‘शिवसेना सत्तेसाठी मिंधी, कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलन’, फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

| Updated on: Feb 02, 2021 | 5:40 PM

शरजील उस्मानीविरोधात विधान सभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस चांगलेच आक्रमक झाले आहेत.

शिवसेना सत्तेसाठी मिंधी, कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलन, फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना इशारा
देवेंद्र फडणवीस
Follow us on

मुंबई : ‘हिंदू समाज पूर्णत: सडका बनलाय’, असं वक्तव्य करणाऱ्या शरजील उस्मानीविरोधात विधान सभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस चांगलेच आक्रमक झाले आहेत. हिंदू काय रस्त्यावर पडले आहेत का? या राज्यात काय मोगलाई आहे का? सरकारला लाज वाटायला हवी. गृहमंत्री म्हणतात आम्ही चौकशी करु. सगळ समोर असताना, व्हिडीओ व्हायरल होत असताना कसली चौकशी करता? तात्काळ गुन्हा दाखल करुन त्याला अटक करा, अशी आक्रमक मागणी फडणवीसांनी केलीय.(Devendra Fadnavis warns Chief Minister after Sharjeel Usmani’s controversial statement)

फडणवीसांचा निर्वाणीचा इशारा

‘असा कुठला सडक्या डोक्याचा इसम महाराष्ट्रात येऊन हिंदूंना सडका म्हणत असेल आणि सरकार त्याच्यावर कारवाई करत नसेल तर भाजप स्वस्थ बसणार नाही. तात्काळ गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली नाही तर त्याविरोधात आम्ही आंदोलन करु,’ असा निर्वाणीचा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला दिलाय. एल्गार परिषद ही फक्त आग ओकण्याकरता, समजात तेढ निर्माण करण्यासाठी होते, असं माहिती असूनही परवानगी कशी मिळते. या परिषदेत हिंदूंच्या विरोधात बोललं जात आहे ते सरकारच्या मर्जीनं बोललं जात आहे का? असा सवालही फडणवीसांनी केलाय.

शरजील उस्मानी याच्या वक्तव्याला 48 तास उलटून गेले तरी शिवसेनेचा एकही नेता त्याबाबत बोलला नाही. त्याबाबत बोलताना शिवसेना सत्तेला मिंधी झाली आहे. शिवसेना सत्तेला नतमस्तक झालीय. म्हणून ते यावर बोलूच शकत नाहीत, असा घणाघातही फडणवीसांनी केलाय.

फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

एक युवक राज्यात येतो, छातीठोकपणे हिंदुत्वावर शिंतोडे उडवतो आणि डोक्यावर मिरे वाटून निघून जातो आणि त्यावर काहीही कारवाई होत नाही, हा प्रकार अतिशय आश्चर्यजनक आहे. समस्त राज्याच्या चिंता वाढविणारा आहे आणि सर्वांच्या माना शरमेने खाली घालायला लावणारा आहे. मला आशा आहे की, हे पत्र मिळताच त्याच्यावर गुन्हा दाखल करुन, शरजिलच्या मुसक्या आवळत महाराष्ट्रात आणून, अशा विधानांचे परिणाम काय असतात, यासंदर्भात कायदेशीर कारवाई करुन त्याला अद्दल घडवाल, अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

त्याचबरोबर “खरे तर एल्गार परिषदेच्या माध्यमातून गेल्याही कालखंडात काय झाले, याची जाणीवर असताना, अशा आयोजनांना पुन्हा परवानगी देणे, किती चूक होते, हेच शरजिलच्या विधानांतून दिसून येते. एखाद्या आयोजनाला परवानगी दिली, म्हणजे त्यात झालेले सारे प्रकार सुद्धा खपवून घ्यायचे, ही भूमिका योग्य नाही. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात कुणीही यावे आणि अशी विधाने करुन वातावरण खराब करावे, हे आम्हाला मान्य नाही. ते आपल्यालाही मान्य नसेल, अशी अपेक्षा आम्ही महाराष्ट्रातील जनता आणि समस्त हिंदू समाज करतोय,” असं आवाहनही फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केलं आहे.

शरजिल उस्मानी नेमकं काय म्हणाला?

‘भारतात स्वत:ला राष्ट्रवादी म्हणवून घ्यायचं असेल तर दोन मुद्दे आहेत. एक म्हणजे तुम्हाला म्हणावं लागेल की काश्मीर आमचा अविभाज्य भाग आहे आणि दुसरं म्हणजे पाकिस्तान मुर्दाबाद. तर तुम्ही राष्ट्रवादी आहात. तुम्ही त्या व्याख्येत बसता. पाकिस्तानातही अशीच एखादी व्याख्या असेल. साऊत आफ्रिकेतही असेल. मी राष्ट्रवादाला मानत नाही. आजचा हिंदू समाज, हिंदुस्तानात हिंदू समाज वाईटरित्या सडला आहे. जुनैदला चालत्या रेल्वेमध्ये एक गर्दी 31 वेळा चाकू मारुन त्याची हत्या करते. तेव्हा कुणी अडवायला येत नाही. ते लोक तुमच्या आणि आमच्यातून येतात. हे लोक जे मॉब लिंचिंग करतात ते हत्या करण्याव्यतीरिक्त आपल्या घरी जाऊन काय करत असतील? हे लोक असं काय करतात की हत्या करुन आल्यानंतर ते आपल्यासोबत बसतात, उठतात, जेवण करतात, सिनेमा पाहायलाही जातात. पुन्हा दुसऱ्या दिवशी कुणाला तरी पकडतात, पुन्हा हत्या करतात आणि पुन्हा नॉर्मल लाईफ जगतात. ते प्रेम करतात, वडिलांचे आशीर्वाद घेतात. मंदिरात पूजाही करतात. पण पुन्हा बाहेर येऊन तेच करतात. हे सर्व इतक्या सहतेनं सुरु आहे की, लिंचिंग होतेय काही हरकत नाही. यापूर्वी मुस्लिम व्यक्तीची हत्या करण्यासाठी एखादं कारण दिलं जात होतं. तो एखाद्या दहशतवादी संघटनेशी जोडलेला आहे. तो सीमीचा सदस्य आहे. या बॉम्बस्फोटाशी त्याचा संबंध आहे. आता मात्र कुठल्याही कारणाची गरज नाही. मुस्लिम आहे मारुन टाकू’,  असं वक्तव्य शरजिल याने एल्गार परिषदेत केलं आहे. आणि त्याच्या याच वक्तव्यावरुन पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या :

हिंदू समाज सडका झालाय म्हणणाऱ्या शरजिल उस्मानीविरोधात भाजपची तक्रार

हिंदू समाज सडका झालाय म्हणणारा शरजिल उस्मानी कोण आहे?

Devendra Fadnavis warns Chief Minister after Sharjeel Usmani’s controversial statement