गणेश नाईकांच्या प्रवेशाला विरोध, मुख्यमंत्र्यांच्या भेटीत मंदा म्हात्रेंची नाराजी दूर

| Updated on: Jul 30, 2019 | 7:14 PM

बेलापूरच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांची (BJP MLA Manda Mhatre) राष्ट्रवादीचे दिग्गज नेते गणेश नाईकांच्या भाजप प्रवेशावरुन असलेली नाराजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूर केल्याचे सांगितले जात आहे.

गणेश नाईकांच्या प्रवेशाला विरोध, मुख्यमंत्र्यांच्या भेटीत मंदा म्हात्रेंची नाराजी दूर
Follow us on

मुंबई : बेलापूरच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांची (BJP MLA Manda Mhatre) राष्ट्रवादीचे दिग्गज नेते गणेश नाईकांच्या भाजप प्रवेशावरुन असलेली नाराजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूर केल्याचे सांगितले जात आहे. मंदा म्हात्रे यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना त्यांचे स्थान अबाधित राहिल असा विश्वास दिला. दरम्यान, गणेश नाईक हे त्यांचं साम्राज्य वाचवण्यासाठी भाजपमध्ये येत असल्याचा आरोप म्हात्रे यांनी केला होता. त्यानंतर भाजपमधील स्थानिक पातळीवरील वाद चव्हाट्यावर आला होता.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबईतील दिग्गज नेते आणि माजी मंत्री गणेश नाईक त्यांचा आमदार मुलगा आणि 57 नगरसेवकांसह भाजप प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे. मात्र, त्याआधीच भाजपमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळाल्याने भाजपकडून डॅमेज कंट्रोलच्या हालचाली सुरु झाल्या. अखेर मुख्यमंत्र्यांनी आमदार मंदा म्हात्रेंची नाराजी काढत त्यांना तुमचे स्थान अबाधित असल्याचे सांगत निश्चिंत राहाण्यास सांगितले. त्यामुळे तुर्तास तरी हा वाद शमला आहे.

आमदार मंत्रा म्हात्रे काय म्हणाल्या होत्या?

“नाईक आपले साम्राज्य वाचविण्यासाठी भाजपात येत आहेत. त्यांना भाजपबद्दल आपुलकी नाही. बेलापूरमधून पुन्हा एकदा मलाच उमेदवारी मिळेल. पक्षश्रेष्ठी मला न्याय देतील. ही गणेश नाईक यांची स्टंटबाजी आहे.”

गणेश नाईकांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित

नवी मुंबई महापालिकेतील 57 नगरसेवक, आमदार संदीप नाईक यांच्यासह गणेश नाईक बुधवारी सकाळी साडे 11 वाजता भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. यासोबतच नवी मुंबई महापालिकेत भाजपची सत्ताही येणार आहे. या महापालिकेत भाजपचे फक्त 6 नगरसेवक आहेत. पण या 57 नगरसेवकांसह भाजपची सत्ता येईल. या सर्व नगरसेवकांनी बैठक घेत एकमताने राष्ट्रवादी सोडण्याचा आणि भाजप प्रवेशाचा  निर्णय घेतला.

गणेश नाईक नवी मुंबईतील सर्वात मोठा चेहरा

गणेश नाईक हा राष्ट्रवादीचा नवी मुंबई आणि ठाणे या भागातील सर्वात मोठा चेहरा आहे. 17  डिसेंबर 1992 रोजी नवी मुंबई महानगरपालिका स्थापन झाली. तेव्हापासून नवी मुंबई महापालिकेवर गणेश नाईक यांची एकहाती सत्ता आहे, असं म्हटलं तर वावगं ठरु नये. गणेश नाईक हे आधी शिवसेनेत होते. 1990 ला ते पहिल्यांदा नवी मुंबईतून आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 25 मे 1999 रोजी शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना करण्यात आली. तेव्हा गणेश नाईक यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर राज्यातील सत्तेची समीकरणं कितीही बदलली तरी नवी मुंबईत मात्र राष्ट्रवादीचीच सत्ता राहिली.

2014 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मोदी लाटेमुळे गणेश नाईक यांना पराभव स्वीकारावा लागला. ते भाजपच्या मंदा म्हात्रे यांच्याकडून पराभूत झाले. राष्ट्रवादीच्या काळात गणेश नाईक यांनी अनेक महत्त्वाची पदं सांभळली. ते ठाण्याचे पालकमंत्री होते. तसेच, ते कामगार, उत्पादन शुल्क आणि पर्यावरण मंत्रीही होते. गणेश नाईक यांचा मुलगा संदीप नाईक हे सध्या नवी मुंबईतील ऐरोलीचे आमदार आहेत.