अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ले, वाढीव वीजबिलावरून आंदोलन, पवार लोकनेतेच नाहीत?; उद्धव ठाकरेंना राऊतांचे तीन सवाल

| Updated on: Nov 26, 2020 | 8:28 PM

शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घेतलेल्या मुलाखतीचा आणखी एक प्रोमो प्रसिद्ध झाला आहे. (CM Uddhav Thackerays Special Interview, Sanjay raut asked three question)

अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ले, वाढीव वीजबिलावरून आंदोलन, पवार लोकनेतेच नाहीत?; उद्धव ठाकरेंना राऊतांचे तीन सवाल
फोटो सौजन्य दैनिक 'सामना'
Follow us on

मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घेतलेल्या मुलाखतीचा आणखी एक प्रोमो प्रसिद्ध झाला आहे. या मुलाखतीत राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना देशातील आणि राज्यातील अत्यंत कळीच्या मुद्द्यांवरून घेरण्याचा प्रयत्न केला असून मुख्यमंत्र्यांनीही त्याला खास ठाकरी शैलीत सडेतोड आणि रोखठोक उत्तरे दिली आहेत. त्यामुळे ही मुलाखत वादळी ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (CM Uddhav Thackerays Special Interview, Sanjay raut asked three question)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झालं आहे. त्यानिमित्ताने शिवसेना नेते संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. कोणताही गाजावाजा न करता ही मुलाखत घेण्यात आली. आज अचानक या मुलाखतीचा प्रोमो आला आणि त्यातील उद्धव ठाकरे यांच्या रोखठोक वक्तव्यांनी एकच खळबळ उडाली. हा प्रोमो येऊन अकरा तासही उलटत नाही तोच राऊत यांनी त्यांच्या ट्विटरवर दुसरा प्रोमो शेअर करून धमाका उडवून दिला आहे. या मुलाखतीला ‘अभिनंदन मुलाखत’ असं शिर्षक देण्यात आलं असलं तरी या मुलाखतीतील मुख्यमंत्र्यांची सडेतोड भाषा पाहता ही मुलाखत वादळी ठरण्याची शक्यता आहे.

या मुलाखतीच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर आसूड ओढतानाच राज्यातील भाजप नेत्यांची पिसे काढली आहेत. कुठला ना कुठला मुद्दा घेऊन त्याचा इश्यू करणाऱ्या भाजप नेत्यांवर उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे. तसेच त्यांना गर्भित इशारेही दिले आहेत. तुम्हालाही कुटुंब आहे, हे लक्षात ठेवा, असा इशारा देऊन अंगावर याल तर शिंगावर घेऊ, असा एकप्रकारचा इशाराच मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना दिला आहे.

दुसऱ्या प्रोमोमध्ये संजय राऊत यांनी राज्यातील तीन महत्त्वाच्या घडामोडींवर प्रश्न विचारले आहेत. राज्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधने लादली जात आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ले होत आहेत, त्यावर तुमचं काय म्हणणं आहे?, असा थेट प्रश्न राऊतांनी मुख्यमंत्र्यांना विचारला. त्यावर प्रत्येक प्रश्नावेळी त्यांनी ‘बाप रे, बाप रे’ असं म्हटलंय. मात्र मूळ मुलाखतीत या मुद्द्याचा त्यांनी पंचनामा केला असून ते नेमके काय म्हणाले? हे त्यांची सविस्तर मुलाखत आल्यावर उद्याच स्पष्ट होणार आहे.

राज्यात वीजबिलाच्या प्रश्नावरून वातावरण पेटतंय. भाजपच्या काही नेत्यांना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे कमी ऊंचीचे नेते वाटतात. त्यांची कुवत नाही. ते लोकनेतेच नाहीत, असं भाजपला वाटत आहे, असा सवालही राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला. राऊत हे प्रश्न विचारत असताना मुख्यमंत्री दाढी खाजवताना दिसत आहेत. मात्र, त्यानंतर त्यांनी या मुद्द्यावरून भाजप नेत्यांची पिसे काढल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी काय चिमटे काढलेत याचा सस्पेन्स उद्याच संपुष्टात येणार आहे.

 

संबंधित बातम्या:

‘कोणी कितीही आडवे आले तरी त्यांना आडवे करुन महाराष्ट्र पुढे जाईल’, मुख्यमंत्र्यांच्या ‘सामना’तील अभिनंदन मुलाखतीचा प्रोमो प्रदर्शित

EXCLUSIVE : फडणवीस म्हणाले, तुमच्यासोबत कोण, दादा म्हणाले धनंजय मुंडे, सुनील शेळके, संदीप क्षीरसागरसह 28 जण!

रोहित पवारांना बळ, पार्थ पवारांना डावललं, पवार कुटुंबात सारं काही अलबेल नाही?; ‘या’ पुस्तकातील खळबळजनक दावे

(CM Uddhav Thackerays Special Interview, Sanjay raut asked three question)