मुंबई : (Eknath Shinde) एकनाथ शिंदे आणि उमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर आता (Cabinet ) मंत्रीमंडळात कुणाची वर्णी लागणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. अशातच गेल्या दोन दिवसांपासून मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बैठका देखील वाढल्या आहेत. शिवाय नाही म्हणलं तरी आता मंत्रिपदासाठी दबावतंत्राचा वापर सुरु झाला आहे. पण एकनाथ शिंदे यांचाच निर्णय अंतिम राहणार, त्यांचाच निर्णय सर्वांसाठी बांधील असल्याचे मत अपक्ष आ. (Kishor Jorgewar ) किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केले आहे. शिवाय मंत्रीमंडळ विस्ताराबाबत एक रणनिती ठरली असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे अपक्ष आणि शिंदे गटातील कुणाकडूनही मंत्री पदाबाबत दावा केला जात नसल्याचे जोरगेवार यांनी सांगितले आहे. असे असले तरी शिंदे गटातील आणि अपक्ष आमदारांच्याही मुंबईतील फेऱ्या वाढल्या आहेत याबाबत शंका नाही.
मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत भाजप गोटात कमालीची शांतता असली तरी शिंदे गटातील आमदार मात्र गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असल्याचे चित्र आहे. काही जणांनी तर उघडपणे आपण इच्छूक असल्याचे बोलून दाखवले आहे. त्यामुळे खातेवाटपात खरे कसब पणाला लागणार आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेच. असे असले तरी 4 मागे एक मंत्री असे सूत्र ठरले असल्याचे अपक्ष आ. किशोर जोगरेवार यांनी सांगितले आहे. शिवाय एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो सर्वानाच मान्य असणार आहे. त्यामुळे आता त्यांनी कुणाला मंत्रीपद देतील हे पाहणे महत्वाचे असल्याचे जोगरेवार यांनी सांगितले आहे.
एकनाथ शिंदे हे सर्वसामान्यातील व्यक्तिमत्व आहे. सर्वसामान्यांसाठी काहीतरी करुन दाखवण्याची त्यांची गेल्या अनेक दिवसांपासूनची इच्छा आता पूर्ण होणार आहे. त्यांच्या कार्यपध्दतीचा अंदाज गेल्या चार दिवसांमध्ये सबंध राज्याला आला आहे. त्यांची ही पध्दत आणि सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचे कसब यामुळे तर आपण शिंदे गटात आल्याचे किशोर जोगरेवार यांनी स्पष्ट केले आहे. एकनाथ शिंदे हे एक कर्मठ नेते असून राज्याच्या विकासासाठी हेच सरकार योग्य राहिल तर पाच वर्षच नाहीतर त्यापुढे 25 वर्ष हेच सरकार टिकेल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मंत्रीमंडळाचा विस्तार आता काही दिवसांवर येऊन ठेपला असताना एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी सर्व आमदार हे मुंबई जवळ करीत आहेत. पण आपण मात्र, मतदार संघातील रखडलेली विकास कामे मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आल्याचे किशोर जोरगेवार यांनी स्पष्ट केले आहे. सत्तांतरामध्ये एक महिना गेला तर बजेटची बरीच कामे ही रखडलेली आहेत. या कामांना वेग यावा यासाठी मुंबईला आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, मंत्रीमंडळ विस्ताराच्या बैठका आणि अपेक्षा असलेले आमदार हे आता मुंबई वारी करु लागले आहेत हे ही तेवढेच खरे..