काँग्रेसमधील तरुण नेतृत्वाला भाजपमध्ये यावंसं वाटलं, तर आम्ही घेणार, सरकार बनवणार : चंद्रकांत पाटील

| Updated on: Nov 24, 2020 | 3:44 PM

काँग्रेसमधील तरुण नेतृत्व भाजपकडे आले, तर त्यांना नाकारायला आम्ही भजन मंडळी नाही, अशी टिपण्णी चंद्रकांतदादांनी केली

काँग्रेसमधील तरुण नेतृत्वाला भाजपमध्ये यावंसं वाटलं, तर आम्ही घेणार, सरकार बनवणार : चंद्रकांत पाटील
Follow us on

कोल्हापूर : काँग्रेसमधील तरुण नेतृत्वाला पक्षात भवितव्य नाही, असं वाटायला लागलं आहे. त्यातून ते भाजपकडे आले तर आम्ही घेणार आणि सरकार स्थापन करणार, आम्ही नकार द्यायला भजन मंडळी नाही, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलं. मात्र महाराष्ट्रात कुठल्याही पक्षातून आपल्याकडे अद्याप कोणीही आलेलं नसल्याचं चंद्रकांतदादांनी स्पष्ट केलं. (Chandrakant Patil talks on Sanjay Raut Jayant Patil and Maha Vikas Aghadi Government)

“काशीस जावे नित्य वदावे” या उक्तीनुसार बोलत राहायचं, काशीला कधी जायला मिळेल, माहिती नाही. तसं सरकार पडणार, भाजप येणार, हे म्हणण्यात काय अडचण आहे, आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. पण त्या दृष्टीने आम्ही कोणतीही पावलं टाकत नाही. सरकार पाडण्याच्या फंदात आम्ही पडत नाही, ती आमची संस्कृती नाही. मग तुम्ही विचाराल मध्य प्रदेश, कर्नाटकमध्ये काय घडलं? तर, काँग्रेसमधील तरुण नेतृत्वाला पक्षात भवितव्य नाही असं वाटायला लागलं आहे. त्यातून ते भाजपकडे आले तर आम्ही काय भजन मंडळी नाही, आम्ही काय कोणाला घेत नाही, असं म्हणणार नाही. आम्ही त्यांना घेणार आणि सरकार स्थापन करणार. पण महाराष्ट्रात अजून कोणी आलेलं नाही” असं चंद्रकांत पाटलांनी सांगितलं.

“संजय राऊतांना भाजपवर टीकेशिवाय झोप लागत नाही”

शिवसेना खासदार संजय राऊत यांना दिवसभरात दहा वेळा भाजपवर आरोप केल्याशिवाय, टिपण्णी केल्याशिवाय, दोषारोप केल्याशिवाय झोपच लागत नाही. त्यामुळे राऊतांनी भाजपवर केलेले आरोप लोकही फार गांभीर्याने घेत नाहीत. निवडणुकांमध्ये सगळेच पक्ष म्हणून लढतात, त्यानंतर सरकार वेगळं असतं आणि पक्ष वेगळा असतो. सरकार कसं चालवावं, यामध्ये आमचा पक्ष तरी हस्तक्षेप करत नाही. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जी घटना लिहिली, त्यात हजार वर्षांनंतरही बदल करावे लागणार नाहीत, इतक्या गोष्टी लिहिल्या आहेत. काय झाल्यास काय करावं याची नोंद आहे. निवडणूक आयोग, जिल्हा न्यायालय याविषयी त्यांनी संविधानात लिहिल्यामुळे उत्तम चालू आहे. पण तपास यंत्रणांवरच तुमचा विश्वास नसेल तर तुम्हाला देशाची घटनाच मान्य नाही, असा निशाणा चंद्रकांत पाटलांनी सरकारवर साधला.

“विरोधकांना एखाद्या यंत्रणेकडून मदत झाली नाही, तर ती तपास यंत्रणा योग्य वाटते. उदाहरणार्थ पंजाबमध्ये काँग्रेस जिंकली, की ईव्हीएममध्ये दोष नाही. पण बिहारमध्ये भाजप जिंकली, की ईव्हीएममध्ये दोष आहे. पुणे पदवीधर निवडणुकीत भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख प्रचंड मताधिक्याने जिंकणार आहेत. पराभवाची कारणं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आतापासूनच लिहायला घेतली आहेत. मतदार यादीमध्ये काही जण बोगस आहेत, आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार, असं ते म्हणतात. म्हणजे समजा उद्या तुम्ही निवडणूक जिंकलीत, जिंकणार नाहीत हा भाग वेगळा. पण जिंकलात, तर यादीत दोष नाही आणि हरलात तर यादीत दोष. तसंच ईडीच्या कारवाईचं आहे. तुम्ही काही केलं नसेल, तर चिंतेचं कारण नाही, निश्चिंत राहा, ईडी काय तयार करणार आहे का?” असा सवाल चंद्रकांत पाटलांनी विचारला. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीने केलेल्या छापेमारीच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. (Chandrakant Patil talks on Sanjay Raut Jayant Patil and Maha Vikas Aghadi Government)

“जयंत पाटील, अजित पवार, हसन मुश्रीफ माझ्यावर टीका करताना शरद पवारांच्या प्लसमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात. मी त्यांना सल्ला दिला की, उद्या मुख्यमंत्री निवडण्याची वेळ आलीच, तर ते सुप्रिया सुळेंना संधी देतील. आता उपमुख्यमंत्री करायची वेळ आली, तेव्हा शरद पवार यांनी अजित पवारांना केलं… की जयंत पाटील, हसन मुश्रीफ यांना केलं? अजित पवारांनी तर बंडखोरी केली होती, घर सोडलं, पक्ष सोडला होता. पण उपमुख्यमंत्री करायची वेळ आली, तेव्हा पवारांनी कोणाची निवड केली? कारण ही शरद पवारांची पार्टी आहे, त्यांना हवं त्याला ते मुख्यमंत्री करणार. भाजपमध्ये तसं नाही, मी गिरणी कामगाराचा मुलगा आहे, माझ्या वडिलांना 1400 रुपये पगार होता, पण माझ्याकडे आठ खाती होती. हे फक्त भाजपमध्येच होऊ शकतं. बाकीकडे मुलगा, पुतण्या, नातू असंच राजकारण चालतं” अशी टीकाही चंद्रकांत पाटील यांनी केली.

संबंधित बातम्या :

आम्ही कोणाच्या बापाला भीत नाही, नोटीसा कसल्या पाठवता, घरी या, संजय राऊतांचं थेट चॅलेंज

तीन दिवसांसाठी का होईना अजितदादांनी काकांना सोडले होते, हा इतिहास नाही का?; चंद्रकांतदादांचा टोला

(Chandrakant Patil talks on Sanjay Raut Jayant Patil and Maha Vikas Aghadi Government)