हायकोर्टाने स्वत: दखल घ्यावी, अर्णव गोस्वामींच्या धक्काबुक्कीची चौकशी करावी : देवेंद्र फडणवीस

| Updated on: Nov 09, 2020 | 3:40 PM

अर्णव गोस्वामी यांना अटक करण्यापासून ते न्यायालयीन कोठडीत त्यांना ज्याप्रकारे वागणूक दिली जात आहे, याबाबत बऱ्याच चर्चा सुरु आहेत. | Devendra Fadnavis

हायकोर्टाने स्वत: दखल घ्यावी, अर्णव गोस्वामींच्या धक्काबुक्कीची चौकशी करावी : देवेंद्र फडणवीस
Follow us on

मुंबई: रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांच्यासाठी आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मैदानात उतरले आहेत. फडणवीस यांनी सोमवारी ट्विट करुन अर्णव गोस्वामी प्रकरणात उच्च न्यायालयाने स्यूमोटो याचिका दाखल करण्याची मागणी केली. अर्णव गोस्वामी यांना अटक करण्यापासून ते न्यायालयीन कोठडीत त्यांना ज्याप्रकारे वागणूक दिली जात आहे, याबाबत बऱ्याच चर्चा सुरु आहेत. या सगळ्याची न्यायालयाने दखल घ्यावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ( Devendra Fadnavis demanded High Court to take suo moto cognizance in Arnab Goswami case)

तर दुसरीकडे उच्च न्यायालयाने सोमवारी झालेल्या सुनावणीत अर्णव गोस्वामी यांचा अंतरिम जामिनासाठीची अर्ज फेटाळला. ना जामिनासाठी सत्र न्यायालयात याचिका करण्यास सांगितलं आहे. त्यामुळे आता अर्णव यांना जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घ्यावी लागणार असून सत्र न्यायालयातून जामीन मिळेपर्यंत त्यांना तळोजा तुरुंगातच राहावे लागेल.

अर्णव गोस्वामी यांच्याकडून सातत्याने पोलिसांकडून आपल्याला मारहाण होत असल्याचे आरोप केले जात आहेत. अलिबागवरून तळोजा तुरुंगात हलवत असताना अर्णव गोस्वामी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. माझा जीव धोक्यात आहे. मला माझ्या वकिलांशी बोलून दिले जात नाही. मला आज सकाळी सहा वाजता उठवण्यात आले. पोलिसांनी मला धक्काबुक्की केली. त्यामुळे माझ्या जीवाला धोका असल्याचे अर्णव गोस्वामी यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले होते.

अर्णव गोस्वामी यांना अटक झाल्यापासून भाजप नेते त्यांना जामीन देण्याची सातत्याने मागणी करत आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेटही घेतली होती. यानंतर आज लगेचच राज्यपालांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी दुरध्वनीवरून चर्चाही केली.

त्यावेळी अर्णव गोस्वामी यांची सुरक्षा आणि आरोग्याबाबत राज्यपालांनी चिंता व्यक्त केली. अर्णव गोस्वामी यांना त्यांच्या कुटुंबीयांना भेटून दिले जावे, असेही त्यांनी सांगितले. याशिवाय, अर्णव गोस्वामी यांच्या घरात ज्याप्रकारे पोलिसांचा फौजफाटा शिरला आणि त्यांना अटक करण्यात आली, याविषयीही राज्यपालांनी गृहमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केल्याचे समजते.

संबंधित बातम्या:

अर्णव गोस्वामींना अंतरिम जामीन नाहीच, कोर्टाने अर्ज फेटाळला; तळोजातील मुक्काम कायम

अर्णव गोस्वामींच्या जीवाला धोका असल्यामुळे राज्यपालांना गृहमंत्र्यांशी बोलावे लागले: राम कदम

राज्यपालांनी अर्णव गोस्वामींची चिंता करु नये, सरकार त्यांची योग्यप्रकारे काळजी घेतेय: भुजबळ