहे. केवळ अनिल देशमुख यांना अडचणीत आणण्यासाठी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना बदनाम करण्यासाठी परमबीर सिंग आरोप करत आहेत. त्यांनी काही स्टेटमेंट दिलंही असेल. पण प्रत्येक स्टेटमेंट खरंच असतं असं नाही. शिवाय ज्याच्यावर आरोप आणि संशय आहे त्या व्यक्तिच्या स्टेटमेंटवर तर अधिक शंका असते, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन हा गंभीर आरोप केला आहे. परमबीर सिंग यांनी ईडीला स्टेटमेंट दिलं आहे. सचिन वाझेला सेवेत घेण्यासाठी मुख्यमंत्री आणि त्यांच्या मुलाचा माझ्यावर दबाव होता, असा आरोप सिंग यांनी केला आहे. सिंग यांनी स्वत:च सरकारची दिशाभूल केली. स्वत: अधिकाऱ्याला नियुक्त केलं. भाजपचं सरकार असताना मुंबईतच नव्हे तर ठाण्यातही हे सर्व लोक अॅक्टिव्ह होते. मुंबईत आल्यावर पुन्हा त्यांना सोबत घेतलं आहे. ज्यांनी हे सर्व घडवून आणलं त्यांची बदली झाल्यावर खोटे आरोप करून सरकारला बदनाम करणे, अनिल देशमुखांना अडचणीत आणणे किंवा या चार्जशीटच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना बदनाम केले जात आहे. त्यांनी स्टेटमेंट दिलं असेल, पण दिलेलं स्टेटमेंट खरं असतं असं नाही. सिंग हे अँटालिया प्रकरणाचे मास्टरमाइंड आहेत. एनआयएलाही हे माहीत आहे. पण त्यांना वाचवण्याचं काम केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू आहे, असा दावा मलिक यांनी केला.

वाझेला सिंग यांनीच आणलं

वाझेला सिंग यांनीच आणलं. त्यांच्या अधिकारात आणलं. त्यासाठी सरकारने कोणतीही मान्यता दिली नव्हती. सरकारकडून शिफारसही झाली नव्हती. ठाण्यात काम करत असताना सस्पेंड असतानाही वाझे परमबीर सिंगसाठी काम करत होता. परमबीर सिंग यांना जिथे जिथे पोस्टिंग मिळाली तिथे काही अधिकाऱ्यांची गँग कार्यरत होती. आता एनआयएच्या माध्यमातून त्यांना वाचवण्याचं काम सुरू आहे, असंही त्यांनी सांगितलं.

चार्जशीटचा काही भाग पुरवला असेल

सर्व स्टेटमेंट चार्जशीटचा भाग असेल. कोणताही मोठा पत्रकार संपूर्ण चार्जशीट वाचू शकत नाही. कोणी तरी त्यांना काही पार्ट पुरवला असेल. पण ठिक आहे. परमबीर सिंग यांच्यावर शंका आहे, त्यांचं स्टेटमेंट स्वत:च्या बचावासाठी आहे. अँटालियापासून हे प्रकरण सुरू झाल्याने देशमुख आणि सरकारला बदनाम केलं जात आहे, असं ते म्हणाले.

हे अधिककाळ सुरू राहणार नाही

ईडी, सीबीआय, एनआयए आदी केंद्रीय यंत्रणेचा दुरुपयोग करून विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. निवडणुकी आधी शरद पवारांना नोटीस देण्यात आली. तामिळनाडूत निवडणूक असताना डीएमके नेत्याच्या घरी छापेमारी सुरू झाली. उत्तर प्रदेशातही हेच उद्योग सुरू आहेत. महाराष्ट्रात कितीही दबाव निर्माण केला तरी हे सरकार झुकत नाही हे दिसून आल्यावर सरकारातील लोकांना अडचणीत आणण्यासाठी भाजप वेगवेगळे डाव करत आहे. अनिल देशमुख असतील किंवा संजय राऊतांच्या निकटवर्तीयांवरील कारवाया असतील… हे सर्व राजकीय दबावासाठी सुरू आहे. सत्तेचा कितीही दुरुपयोग केला तरी राज्यातील आघाडीतील एकही नेता या दबावाला घाबरणार नाही. या देशात ज्या प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे ते पाच राज्याच्या निवडणुकीतून समोर येईलच. हा प्रकार अधिक काळ सुरू राहणार नाही याची आम्हाला खात्री आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 

संबंधित बातम्या:

Parambir Singh: हिरेन प्रकरणाचा मास्टरमाइंड परमबीर सिंगच, काही बातम्या सिस्टिमॅटिकली पेरल्या जाताहेत; सतेज पाटील यांचा आरोप

परमबीर सिंहांनी ईडीला दिलेल्या जबाबात सनसनाटी खुलासे! अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये परब आणि देशमुखांचा हात?

औरंगाबादेत घरकुल योजनेचं राजकारण पेटलं, खा. इम्तियाज जलील यांच्यानंतर आता भाजप आक्रमक, पालकमंत्र्यांना घेराव घालणार