मराठवाड्यात भाजपला मोठा धक्का; जयसिंगराव गायकवाड यांचा पक्षाचा राजीनामा

| Updated on: Nov 17, 2020 | 12:02 PM

पदवीधर निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसला आहे. आगामी निवडणुकीत याचे पडसाद उमटण्याची दाट शक्यता आहे. | Jaysingrao Gaikwad

मराठवाड्यात भाजपला मोठा धक्का; जयसिंगराव गायकवाड यांचा पक्षाचा राजीनामा
Follow us on

औरंगाबाद: मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेले ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांनी भाजपला मोठा धक्का दिला आहे. त्यांनी मंगळवारी भाजपच्या सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला. भाजपमध्ये उपेक्षा होत असल्याचे कारण त्यांनी सांगितले. त्यामुळे पदवीधर निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसला आहे. आगामी निवडणुकीत याचे पडसाद उमटण्याची दाट शक्यता आहे. (BJP get big jolt before Aurangabad graduate constituency)

मराठवाडा पदवीधर मतदारसंघात भाजपकडून शिरीष बोराळकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे नाराज झालेल्या जयसिंगराव गायकवाड यांनी स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, आता जयसिंगराव यांनी हा उमेदवारी अर्ज मागे घेणार असले तरी त्यांनी पक्षालाच रामराम ठोकला आहे.

जयसिंगराव गायकवाड मराठवाड्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. यापूर्वी त्यांनी केंद्र आणि राज्यात काम केले आहे. त्यामुळे मराठवाडा पदवीधर मतदारसंघामध्ये त्यांच्या जाण्याची किंमत भाजपला मोजावी लागू शकते.

जयसिंगराव गायकवाड यांनी सुरुवातीपासून मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीसाठी पक्षाकडे आग्रह धरला होता. हा मतदारसंघ पुन्हा भाजपकडे खेचून आणायचा असेल तर मला उमेदवारी द्यावी, असे त्यांनी म्हटले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावरून ‘प्रयोग थांबवा, काकांना उमेदवारी द्या’ अशी मागणी केली जात होती.

जयसिंगराव गायकवाड यांना मानणारा मोठा वर्ग मराठवाड्यात आहे. त्यांनी दोनवेळा मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे नेतृत्त्व केले आहे. गेल्या काही वर्षांपासून जयसिंगराव गायकवाड सक्रिय राजकारणापासून दूर होते. मात्र, आता त्यांनी पुन्हा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवली होती.

महाविकासआघाडीतील तीन पक्षांच्या ताकदीमुळे ही निवडणूक भाजपला अवघड जाणार आहे. यामध्ये आता जयसिंगराव गायकवाड यांनीच पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने भाजपच्या अडचणींमध्ये भर पडण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या:

Marathwada Update | मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणूक, भाजपचे जयसिंग गायकवाड नाराज

आमदारांनी पक्ष सोडू नये म्हणूनच फडणवीसांना सरकार पडणार हे सांगावं लागतं; जयंत पाटलांचा टोला

विधानपरिषद निवडणूक : घोषणा करतावेळीच या उमेदवारांच्या विजयाची जयंत पाटलांना खात्री

(BJP get big jolt before Aurangabad graduate constituency)