उद्घाटनाला येतो पण विरोधी पक्षनेता म्हणू नको; अजित पवार नगरच्या कार्यक्रमात असं का म्हणाले?

| Updated on: Sep 03, 2022 | 1:07 PM

शिवसेना स्थापन झाल्यापासून बाळासाहेबांनी शिवाजी पार्कवर सभा घेतल्या. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेना चालेल असं बाळासाहेबांनी सांगितले. ज्यांच्या हातात पॉवर आहे ते पाहिजे तशा गोष्टी करतात.

उद्घाटनाला येतो पण विरोधी पक्षनेता म्हणू नको; अजित पवार नगरच्या कार्यक्रमात असं का म्हणाले?
उद्घाटनाला येतो पण विरोधी पक्षनेता म्हणू नको; अजित पवार नगरच्या कार्यक्रमात असं का म्हणाले?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नगर: राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (ajit pawar) जिथे जातात तिथे एकही मिश्किल टिप्पणी केल्याशिवाय राहत नाहीत. राज्यातील परिस्थिती आणि बदलत्या राजकीय समीकरणावर अजितदादांची कोटी होत नाही, असं कधी होत नाही. आता हेच पाहा ना, अजितदादा आज श्रीगोंद्यात (shrigonda) होते. एका कार्यक्रमानिमित्ताने आले होते. यावेळी त्यांनी कार्यक्रम आटोपला आणि जनतेशी संवादही साधला. त्यावेळी एकाने त्यांना दादा, तुम्ही उद्घाटनाला या, असं आवतन दिलं. त्यावर अजितदादांनी मिश्किल कोटी केली. हो रे बाबा. मी येतो. मात्र विरोधी पक्षनेता (opposition leader) म्हणू नको. आता कधी काय होईल सांगता येत नाही. त्यांच्या मनात आलं आणि 20 लोक घेऊन गेले, आता सर्वत्र ओके ओके सुरू आहे, अशी कोटी अजित पवार यांनी करताच एकच खसखस पिकली.

पारगाव सुद्रीक विकास सोसायटी नवीन इमारतीचे अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी त्यांनी ही कोटी केली. या भागात पाणी कसे येईल यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. अनेकवेळा पुणे ,नगर, सोलापूर जिल्हा असा पाण्याचा वाद होतो. पण शेवटी आपण शेतकरी आहोत. पाणी जर व्यवस्थित मिळाले तर काय चमत्कार होतो हे आपल्याला माहीत आहे, असं अजित पवार म्हणाले. यावेळी त्यांनी आमदार निलेश लंके यांचं कौतुक केलं. निलेश लंके उत्तम पद्धतीने काम करत आहेत. कोरोनाच्या काळात त्यांनी अनेकांचे जीव वाचवले, असं ते म्हणाले.

शेतावर फेरफटका मारतोच

इथे आमची जागा आली नाही. निवडून येऊ की नाही अशी घनश्याम शेलार यांना शंका होती. त्यामुळे राहुल जगताप देखील उभे राहिले नाही, असंही त्यांनी सांगितलं. यावेळी अजित पवारांनी टोमॅटो लागवडीचा किस्साही सांगितला. मी टोमॅटो लागवडीवर मोठा झालो. मी जर काठेवाडीला गेलो तर शेतावर फेरफटका मारल्याशिवाय करमत नाही, असंही ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

राज्यपाल म्हणाले, करतो, बघतो

लोकशाही पद्धतीने आलेल्या आमच्या सरकारने कॅबिनेटचा ठराव करून विधान परिषदेवर नियुक्त करण्यासाठी 12 सदस्यांची यादी राज्यपालांना पाठवली होती. आम्ही अनेकजण राज्यपालांना भेटायला गेलो होतो. त्यावेळी त्यांनी बघतो, करतो असं सांगितलं. पण काय झालं नाही. मग आता आम्ही टीका टिप्पणी करणारच. जनतेने ठरवायचं हे लोकशाही पद्धतीने चालला आहे का?, असा सवाल करत त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका केली.

वाद घालून चालणार नाही

यावेळी त्यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरही भाष्य केलं. शिवसेना स्थापन झाल्यापासून बाळासाहेबांनी शिवाजी पार्कवर सभा घेतल्या. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेना चालेल असं बाळासाहेबांनी सांगितले. ज्यांच्या हातात पॉवर आहे ते पाहिजे तशा गोष्टी करतात. आधी एकाचा आणि नंतर दुसऱ्याचा कार्यक्रम होईल. वाद घालून चालणार नाही. मात्र जनता कोणाच्या पाठीशी आहे हे शिवाजी पार्कची सभा झाल्यानंतरच कळेल. निवडणूक झाल्यानंतर कळेल कोणाची शिवसेना खरी, असा टोला त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.

कॅमेरे घेऊन जात नाही

गणेशोत्सवाची परंपरा फार जुनी आहे. आम्ही सुद्धा दरवर्षी गणपतीच्या दर्शनाला जातो. मात्र, तुमच्यासारखे कॅमेरे घेऊन जात नाही. पूर्वी काहीजण शो मॅन होते तसे काही जण आता दिसत आहेत, असं त्यांनी सांगितलं.