‘मी मंत्रीपदाची मागणी केलेली नाही, जी जबाबदारी देतील ते पार पाडेन’, नाना पटोलेंकडून स्पष्ट

| Updated on: Jun 30, 2021 | 4:47 PM

नुकत्याच पार पडलेल्या दिल्लीवारीनंतर नाना पटोले यांनी आपला स्वबळाचा नारा काहीसा बाजूला ठेवल्याचं पाहायला मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्यावर कोणताही मंत्री नाराज नसल्याचं म्हटलंय.

मी मंत्रीपदाची मागणी केलेली नाही, जी जबाबदारी देतील ते पार पाडेन, नाना पटोलेंकडून स्पष्ट
Nana Patole
Follow us on

मुंबई : ‘मी मंत्रिपदाची मागणी केली नाही. जी जबाबदारी देतील ते पार पाडेन. माझ्यावर कोणताही मंत्री नाराज नाही’, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय. सत्ताधारी महाविकास आघाडीतील घटकपक्ष आगामी विधानसभा निवडणूक एकत्र आणि जोमाने लढतील, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं होतं. मात्र, काँग्रेस आगामी महापालिका आणि विधानसभा निवडणूक स्वबळावरच लढेल असं नाना पटोले सातत्याने सांगत होते. मात्र नुकत्याच पार पडलेल्या दिल्लीवारीनंतर नाना पटोले यांनी आपला स्वबळाचा नारा काहीसा बाजूला ठेवल्याचं पाहायला मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्यावर कोणताही मंत्री नाराज नसल्याचं म्हटलंय. (Nana Patole’s explanation regarding the demand for the post of Minister)

राज्यपालांच्या पत्रावर पटोलेंचा टोला

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचं शिष्टमंडळ राज्यपालांना भेटलं होतं. त्यावेळी त्यांनी दिलेल्या निवेदनातील तिनही विषय महत्वाचे असल्याचं एक पत्र राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे. राज्यपालांच्या या पत्रावरुन नाना पटोले यांनी राजपाल आणि भाजपवर खोचक शब्दात टीका केलीय. राजभवन हे एकप्रकारे भाजपचं कार्यालय झालंय. देशात पहिल्यांदाच असं चित्र पाहायला मिळत आहे. राज्यपाल हे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते असल्याप्रमाणे वागत आहेत, असा घणाघात पटोले यांनी केलाय.

त्याचबरोबर राज्यपाल हे संविधानिक पद आहे आणि त्याचा सन्मान आहेच. राज्यपालांचे काम काय असतं हे मला सांगण्याची गरज नाही. राज्यपालांच्या सांगण्यावरुन विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक लावली जात आहे, हे सांगण्याचं काम भाजप करत आहे. विधानसभा अध्यक्ष निवडणूक पावसाळी अधिवेशनातच होणार, येत्या 5 तारखेला विधानसभा अध्यक्षाच्या नावाची घोषणा होईल असं सांगतानाच काँग्रेसमध्ये कुठलीही अंतर्गत नाराजी नसल्याचा दावाही पटोले यांनी केलाय.

‘केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात नवं धोरण’

केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात नवे धोरण आम्ही अधिवेशनात मांडणार आहोत. महाविकास आघाडीत कुठलीही नाराजी नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काल वर्षा निवासस्थानी बैठक झाली. यात अधिवेशन आणि अन्य विषयांवर चर्चा झाल्याचं पटोले म्हणाले.

राज्यपालांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज पत्र लिहिलं आहे. या पत्रात राज्यपाल म्हणतात, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं शिष्टमंडळ 23 जून रोजी मला भेटलं. त्यांनी दोन निवेदने मला दिली आहेत. त्यामध्ये त्यांनी विधानसभा अधिवेशनाचा कालावधी वाढवणे, विधानसभा अध्यक्षांची निवड आणि ओबीसी आरक्षण प्रलंबित असल्याने जिल्हा परिषद निवडणुका स्थगित करा, या मागण्या केल्या आहेत. हे तीनही विषय महत्त्वाचे आहेत. त्यावर योग्य कारवाई करुन, याबाबत मला कळवा” असं राज्यपालांनी म्हटलं आहे.

संबंधित बातम्या :

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक बहुमतापेक्षा जास्त मताने जिंकू, मलिकांचा दावा, राज्यपाल कोश्यारींना टोला

विधानसभा अध्यक्ष निवडणूक : काँग्रेसने आता नावही फोडलं? अध्यक्षपदासाठी पुण्यातील आमदार आघाडीवर

Nana Patole’s explanation regarding the demand for the post of Minister