निवडणुकीचा बिगुल वाजणार, ऑक्टोबरमध्ये मतदान; छत्रपती संभाजीनगरात गावगाड्यातील वर्चस्वासाठी घडामोडींना वेग
Chhatrapati Sambhajinagar Gram Panchayat Election : मुदत संपलेल्या, मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापन झालेल्या एकूण 638 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची तयारी जोरात सुरू झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादी तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. ऑक्टोबर महिन्यात 638 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होणार असून, यामुळे जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. जिल्ह्यातील मुदत संपलेल्या, मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापन झालेल्या एकूण 638 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची तयारी जोरात सुरू झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादी तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या निवडणुका ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. नेमकं कोणत्या महिन्यात होणार याबाबत माहिती समोर आलेली नाही.
मतदार यादीची प्रक्रिया सुरू
आरक्षण निश्चितीतील त्रुटीमुळे पैठण, गंगापूर आणि सोयगाव तालुक्यातील 22 ग्रामपंचायतींमध्ये आरक्षणाची सोडत पुन्हा घेण्यात आली होती. या ग्रामपंचायतींपैकी 21 ग्रामपंचायतींची अंतिम अधिसूचना सोमवारी प्रसिद्ध करण्यात आली. तसेच उर्वरित 21 ग्रामपंचायतींमध्ये आक्षेप मंजूर झाल्याने नव्या आरक्षण प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. प्रारूप मतदार यादी 24 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 24 ते 29 जुलै या कालावधीत मतदार यादीबाबत हरकती व सूचना स्वीकारल्या जातील. त्यानंतर छाननी प्रक्रिया पूर्ण करून 4 ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी जाहीर केली जाईल. अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर निवडणूक कार्यक्रमाची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.
वाचा: स्वस्त दरात सामान विकूनही कसा होतो नफा? डी-मार्टचे सत्य अखेर समोर आलेच
यंदा थेट सरपंच निवड
यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहे. सरपंचपदासाठी थेट जनतेतून मतदान होणार आहे. यामुळे सदस्यांसोबत सरपंचपदाची लढतही स्वतंत्रपणे रंगणार आहे. गावपातळीवर राजकीय वातावरण आधीच तापू लागले आहे. विविध पक्ष आणि उमेदवार आता गावागावात कार्यकर्ते संघटित करण्यात आणि रणनीती आखण्यात व्यस्त आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील या मोठ्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. स्थानिक नेतृत्व, विकासकामे आणि राजकीय समीकरणे यावर यंदाच्या निवडणुकीचा निकाल प्रभाव टाकणार असल्याचे मानले जात आहे.