महाविकासआघाडीला मोठा धक्का; पदवीधर-शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपची बाजी?; एक्झिट पोलचा अंदाज

| Updated on: Dec 01, 2020 | 9:05 PM

एक्झिट पोलचा हा अंदाज खरा ठरल्यास हा महाविकासआघाडी सरकारसाठी मोठा धक्का असेल. | graduate constituency elections 2020

महाविकासआघाडीला मोठा धक्का; पदवीधर-शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपची बाजी?; एक्झिट पोलचा अंदाज
cm uddhav thackeray- devendra fadnavis
Follow us on

मुंबई: गेल्या महिनाभरापासून संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पदवीधर आणि शिक्षण मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान झाले. यानंतर ‘पोल डायरी’ने या निवडणुकीचा एक्झिट पोल (Exit Poll) जाहीर केला. यामध्ये पुणे, औरंगाबाद आणि नागपूर या तीन पदवीधर मतदारसंघांमध्ये भाजपच्या (BJP) विजयाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पुणे शिक्षक मतदारसंघातही भाजपलाच यश मिळेल. तर अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेचा (Shiv sena) विजय होण्याचा अंदाज या एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे. (graduate and teachers constituency elections 2020 exit poll)

‘पोल डायरी’ने पुण्यात भाजपच्या विजयाची शक्यता वर्तवली असली तरी पुणे पदवीधर मतदारसंघातील लढत खूपच चुरशीची होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुण्यात भाजपचा 100 टक्के विजय होईलच, अशी खात्री देण्यात आलेली नाही. तर धुळे-नंदुरबार या स्थानिक स्वराज्य संस्थेतील एका जागेवरही भाजपचा झेंडा फडकणार असल्याचे ‘पोल डायरी’च्या EXIT Poll मध्ये म्हटले आहे. मराठवाडा आणि नागपूर पदवीधर मतदारसंघाचे निकाल पहिल्या फेरीतच स्पष्ट होतील. तर पुणे पदवीधर मतदारसंघात मात्र निकाल स्पष्ट होण्यासाठी दुसऱ्या फेरीची वाट पाहावी लागू शकते, असा जाणकारांचा अंदाज आहे.

एक्झिट पोलचा हा अंदाज खरा ठरल्यास हा महाविकास आघाडी सरकारसाठी मोठा धक्का असेल. महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे ही निवडणूक लढवल्याने भाजपसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते.  भाजपने एकट्याने हे आव्हान परतवून लावल्यास विरोधी पक्षाच्या आत्मविश्वासात भर पडेल.

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत विक्रमी मतदान

राज्यातील औरंगाबाद, पुणे आणि नागपूर या तीन पदवधीर आणि पुणे आणि अमरावती शिक्षक मतदारसंघांसाठी आज मतदान झाले. सुरुवातीच्या टप्प्यात मतदानाचा वेग अत्यंत संथ होता. मात्र, संध्याकाळ उलटेपर्यंत ही परिस्थिती पूर्णपणे पालटली. औरंगाबाद, पुणे आणि नागपूर तिन्ही पदवीधर मतदारसंघांमध्ये विक्रमी मतदानाची नोंद झाली आहे. त्यामुळे येथील प्रस्थापित उमेदवारांना धक्का बसण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून वर्तविण्यात आली आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघातील संग्राम देशमुख आणि अरुण लाड यांच्यातील लढत सर्वाधिक लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे. यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. याशिवाय, या मतदारसंघात जवळपास 63 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने ही लढत चांगलीच चुरशीची झाली होती.

तर नागपूर पदवीधर मतदारसंघही भाजपचा बालेकिल्ला आहे. गेल्या 52 वर्षांपासून नागपूर मतदारसंघातून सातत्याने भाजपचा उमेदवार विजयी होती आहे. तर मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून महाविकासआघाडीचे सतीश चव्हाण हॅटट्रिक करण्याच्या तयारीत आहेत. मात्र, यंदा याठिकाणी विक्रमी मतदान झाल्याने पारडे कोणाच्या बाजूने झुकणार, याची उत्सुकता आता सर्वांना लागली आहे.

संबंधित बातम्या:

विधान परिषद निवडणूक : 19 दिवसांपासून विना शर्ट प्रचार, अपक्ष उमेदवार उपेंद्र पाटलांनी यवतमाळमध्ये वेधले लक्ष

प्रदेशाध्यक्षांनी खाली पाहिलंच नाही, दादांच्या पायाखालची वाळू कधीच सरकली, सतेज पाटलांचा हल्लाबोल

Graduate Constituency Elections : पुणे पदवीधरचे उमेदवार अभिजीत बिचुकलेंना मतदानाआधीच धक्का

(graduate and teachers constituency elections 2020 exit poll)