Deepali Sayed : ‘भाजप आमची शत्रू नाही, एकनाथ शिंदे साहेब कालही आदरणीय, आजही आणि उद्याही’, दीपाली सय्यद यांचं ट्वीट

| Updated on: Jul 06, 2022 | 2:43 PM

दीपाली सय्यद यांनी एक ट्वीट करत ही अस्वस्थता बोलून दाखवलीय. भाजप आपली शत्रू नाही, त्यांच्या विरुद्ध आम्हाला बोलण्यास आनंदही नाही, परंतु वाचाळविरांना माफी मिळणार नाही, असं सय्यद म्हणाल्या.

Deepali Sayed : भाजप आमची शत्रू नाही, एकनाथ शिंदे साहेब कालही आदरणीय, आजही आणि उद्याही, दीपाली सय्यद यांचं ट्वीट
दिपाली सय्यद, नेत्या, शिवसेना
Image Credit source: Google
Follow us on

मुंबई : राज्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात नवं सरकार स्थापन झालंय. 11 जुलैच्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीनंतर मंत्रिमंडळ विस्ताराचीही शक्यता आहे. अशावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि एकनाथ शिंदे गटातील आमदारांमध्ये टीका आणि आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. त्यातच शिवसेना नेत्या दीपाली सय्यद (Deepali Sayed) यांची मात्र चांगलीच कोंडी सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. दीपाली सय्यद यांनी एक ट्वीट करत ही अस्वस्थता बोलून दाखवलीय. भाजप आपली शत्रू नाही, त्यांच्या विरुद्ध आम्हाला बोलण्यास आनंदही नाही, परंतु वाचाळविरांना माफी मिळणार नाही, असं सय्यद म्हणाल्या.

मला माननीय एकनाथ शिंदे साहेब कालही आदरणीय होते, आजही आदरणीय आहेत आणि उद्याही राहतील. पण शिवसेनेच्या आमदारांना ढाल समजून किरीट सोमय्या आणि भाजपचे दोन अन्य वाचाळवीर आदरणीय उद्धवसाहेब आणि शिवसेनेवर टीका करतील तर त्यांना एवढंच सांगणं आहे की आमच्यातील शिवसेना आजही जिवंत आहे. उगाच कळ काढू नका. आदरणी शिंदे साहेबांनी भाजपवर दाखवलेल्या विश्वासाला तडा देऊ नका. भाजप आमची शत्रू नाही. परंतु वाचाळवीरांना माफी मिळणार नाही. भविष्यात काय होईल माहिती नाही, पण भाजपने याची दखल घेणे गरजेचे आहे, असं ट्वीट दीपाली सय्यद यांनी केलंय.

‘राजकारण संपवुन शिवसेनेचे समाजकारण सुरू करावे’

दरम्यान, शिंदे यांच्या बंडाळीनंतरही दीपाली सय्यद यांची चलबिचल जाणवत होती. त्यांनी ती माध्यमांसमोरही बोलून दाखवली. तसंच ट्वीटच्या माधम्यातूनही त्यांनी आपलं मत व्यक्त केलं होतं. काहीजण म्हणतात आदरणीय उद्धव साहेब जिंकले तर काहीजण बोलतात आदरणीय शिंदेसाहेब जिंकले.यासर्व घटनेत शिवसैनिक हरला त्याला कळत नाही की हि भुमिका शिवसेनेची कि ती. शिवसेनेच्या सर्व नेत्यांनी शिवसैनिकाला सांभाळावे आणि हे राजकारण संपवुन शिवसेनेचे समाजकारण सुरू करावे. जय महाराष्ट्र, असं सय्यद म्हणाल्या होत्या.