‘मेट्रो’वरुन राजकारण तापले; कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडच्या जागेवर केंद्र सरकारने लावला बोर्ड

| Updated on: Nov 03, 2020 | 4:13 PM

त्यामुळे आता महाविकासआघाडी विरुद्ध भाजप हा संघर्ष आणखीनच तापण्याची चिन्हे आहेत. | Metro carshed

मेट्रोवरुन राजकारण तापले; कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडच्या जागेवर केंद्र सरकारने लावला बोर्ड
Follow us on

मुंबई: कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडच्या (Metro car shed) जमिनीवर अचानक दावा केल्यानंतर केंद्र सरकारने महाविकासआघाडी सरकारला आणखी एक धक्का दिला आहे. या परिसरात आता केंद्र सरकारकडून ही जागा आपल्या मालकीचे असल्याचे बोर्ड तत्परतेने लावण्यात आले आहेत. ही जागा मिठागाराची असून त्यावर केंद्र सरकारचा हक्क असल्याचा मजूकर या फलकांवर दिसत आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत कांजूरमार्गची जागा राज्य सरकारला मिळून द्यायचीच नाही, असा चंगच केंद्र सरकारने बांधलेला दिसत आहे. त्यामुळे आता महाविकासआघाडी विरुद्ध भाजप हा संघर्ष आणखीनच तापण्याची चिन्हे आहेत.

काय आहे प्रकरण?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी आरेमधील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेतला होता. राज्य सरकारने एकही रुपया न घेता ही जागा MMRDA ला दिल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. मात्र, आता केंद्र सरकारने या जागेत मिठागार असल्याचे सांगत त्यावर आपला हक्क सांगितला आहे. केंद्राच्या उद्योग संवर्धन आणि व्यापार मंत्रालयाने राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात कांजूरमार्गची जागा MMRDA ला देण्याचा निर्णय रद्द करा. ही जागा मिठागराची आहे. आम्ही त्यावरील आमचा हक्क सोडलेला नाही, असे नमूद करण्यात आले आहे.

यापूर्वीही MMRDA चा प्रस्ताव आम्ही फेटाळला होता. त्यामुळे आमच्या परस्पर कारशेड उभारणं चुकीचं आहे. त्यामुळे MMRDA ने या कारशेडचे काम त्वरित थांबवा, असे केंद्र सरकारतर्फे सांगण्यात आले आहे.

‘केंद्र सरकार राज्याच्या अधिकारांवर अतिक्रमण करु पाहतंय’

मिठागराची ती जागा राज्य सरकारचीच आहे. कुठल्याही कायद्याप्रमाणे एखाद्या राज्यातील जमिनीवर पहिला अधिकार हा त्या राज्याचाच असतो. केंद्र सरकारने या जमिनीवर अचानकपणे केलेले दावा धक्कादायक आहे. खरं तर ती जमीन महाराष्ट्राचीच आहे. केंद्र सरकार सातत्याने राज्याचे अधिकार काढून देशात हळूहळू आणीबाणी आणत आहे, असा घणाघाती आरोप सुप्रिया सुळे यांनी केला.

भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी एकेकाळी दिलेलं शपथपत्र कसं नाकारता?
काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांनी कांजूरमार्गच्या जागेबाबत केंद्र सरकाने पाठवलेल्या पत्रावरुन भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. कांजूरमार्गची जमीन राज्य सरकारची आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ही जागा राज्य सरकारची आहे, असं सांगितलं आहे. भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी एकेकाळी दिलेल्या प्रतिज्ञापत्राला कसं नाकारू शकता, असा सवाल खासदार राजीव सातव यांनी विचारला.

संबंधित बातम्या:

भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी एकेकाळी दिलेलं शपथपत्र कसं नाकारता?, राजीव सातव यांचा केंद्राला सवाल

‘मेट्रोचं काम थांबवण्यासाठी भाजपचं कटकारस्थान’, कारशेडच्या वादावरुन नवाब मलिकांचा गंभीर आरोप

केंद्र सरकार देशात हळूहळू आणीबाणी आणतंय; सुप्रिया सुळेंचा जोरदार हल्ला