दिल्लीमध्ये अमित शाहा आणि फडणवीसांमध्ये बंद दाराआड खलबतं, नेमकी काय झाली चर्चा? मोठी बातमी समोर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बंददाराआड चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बंददाराआड चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, अजूनही विधान परिषदेच्या जागा वाटपावरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरूच आहे. या सर्व पार्शाभूमीवर ही चर्चा महत्त्वाची मानली जात आहे. समोर आलेल्या माहितीनुसार यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्यामध्ये राज्यातील विविध राजकीय विषयांवर चर्चा झाली आहे. विधान परिषदेच्या जागा वाटपाचा महायुतीमधील तिढा अजूनही कायम आहे. याबाबत शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची नेमकी मागणी काय आहे, यावर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच महायुतीमधील अंतर्गत वादातील मुद्यांवर देखील यावेळी चर्चा झाली असल्याचं बोललं जात आहे.
विधान परिषदेच्या जागांसाठी रस्सीखेच
राज्यात 17 विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे. एक जून हा विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघ्या काही दिवसच आता शिल्लक राहिले आहेत, मात्र अजूनही महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा कायम आहे. अशा विधान परिषदेच्या काही जागा आहेत, जिथे शिवसेना आणि भाजप हे देन्ही पक्ष देखील आग्रही आहेत. त्यामुळे सध्या विधान परिषदेच्या जागा वाटपावरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. यावरच या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.
सरकारच्या शिष्टमंडळानं घेतली अमित शाहांची भेट
दरम्यान दुसरीकडे राज्यात सध्या कांद्याचा प्रश्न तापला आहे. कांद्याला भाव मिळत नसल्यानं शेतकरी हातबल झाले आहेत. राज्यातील कांदा प्रश्नावर आज सरकारच्या शिष्टमंडळाने अमित शाहा यांची भेट घेतली आहे. या शिष्टमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह इतर मंत्र्यांचा देखील समावेश होता. चर्चा सकारात्मक झाल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.