‘मी निवडून येईल की नाही…,’ ठाकरे यांच्या टीकेवर नागेश पाटील आष्टीकर काय म्हणाले ?

उद्धव ठाकरे यांचे सहा खासदार एकनाथ शिंदे यांनी पळवल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी या सहा खासदारांच्या मतदार संघात दौरे सुरु करत तेथील जनतेची माफी मागण्यास सुरुवात केली आहे.

मी निवडून येईल की नाही..., ठाकरे यांच्या टीकेवर नागेश पाटील आष्टीकर काय म्हणाले ?
uddhav thackeray and nagesh patil ashtikar
| Updated on: Jun 27, 2026 | 9:41 PM

शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या ९ खासदारापैकी ६ खासदार शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगर राबवित नुकतेच फोडले. याआधी चार वर्षांपूर्वी देखील एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत उभी फूट पाडू शिवसेनेच्या आमदारांना फोडले आणि महाविकास आघाडीचे सरकारच उलथवून टाकले होते. आता या फूटीनंतर पक्ष आणि चिन्ह देखील एकनाथ शिंदे यांना मिळाले. त्यानंतर नव्या मिळालेल्या मशाल चिन्हावर निवडून आलेले खासदारही शिंदे यांनी पळवल्याने उद्धव ठाकरे यांनी न खचता ज्या खासदाराला पळवले त्यांच्या मतदार संघात आपला दौरा सुरु केला आहे.

आज उद्धव ठाकरे यांच्या विदर्भात सभा झाल्या. त्यात ठाकरे यांनी पळून गेलेल्या खासदारांचा गद्दार असा उल्लेख करीत त्यांच्यावर जहरी टीका केली आहे. या टीकेवर हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी आता प्रतिक्रीया दिली आहे. हिंगोलीचे बंडखोर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेनंतर टीव्ही ९ मराठीशी बोलताना नागेश पाटील आष्टीकर यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे. ते म्हणाले की साहेबांनी काहीही म्हणू द्या, साहेब जे म्हणतील ते सर आँखोपे, मी साहेबांना एकही शब्द उलटून बोलणार नाही असे आष्टीकर यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे यांनी सभेत आष्टीकर यांच्या मुलाला तिकीट घेतल्याचा मुद्दा मांडला होता. त्याविषयी विचारता आष्टीकर यांनी मी म्हणालो तसे केले, मनातून लढलो पण दुर्दैवाने निवडणुकीला थांबू शकलो नाही. नाहीतर आपल्या मुलाचा विजय शंभर टक्के झाला असता अशी प्रतिक्रीया त्यांनी दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी रक्तात गद्दारी भिनलेली असल्याची टीका केली होती. त्यावर बोलताना कोणच्या रक्तावर बोलू नये, कोणी कोणाचे रक्त पाहिले नाही, पण साहेबांवर मी एक शब्दही बोलणार नाही असे आष्टीकर यांनी म्हटले.

हिंगोलीच्या गद्दाराला धडा शिकवण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी या सभेत केले होते. यावर विचारले असता त्यांनी मी साहेबांना सॉरी बोललो आहे.या पेक्षा दुसरे कॉमेंट नाही. मी निवडून येईन की नाही ते काळ आणि वेळच ठरवेले अशीही प्रतिक्रीया खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी दिली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नऊ खासदारांपैकी सहा खासदार ऑपरेशन टायगर राबवून एकनाथ शिंदे यांनी पळवल्यानंतर आता उद्धव ठाकरे या मतदार संघात दौरे करुन जनतेची माफी मागत आहेत.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us