शिंदेंच्या शिवसेनेसोबत युती करू नका… भाजपमध्ये प्रवेश करताच पहिल्याच दिवशी बड्या नेत्याची मागणी; युतीत तणातणी वाढणार?

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्याच दिवशी गोरंट्याल यांनी मोठी मागणी केली आहे. त्यामुळे शिवसेना भाजप युतीमध्ये मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे.

शिंदेंच्या शिवसेनेसोबत युती करू नका... भाजपमध्ये प्रवेश करताच पहिल्याच दिवशी बड्या नेत्याची मागणी; युतीत तणातणी वाढणार?
devendra fadnavis and eknath shinde
| Updated on: Jul 31, 2025 | 7:52 PM

काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे जालन्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्याच दिवशी गोरंट्याल यांनी मोठी मागणी केली आहे. त्यामुळे शिवसेना भाजप युतीमध्ये मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर कैलास गोरंट्याल यांनी नेमकं काय म्हटलं ते सविस्तर जाणून घेऊयात.

भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या निर्णयावर बोलताना कैलास गोरंट्याल म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी ऑपरेशन सिंदूरमध्ये जी भूमिका घेतली त्याने मी प्रभावित झालो आणि मी भाजपमध्ये येण्याचा निर्णय घेतला. प्रणिती शिंदे यांना काय बोलायचंय ते बोलू द्या, पण मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे, मोदींनी काम भारी केलंय.

अर्जुन खोतकरांना प्रत्युत्तर

शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी कैलास गोरंट्याल यांना गद्दार असं म्हटलं आहे. यावर बोलताना गोरंट्याल म्हणाले की, ‘माझ्यावर अर्जून खोतकरांनी आरोप केलेत, महापालिकेचा मुद्दा काढला, भ्रष्टाचारचा आरोप केला, असं काही नाही. अर्जून खोतकर यांनी विलासराव देशमुख असताना कांग्रेस मध्ये जाण्याचा प्रयत्न केला, नारायण राणेंसोबत गेला, मग खरा गद्दार कोण आहे?

गँगस्टरमध्येही नियम असतात की फॅमिलीवर जायचं नाही, पण हा माझ्या फॅमिलीवर गेला आत्ता मी यांच्या फॅमिलीवर जाणार. माझ्याकडे याच्या 10 प्रकरणांच्या फाईल्स आहेत, त्यांची आई कासाबाईच्या नावाने फ्लॅट, हिरानंदानीला घर घेतलं, 22 वर्षाचा जावई आहे तो अंडर 19 खेळला. या माणसामागे दोनदा ईडी लावली.’ असं गोरंट्याल यांनी म्हटलं आहे.

पन्नास खोके एकदम ओके घोषणेवर स्पष्टीकरण

गोरंट्याल यांनी पन्नास खोके एकदम ओके अशी घोषणाबाजी केली होती. यावर बोलताना त्यांनी, ‘मी एक शायर आहे. पन्नास खोके एकदम ओके तेव्हा बोललो होतो तेव्हा परिस्थिती वेगळी होती, आत्ता वेगळी आहे. गम के आंसुओं पर संभव कर चलनी पडता हैं ये दुनिया हैं, यहां चेहरा सजा कर चलनी पडता हैं, सियासत साजिशों की चाल हैं यहाँ हर चाल सें बच के चलनी पडता हैं असं स्पष्टीकरण दिलं आहे.

शिवसेनेसोबत युती नको…

पुढे बोलताना गोरंट्याल म्हणाले की, ‘यापूर्वीही माझ्यावर आरोप करण्यात आले होते. देवेंद्र फडणवीस यांना सगळं माहीत आहे. खोतकरांना नगरपालिका कळत नाही. त्यांच्या शुभेच्छा नको मला, त्यांना सांगा शुभेच्छा परत घ्या. मनपात जालन्यात 40 जागा येतील, शिवसेनेसोबत युती करू देऊ नका अशी फडणवीस यांना गळ घातलीये. जालन्यात भाजपचा महापौर बसवायचाय. शिवसेना सोडून सगळ्यांना सोबत नेणार असंही गोरंट्याल यांनी म्हटलं आहे.