ठाकरे सरकार पूर्णपणे अपयशी, आता जमत नाही म्हणा आणि सोडून द्या : चंद्रकांत पाटील

| Updated on: Nov 27, 2020 | 3:07 PM

मुख्यमंत्री आश्वासक वाटावा, भीतीदायक नाही. त्यांनी सहनशीलता वाढवली पाहिजे" असा सल्ला चंद्रकांत पाटलांनी दिला.

ठाकरे सरकार पूर्णपणे अपयशी, आता जमत नाही म्हणा आणि सोडून द्या : चंद्रकांत पाटील
Follow us on

कोल्हापूर : “ठाकरे सरकार हे पूर्णपणे अपयशी, गोंधळलेलं आणि दिशा नसलेलं सरकार आहे. वर्षभर तुम्ही कसं काम करता, ते जनतेने पाहिलं. आता जमत नाही म्हणा आणि सोडून द्या” अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली. महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त चंद्रकांतदादांनी टीकास्त्र सोडलं. (Chandrakant Patil slams Thackeray Government on first anniversary)

“मराठा आरक्षण, कृषी अशा सर्वच स्तरावर सरकारला अपयश आलं आहे. सरकारमध्ये एकजिनसीपणा नाही. प्रत्येक जण आपापलं डिपार्टमेंट संभाळतो. मुख्यमंत्र्यांकडे व्हिजन असावे लागते. त्यांनी सर्वांना खेचून न्यायचं असतं. मात्र ही उद्धव ठाकरेंची तयारी नाही. सरकार चालवणं हे त्यांचं काम नाही. वर्षभर तुम्ही कसं काम करता ते जनतेने पाहिलं आहे, आता जमत नाही म्हणा आणि सोडून द्या” असं आवाहन चंद्रकांतदादांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना केलं.

“संघ वाढला नसता, तर काय झालं असतं, हे सर्वसामान्य हिंदू नागरिकांना माहीत आहे. बोलबच्चन संजय राऊत यांनी यावर बोलण्याची गरज नाही” अशी बोचरी टीकाही चंद्रकांत पाटील यांनी केली.

“मुख्यमंत्र्यांनी सहनशीलता वाढवली पाहिजे”

“मुख्यमंत्र्यांची गरिमा राखणारी ही भाषा नाही, सामनाच्या मुलाखतीतून फक्त धमक्या दिल्या. मुख्यमंत्र्यांची भाषा ही संयमी असावी. मुख्यमंत्री आश्वासक वाटावा, भीतीदायक नाही. त्यांनी सहनशीलता वाढवली पाहिजे” असा सल्लाही त्यांनी दिला.

“फक्त कंगना रनौत प्रकरणच नाही, तर गेल्या वर्षभरात 13 निर्णयात न्यायालयाने ठाकरे सरकारला ठोकलं आहे. यांचा कोण सल्लागार आहे, हेच समजत नाही, अर्णव गोस्वामी, कंगना रनौत प्रकरणात यांनी अमर्याद सत्ता वापरली. इंदिरा गांधींनीही तेच केलं होतं. देवेंद्र फडणवीस-अजित पवार यांच्या शपथविधीनंतर सुप्रीम कोर्टाने तुमच्या बाजूने निर्णय दिला, तर कोर्ट चांगलं. अंतिम वर्षाच्या रीक्षा घ्यायलाच लागेल, असं कोर्टाने सांगितलं की कोर्ट मॅनेज. कंगनाच्या बाबतही कोर्टाने जोरदार चपराक लगावली आहे, त्यामुळे हायकोर्ट मॅनेज आहे, असंच म्हणतील” अशी टीकाही चंद्रकांत पाटील यांनी केली.

“बारा बलुतेदारांना पॅकेज दिलेलं नाही. फेरीवाल्यांना पाच हजार दिले नाहीत, की घरकाम करणाऱ्या महिलांना दोन हजार दिले नाहीत. कृषी कर्जमाफी अर्ध्यां जणांना मिळाली नाही. बोगस बियाणे, पीक विमा यात अनंत अडचणी आल्या. हेक्टरी दहा हजार रुपयांची मदत सर्वांना मिळाली नाही. महिला अत्याचार वाढत आहेत, दररोज चार मुलींवर अत्याचार होत असल्याची आकडेवारी आहे, दिशा कायदा कुठे गेला?” असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत विचारला.

“फडणवीस सरकारने दिलेलं मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकवू शकला नाहीत. नोकरी, अॅडमिशनमध्ये स्थगिती न देण्याची मागणी करु शकला नाहीत. ओबीसी समाजात अस्वस्थता आहे, दोन समाजांमध्ये तेढ निर्माण केली. केंद्राकडून जीएसटी आला नाही, अशी ओरड केली. मात्र जीएसटी त्या-त्या वेळी मिळाला, त्याची तूट बाकी आहे. कोणालाच जीएसटी कलेक्शन झालेलं नाही. तुम्हाला एक लाख ६५ हजारांपर्यंत कर्ज घेण्याची मुभा आहे. पण तरीही ओरड सुरु आहे” असा आरोपही चंद्रकांतदादांनी केला. (Chandrakant Patil slams Thackeray Government on first anniversary)

संबंधित बातम्या :

उद्धव ठाकरे सपशेल अपशयी, हिंदुत्व असेल, तर ते दिसत का नाही?, संदीप देशपांडेंचा सवाल

महाविकास आघाडी सरकार पाच वर्षांपेक्षा जास्त चालणार, गृहमंत्री अनिल देशमुखांना विश्वास

(Chandrakant Patil slams Thackeray Government on first anniversary)