मी नामर्द नाही, ‘ईडी’ वगैरेचा गैरवापर करून दबाव आणाल तर याद राखा, उद्धव ठाकरेंचा रोखठोक इशारा

| Updated on: Nov 27, 2020 | 9:09 AM

तुमची खिचडी कशी शिजवायची ती आम्ही शिजवू शकतो," असा इशारा उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिला. CM Uddhav Thackeray on ED Inquire MLA pratap sarnaik)

मी नामर्द नाही, ‘ईडी’ वगैरेचा गैरवापर करून दबाव आणाल तर याद राखा, उद्धव ठाकरेंचा रोखठोक इशारा
Follow us on

मुंबई : “मी शांत आहे, संयमी आहे. पण याचा अर्थ मी काही नामर्द नाही. हिंदुत्ववादी म्हटल्यावर एक संस्कृती आहे. तुम्ही कुटुंबियांवर येणार असाल, मुलाबाळांवर येणार असाल तर आमच्या अंगावर येणाऱ्यांना ज्यांना ज्यांना कुटुंब आणि मुलंबाळं आहेत, त्यांना मी सांगू इच्छितो की, तुम्हालाही कुटुंब आणि मुलंबाळं आहेत. तुम्ही धुतले तांदूळ नाहीत. तुमची खिचडी कशी शिजवायची ती आम्ही शिजवू शकतो,” असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपला दिला. (CM Uddhav Thackeray on ED Inquire MLA pratap sarnaik)

महाविकासआघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली. नुकतंच ही मुलाखत प्रसारित करण्यात आली. या मुलाखतीतून उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी ईडीने केलेल्या छापेमारीवर भाष्य केले.

“‘ईडी’ वगैरेचा गैरवापर करून दबाव आणाल तर याद राखा. मुलाबाळांच्या मागे लागून विकृत आनंद मिळवणाऱ्यांनो, तुम्हालाही कुटुंब, मुलंबाळं आहेत हे विसरू नका; पण आमच्यावर संस्कार आहेत म्हणून संयम ठेवला आहे.”

“मी शांत आहे, संयमी आहे. पण याचा अर्थ मी काही नामर्द नाही आणि ज्या पद्धतीने आमच्या लोकांच्या कुटुंबियांवर हल्ले सुरू झाले आहेत. ही पद्धत निदान महाराष्ट्राची तरी नक्कीच नाही. एक संस्कृती आहे. हिंदुत्ववादी म्हटल्यावर एक संस्कृती आहे आणि तुम्ही कुटुंबीयांवर येणार असाल, मुलाबाळांवर येणार असाल तर आमच्या अंगावर येणाऱ्यांना ज्यांना ज्यांना कुटुंब आणि मुलंबाळं आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की, तुम्हालाही कुटुंब आणि मुलंबाळं आहेत. तुम्ही धुतले तांदूळ नाहीत. तुमची खिचडी कशी शिजवायची ती आम्ही शिजवू शकतो,” असा रोखठोक इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला. (CM Uddhav Thackeray on ED Inquire MLA pratap sarnaik)

“तुम्ही एक सूड काढा, आम्ही दहा सूड काढू” 

“तुम्ही सीबीआयचा दुरुपयोग करायला लागलात तेव्हा अशी वेसण घालावीच लागते. ईडी काय, सीबीआय काय त्यावर राज्याचा अधिकार नाही? आम्ही देतो ना नावं, आमच्याकडे आहेत नावं. मालमसाला तयार आहे. पूर्ण तयार आहे. पण सूडाने जायचं का? मग जनतेने आपल्याकडून काय अपेक्षा ठेवायची. सूडानेच वागायचं असेल तर तुम्ही एक सूड काढा, आम्ही दहा सूड काढू,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

“सूडाने वागायचंच आहे का? माझी आजही प्रामाणिक इच्छा आहे की, हे असं विकृत बुद्धीचे चाळे तुम्ही करू नका. कारण विकृती ही विकृती असते. त्या मार्गाने जायची आमची आज तरी इच्छा नाही. आम्हाला भाग पाडू नका,” असेही उद्धव ठाकरेंनी या मुलाखतीत म्हटलं.

“भलेभले अंगावर आले, पण काय झालं?”

“ईडीसारख्या संस्था… ज्या केंद्र सरकारच्या हातात आहेत. त्या संस्थांचा वापर महाविकास आघाडीच्या आमदारांवर धाडी घालून दहशतवाद आणि दडपशाही करतात. जेणेकरून आमदारांनी गुडघे टेकावेत,” असा आरोपही उद्धव ठाकरेंनी केला.

“मला जेव्हा आव्हान मिळतं तेव्हा मला जास्त स्फूर्ती येते. एक गोष्ट काही लोक विसरतात की, तुम्ही जो म्हणालात तो चमत्कार या महाराष्ट्राच्या मातीत आहे. तेज आहे. महाराष्ट्रावर अनेक संकटं आली. आपत्त्या आल्या. भलेभले अंगावर आले, पण काय झालं?” असा सवालही उद्धव ठाकरेंनी केला. (CM Uddhav Thackeray on ED Inquire MLA pratap sarnaik)

संबंधित बातम्या : 

‘सामना’च्या धमाका मुलाखतीपूर्वी नितेश राणेंचं ट्विट; उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर शेलक्या शब्दात टीका

अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ले, वाढीव वीजबिलावरून आंदोलन, पवार लोकनेतेच नाहीत?; उद्धव ठाकरेंना राऊतांचे तीन सवाल