कोणी कितीही शड्डू ठोका, बिहारमध्ये यश मिळालं म्हणून मुंबईत मिळणार नाही : किशोरी पेडणेकर

| Updated on: Nov 19, 2020 | 3:06 PM

"बिहारला यश मिळालं म्हणून मुंबईत यश मिळेल असं नाही", असा टोला मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपला लगावला आहे (Kishori Pednekar slams BJP on BMC election).

कोणी कितीही शड्डू ठोका, बिहारमध्ये यश मिळालं म्हणून मुंबईत मिळणार नाही : किशोरी पेडणेकर
Follow us on

मुंबई : “मुंबईत शाखाप्रमुखांपासून इमारतीप्रमुखासोबत आमचं घट्ट नातं आहे. त्यामुळे मुंबईत कुणीही कसेही आपले शड्डू ठोकले तरी त्याच्याशी आमचं काहीही घेणंदेणं नाही. बिहारला यश मिळालं म्हणून मुंबईत यश मिळेल असं नाही”, असा टोला मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपला लगावला आहे (Kishori Pednekar slams BJP on BMC election).

मुंबईत काल (18 नोव्हेंबर) भाजपच्या मुंबई कार्यकारिणीची बैठक झाली. यावेळी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी आमदार अतुल भातखळकर यांच्याकडे सोपवून भाजपने निवडणुकीचं बिगूल फुंकलं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही महापालिकेवर भाजपचाच झेंडा फडकणार असल्याचं सांगून कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली. या टीकेला किशोरी पेडणेकर यांनी उत्तर दिलं आहे.

“आम्ही मुंबईला कधीच राजकारणाचा अड्डा बनवला नाही. मुंबई आशिया खंडातील एक नंबर शहर आहे. या मुंबईच्या सुख-दुःखात शिवसेना कायम उभी राहिलेली आहे. शिवसेनेची नाळ महाराष्ट्र आणि मुंबईच्या जनतेशी अधिक दृढ झालेली आहे. हे संबंध कायम कसे जपून राहतील याकडे आमचं लक्ष असतं. आमचा लोकप्रतिनिधी ज्यादिवशी निवडून येतो, त्यादिवसापासून तो काम करत असतो. त्यामुळे आम्हाला त्याची फारशी काळजी नाही”, असं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.

“भाजपने रणशिंग फुकलंय. यातून मुंबईला रणसंग्राम करण्याचा त्यांचा उद्देश हा स्पष्ट होतोय. या रणसंग्राममध्ये आमच्या मुंबईकरांना जराही त्रास झाला तर आम्ही कदापी सहन करणार नाही. आम्ही कधीच रणशिंग किंवा रणसंग्राम मानत नाही”, असा घणाघात महापौरांनी केला.

“मुंबई हे आमचं कुटुंब आहे. आम्ही कुटुंबाप्रमाणे वागत आलो आहोत. आमच्या कुटुंबात भाजप समरस झाली होती. पण आता त्यांना वेगळे स्वप्न पडत आहेत. ठिक आहे, स्वप्न बघण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. पण स्वप्न भंग करायचं का ते जनता ठरवेल”, असा चिमटा किशोरी पेडणेकर यांनी काढला.

“मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार आहे असे म्हणणारे प्रभाग समितीतील फळ कशी चाकतात? हे लोक आता भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत, मग तुम्ही सोबत होतात तेव्हा हे दिसलं नाही का?”, असा सवाल त्यांनी केला (Kishori Pednekar slams BJP on BMC election).

“भाजपला फक्त सत्ता हवी आहे. त्यांना मुंबईकरांचं काही भलं करायचं नाही. मुंबईत सर्व जातीधर्माच्या लोकांचा सन्मान केला जातो. बिहारला यश मिळालं म्हणून मुंबईत यश मिळेल असं नाही”, अशी टीका किशोरी पेडणेकर यांनी केली.

संबंधित बातम्या:

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून आमदार अतुल भातखळकरांची प्रभारीपदी नियुक्ती

देशभरात तरुणांची भाजपला पसंती; पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत हाच ट्रेंड दिसेल: दरेकर

राज ठाकरेंच्या वीजबिल माफीच्या आंदोलनात भाजपही; बावनकुळेंचं मोठं विधान