Jayant Patil | ‘केंद्रानं महाराष्ट्रातल्याच नव्हे तर देशभरातल्या ओबीसींचं नुकसान केलंय’

| Updated on: Dec 17, 2021 | 9:30 PM

डोंबिवलीत आयोजित करण्यात आलेल्या शरद महोत्सवावेळी जयंत पाटलांनी भाजपवर निशाणा साधलाय. भाजपने घेतलेली ओबीसी विरोधी भूमिका अनाकलनीय असल्याची टीका त्यांनी यावेळी बोलताना केली आहे.

Jayant Patil | केंद्रानं महाराष्ट्रातल्याच नव्हे तर देशभरातल्या ओबीसींचं नुकसान केलंय
जयंत पाटील
Follow us on

डोंबिवली : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपने महाविकास आघाडीला घेरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.ओबीसी आरक्षण टिकवण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याची टीका ही भाजप नेत्यांकडून केली जातेय. याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपवर पलटवार केलाय. जयंत पाटील यांनी ओबीसी आरक्षणाबाबतचा इम्परिकल डेटा केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात देणे अपेक्षित होतं, असं म्हटलंय. पण दुर्दैवाने लोकसभेमध्ये जे उत्तर केंद्र सरकारने दिलं आहे त्यात इम्परिकल डेटा जवळपास 98 टक्के बरोबर असल्याचा दावा केला होता. त्यानंतर केंद्र सरकारने हा डेटा कोर्टात देताना त्यात बऱ्याच त्रुटी आहेत, असं परस्परविरोधी विधान केल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलंय. इतकंच काय, तर भाजपचे नेते म्हणत आहेत की डेटा उपलब्धच नाही, म्हणजे या सगळ्या भलथापा केंद्र सरकारच्या आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे.

 

‘केंद्राकडून देशभरातल्या ओबीसींचं नुकसान’

केंद्र सरकारवर टीका करताना जयंत पाटील यांनी म्हटलंय की,…

केंद्र सरकारने महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशभरातल्या ओबीसींचं मोठं नुकसान केलंय. ओबीसींचा पुन्हा सर्वे करण्याची पाळी आता केंद्र सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे आलीये. ओबीसी आरक्षण मिळवण्यासाठी राज्य सरकार कुठेही कमी पडणार नाही. मात्र मुद्दामून खोडा घालण्यासाठी केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात, अशी भूमिका घेतली आहे. म्हणून फक्त महाराष्ट्रातच नाही, तर मध्यप्रदेशात देखील ओबीसींचं आरक्षण गेल आहे.उद्या कर्नाटक आणि यूपीमध्ये देखील हीच गोष्ट होणार आहे. त्यामुळे भाजपने ओबीसींच्या विरोधी घेतलेली भूमिका ही अनाकलनीय आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील आज डोंबिवलीत राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने आयोजित शरद महोत्सवाला भेट दिली. त्यावेळी उपस्थित पत्रकारांशी बोलताना त्यांनी ओबीसी आरक्षणावरुन आपली सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.

‘मुलांवर अन्याय होऊ नये’

दरम्यान, मेरिटच्या मुलांवर अन्याय  होऊ नये, तसंच परीक्षा पारदर्शी होतील हाच सरकारचा प्रयत्न असेल, असं म्हणत जयंत पाटलांनी आश्वत करण्याचाही प्रयत्न केलाय.

सध्या शासकीय परीक्षांचे पेपर फुटण्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. त्याबाबत बोलताना जयंत पाटील यांनी एमपीएससीला सगळ्या परीक्षा घेता येणे शक्य नाही. म्हणून हा वेगळा पर्याय मागच्या सरकारच्या काळात सुरू झाल्याचं म्हटलंय. एखाद्या एजेन्सीला या परीक्षा घेण्याची जबाबदारी दिली जाते. मात्र काही एजेन्सी ब्लॅक लिस्ट आहेत. काही एजन्सी याचा गैरफायदा घेणाऱ्या आहेत. फार मोजक्या एजन्सी पारदर्शी परीक्षा घेण्यासाठी सक्षम आहेत. दोन दिवसांपूर्वी गृहनिर्माण विभागाची म्हाडाची परीक्षा होती. त्यात आरोग्य विभागात ज्यांनी असा गोंधळ घातला त्यांच्या मागावर पोलीस असताना ही माहिती कळली. याबाबत शंका आल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी तत्काळ परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचंही जयंत पाटील यांनी म्हटलंय.

केडीएमसीत ताकद वाढणार आणि नवी मुंबईत एकत्र!

ओबीसींसोबतच केडीएमसीच्या निवडणुकांबाबतही जयंत पाटील यांनी महत्त्वाचं विधान केलंय. गेल्या केडीएमसीच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना-भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता ते नगरसेवक पुन्हा राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याची राजकीय चर्चा आहे. याबाबत बोलताना जयंत पाटील यांनी काही नगरसेवक हे राष्ट्रवादी आणि शिवसेनेत येण्यास इच्छुक आहेत. मात्र योग्य वेळ आल्यावर निर्णय घेतला जाईल, असं त्यांनी म्हटलंय. तसेच येत्या निवडणुकीत राष्ट्रवादीची नगरसेवकांची संख्या ही लक्षणीय वाढ झालेली असेल, असाही विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलाय. तर नवी मुंबई येथे महाविकास आघाडीचे तीन पक्ष एकत्र येणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.

संबंधित बातम्या –  

Special Report | कर्जतमध्ये ऐन हिवाळ्यात वातावरण तापलंय !

KRRameshKumar | ‘असं बोलूच कसं शकता तुम्ही!’ वाचाळवीर काँग्रेस आमदाराला प्रियंका गांधींनी सुनावलं

Special Report | चंद्रकांत पाटील वाद का निर्माण करतायत ?