Devendra Fadnavis : ‘विरोधकांची लाईन डेड, म्हणून त्यांना डेडलाईन हवी’ मंत्रिमंडळ विस्तारावरुन फडणवीसांचं प्रत्युत्तर
Devendra Fadnvis : यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांनाही टोला लगावला.
मुंबई : ‘विरोधकांची लाईन डेड झाली आहे म्हणून ते डेडलाईन मागतायत’ असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. तिसऱ्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मंत्रिमंडळ विस्तारावरुन विचारण्यात आलेल्या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलंय. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अद्याप मंत्रिमंडळ (Eknath Shinde Devendra Fadnavis Government Cabinet Expansion) विस्तार केलेला नाही. त्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली आहे. मंत्रिमंडळ (Maharashtra Cabinet Expansion) विस्तार कधीपर्यंत होणार, याची काही डेडलाईन असणार आहे का? असा प्रश्न विरोधकांकडून विचारला जात असल्याची टीका केली जात होती. अशातच मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारलं. त्याला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी टोला हाणलाय. पराभव समोर दिसत असल्यानं अजित पवारांकडून टीका करण्याचं काम सुरु आहे, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मंत्रिमंडळ विस्तारावरुन सुरु असलेल्या कुजबूज आणि चर्चांवर उत्तर दिलंय. लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल. पालकमंत्रीही लवकरच जाहीर केले जातील, असं एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटलं आहे. विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची गरज नाही, असंही ते म्हणाले आहेत.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांनाही टोला लगावला. त्यांना रोज सकाळी उठून तेच काम असतं, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी निशाणा साधला. विरोधकांचा जसंवाटतं, तशी कोणतीही अडचण नाही, असं स्पष्टीकरणही एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिलं.
पाहा व्हिडीओ :
मंत्रिमंडळ बैठकीनंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत नामातरांचा महाविकास आघाडीने घेतलेला निर्णय कायम ठेवण्यात आल्याचं यावेळी जाहीर करण्यात आली. मंत्रिमंडळ बैठकीत नेमके कोणकोणते निर्णय झाले, त्यावर एक नजर टाकुयात…
मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय
- औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर होणार
- उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण केलं जाणार
- नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ असे नामकरण होणार
- एमएमआरडीएला 60 हजार कोटींचे कर्ज उभारण्यास तत्वतः मान्यता.
- एमएमआरडीएला पहिल्या टप्प्यात 12 हजार कोटींच्या रकमेस शासन हमी देणार