पुणे : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारवरील आरोपांची मालिका सुरुच ठेवली आहे. दुपारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर संध्याकाळी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकावर सोमय्यांनी निशाणा साधला. ठाकरे सरकार हे लुटारू आणि डाकूंचं सरकार आहे. वसूली करण्याचा आदेश देणारे मंत्री गायब आणि वसूली गोळा करणारे परमबीर गायब. परमबीरची नियुक्ती ठाकरेंनी केली आणि अनिल देशमुखांची नियुक्ती पवारांनी केली. आता दोघेही गायब, अशा शब्दात सोमय्या यांनी पवार आणि ठाकरेंवर हल्ला चढवला. (Kirit Somaiya criticizes Deputy CM Ajit Pawar, MP Bhavana Gawli, MP Sanjay Raut )
महाविकास आघाडी सरकार हे पोलिसांचा उपयोग माफियागिरी करण्यासाठी करत आहे. भावना गवळी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवतात. सात कोटी रुपये कार्यालयात कुठून आले? कोर्टानं आदेश दिलेत, 25 कोटीची चोरी केलीय. काही दिवसांत भावना गवळी आर्थर रोड कारागृहात जाणार, असा दावा सोमय्या यांनी केलाय.
सोमय्या यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधलाय. आमचे संजयभाऊ किती ओरडतात. सामनात संपादकीय लिहितात. ईडीनं बोलावल्यावर ईडी बिडी वळवणार. एक समन्स, दोन समन्स, संजय राऊतांना घाम फुटला. संजय राऊत मागच्या दारानं ईडी कार्यालयात गेले, 55 लाखाचा चेक परत केला. संजय राऊतांनी चोरीचा माल परत केला, अशी टीका सोमय्यांनी केलीय.
मुंबई उच्च न्यायालयानं आपल्या निर्णयात स्पष्ट म्हटलंय की जरंडेश्वर साखर कारखाना खरेदी विक्रीत घोटाळा झालाय. त्याची चौकशी झाली पाहिजे असा आदेश इकॉनॉमिक ऑफेन्स विंग ऑफ महाराष्ट्र पोलीस आणि ईडीला दिले. जरंडेश्वर साखर कारखाना जेव्हा घेतला तेव्हा अजित पवार उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे सर्वेसर्वा होते. यात राज्य सरकारचे पैसे आहेत. अर्थमंत्र्यांनी मंजुरी दिल्यानंतर राज्य सरकारला पैसा जातो. अजित पवारांनी स्वत: त्या कारखान्याची विक्री केली, लिलाव केला आणि स्वत:च स्वत:च्या कंपनीला घेतला. सगळ्या गोष्टींचं उल्लंघन केलं. स्वत: घेतला तोही बेनामी घेतला. त्यांनी सगळ्या बाबींचं उल्लंघन केलं आहे. त्यामुळे त्यांनी पदावर राहता येणार नाही, अशा शब्दात सोमय्यांनी अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची मागणी केलीय.
गेल्या काही दिवसांपासून आयकर विभागाच्या धाडी सुरु आहेत. त्यावेळी पहिल्या दिवशी अजित पवार यांनी खूप मोठं भावूक वक्तव्य केलं की फक्त रक्ताचं नातं म्हणून बहिणींच्या घरावर धाडी टाकल्या. मला पुण्यातील माहिती असते पण परिवाराबाबत माहिती नसते. म्हणून माझा प्रश्न शरद पवार, रोहित पवार, अजित पवार, पार्थ पवार आणि सुप्रिया सुळेंना आहे की, जरंडेश्वर साखर कारखान्याचा जो मालक आहे, मुख्य भागधारक त्यात एक नाव आहे मोहन पाटील ते विजया पाटील यांचे पती आहेत. दुसरे आहेत निता पाटील. मला अजित पवारांना प्रश्न विचारायचा आहे की हे लोक कोण आहेत? आता खरं खोटं काय आहे ते पवारांनी स्पष्ट करावं.
इतर बातम्या :
बीडसाठी कुणी काय केलं? पंकजा मुंडे म्हणतात आता एका शेतकऱ्याला 98 पैसे विमा आला!
Kirit Somaiya criticizes Deputy CM Ajit Pawar, MP Bhavana Gawli, MP Sanjay Raut