उद्धव ठाकरे यांनी आता ‘या’ नावाने पक्ष काढावा, आमची हरकत नाही.. शिंदे गटाच्या मंत्र्याचा सल्ला काय?

उद्धव ठाकरे एकाधिकारशाहीने वागले. पक्षाच्या घटनेत जी दुरूस्ती केली, त्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी घेतलेली नाही. आम्ही लोकशाहीच्या मार्गाने गेलो, अशी प्रतिक्रिया या मंत्र्याने दिली आहे.

उद्धव ठाकरे यांनी आता या नावाने पक्ष काढावा, आमची हरकत नाही.. शिंदे गटाच्या मंत्र्याचा सल्ला काय?
Image Credit source: social media
| Updated on: Feb 18, 2023 | 10:35 AM

सदीप राजगोळकर, नवी दिल्लीः निवडणूक आयोगाने (Election commission) शिवसेना (Shivsena) पक्षाचं नाव आणि पक्षाचं चिन्ह एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे राहील, असा निर्णय दिल्यानंतर उद्धव ठाकरे अत्यंत वैफल्यग्रस्त झाले आहेत. काल प्रतिक्रिया देताना त्यांनी अनेकदा जीभ घसरली. त्यांनी आता ठाकरे नावाचा पक्ष काढावा, असा सल्ला शिंदे गटाचे अर्थान शिवसेनेचे मंत्री दीपक केसरकर यांनी दिला आहे. शिवसेनेतून बाहेर पडलेल्यांनी आतापर्यंत कधीही ठाकरे नावाने पक्ष काढलेला नाही. राज ठाकरे तसेच इतर नेत्यांनीही हे नाव वापरलं नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना हे नाव वापरण्यास हरकत नाही, असा खोचक सल्ला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिला आहे.

दीपक केसरकर काय म्हणाले?

नवी दिल्लीत टीव्ही 9 शी बोलताना दीपक केसरकर म्हणाले, ‘ हा खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचारांचा विजय आहे. मराठी माणूस, हिंदुत्व हे बाळासाहेबांचे जे मुद्दे आहेत, त्यावर आता आम्ही खुलेपणाने बोलू शकतो. समर्थन देऊ शकतो. याचा मनापासून आनंद आहे.

उद्धव ठाकरे काल जे बोलले ते दुर्दैवी होते. लोकशाहीचा गळा खऱ्या अर्थानं कुणी घोटला असेल तर इलेक्शन कमिशनच्या निकालात उत्तर मिळेल. २०१८ मध्ये जी त्यांनी दुरूस्ती केली, ती डेमोक्रेटिक नाही, असं स्पष्ट शब्दात म्हटलंय. आम्हालाही सांगितलंय जी दुरुस्ती बदला, असं सांगण्यात आलं, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

उद्धव ठाकरे एकाधिकारशाहीने वागले. पक्षाच्या घटनेत जी दुरूस्ती केली, त्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी घेतलेली नाही. आम्ही लोकशाहीच्या मार्गाने गेलो. लोकशाही जिवंत ठेवण्यात फार मोठं योगदान शिंदे साहेबांचं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं शिवसेना संपवण्याचा डाव होता, त्याला आम्ही चोख उत्तर दिलंय, अशा शब्दात केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली.

उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त…

उद्ध ठाकरेंनी पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगानं शेण खाल्लं.. असं वक्तव्य केलं. यावरून दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. वैफल्यग्रस्त असल्याने काल उद्धव ठाकरे यांनी काल अनेक वेळा जीभ घसरली. जे काही घडलं, त्याचं नैराश्य त्यांना आलंय.

ठाकरे कुटुंबात अनेक लोक आहेत. राज ठाकरे, जयदेव ठाकरे आहेत. त्यामुळे ठाकरे नावाचा पक्ष स्थापन करावा. राजसाहेब बाहेर पडले, तेव्हा त्यांनी ठाकरे नावाचा पक्ष स्थापन केला नाही. यांनाही चॉइस दिला गेला तेव्हा त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे याच नावाने त्यांनी पक्ष स्थापन केला. स्वतःच्या पलिकडे जाऊन ते शिवसैनिक आहेत, हे विसरले आहेत. अनेक शिवसैनिकांचा मिळून शिवसेना बनली आहे, हे ते विसरले आहेत, असं केसरकर यांनी दाखवून दिलंय.