देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर दिल्लीत दाखल; दिल्ली दरबारी भाजपची काय खलबतं होणार?

| Updated on: Aug 08, 2021 | 7:02 PM

महाराष्ट्रातील भाजप नेत्यांची दिल्ली दरबारी होणारी खलबतं लक्षात घेता मोठ्या राजकीय हालचालींची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर राज्यात भाजपमध्ये मोठे संघटनात्मक बदल होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. दरम्यान, प्रदेशाध्यक्ष किंवा संघटनात्मक बदलांची शक्यता भाजप नेत्यांकडून मात्र फेटाळण्यात आली आहे

देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर दिल्लीत दाखल; दिल्ली दरबारी भाजपची काय खलबतं होणार?
देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर दिल्लीत दाखल
Follow us on

मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे दिल्ली दरबारी दाखल झाले आहेत. त्यांच्या पाठोपाठ आज विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, निरंजन डावखरेही दिल्लीत पोहोचले आहेत. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांची दिल्ली दरबारी होणारी खलबतं लक्षात घेता मोठ्या राजकीय हालचालींची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर राज्यात भाजपमध्ये मोठे संघटनात्मक बदल होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. दरम्यान, प्रदेशाध्यक्ष किंवा संघटनात्मक बदलांची शक्यता भाजप नेत्यांकडून मात्र फेटाळण्यात आली आहे. (Devendra Fadnavis, Praveen Darekar arrives in Delhi)

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी महाराष्ट्रातील खासदारांची उद्या बैठक होणार आहे. नवनिर्वाचित केंद्रीय मंत्र्यांसोबतही एक बैठक पार पडणार आहे. त्यात महाराष्ट्रातील प्रश्नाबाबत चर्चा होईल, अशी माहिती प्रवीण दरेकर यांनी दिल्लीत दाखल झाल्यानंतर दिली आहे. दरम्यान, अमित शाह यांच्यासोबतही एक बैठक होणार आहे का? असा प्रश्न विचारला असता, अमित शाह यांच्यासोबत बैठक आहे की नाही, याची माहिती आपल्याला नसल्याचं त्यांनी सांगितलं. मला फक्त रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी होणाऱ्या बैठकीची माहिती आहे, असं दरेकर म्हणाले.

प्रदेशाध्यक्ष बदलाचा विचारही नाही- पाटील

चंद्रकांत पाटील कालपासून दिल्लीत आहेत. आज त्यांनी उद्योगमंत्री नारायण राणे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. भाजपचा प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या चर्चा फक्त मीडियात आहेत. आमच्या पक्षात तशी चर्चा नाही. प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा विचारही नाही. खरं तर भाजप काय आहे हे तुम्हाला कळलं नाही. सर्वसामान्य माणसांनाही भाजप समजली पाहिजे, असं सांगतानाच दर तीन वर्षाने आमच्या पक्षात फेरबदल होतो. अगदी ग्रासरुटच्या पदापासून ते राष्ट्रीय अध्यक्षपदापर्यंत हा बदल होत असतो, असं पाटील म्हणाले. काँग्रेसला वर्षभरापासून पक्षाध्यक्ष मिळत नाही. भाजपमध्ये तसं नाही. त्यामुळे भाजपचा प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याच्या या निव्वळ चर्चा असून त्यात काही तथ्य नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

दौऱ्यामागे राजकीय हेतू नाही

यावेळी पाटील यांनी दिल्लीत येण्याविषयीचं कारणही स्पष्ट केलं. पहिल्यांदाच केंद्रात राज्याला जास्त मंत्रीपदे मिळाली आहेत. त्यामुळे राज्यातील मंत्र्यांचं अभिनंदन करण्यासाठी दिल्लीत आलो. त्यांच्या मतदारसंघात जाऊन या मंत्र्यांचं अभिनंदन करणार आहेच. पण दिल्लीत येऊनही त्यांचं अभिनंदन करणं आवश्यक होतं. त्यामुळे मी दिल्लीत आलोय. दिल्ली दौऱ्यामागे काहीच राजकीय हेतू नाही, असं सांगतानाच या मंत्र्यांची खाती समजून घेतली. त्याचा राज्याला कसा फायदा होईल, यावरही या भेटीत चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

ओबीसींना आरक्षण द्या, भाजपचा आघाडीला डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम; मंत्र्यांना दिला ‘हा’ इशारा

NDAतून बाहेर पडलेली शिवसेना आता UPAमध्ये जाणार? भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य

Devendra Fadnavis, Praveen Darekar arrives in Delhi