राजीव गांधींचा मध्यरात्री फोन आला अन् राजकारणात आलो; पृथ्वीबाबांचा हा किस्सा माहीत हवाच!

| Updated on: May 10, 2021 | 5:40 PM

राज्याचे 21वे मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांनी यशस्वी कारभार केला. (know how prithviraj chavan entered in politics)

राजीव गांधींचा मध्यरात्री फोन आला अन् राजकारणात आलो; पृथ्वीबाबांचा हा किस्सा माहीत हवाच!
prithviraj chavan
Follow us on

मुंबई: राज्याचे 21वे मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांनी यशस्वी कारभार केला. थेट दिल्लीतून राज्यात मुख्यमंत्री म्हणून आलेल्या पृथ्वीबाबांनी राज्य कारभार करताना बिल्डर लॉबींचं कंबरडं मोडलं होतं. सहीसाठी येणाऱ्या प्रत्येक फाईलचा बारकाईने अभ्यास केल्यावरच त्यावर ते सही करायचे. त्यावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी त्यांच्यावर टीका केली होती. या सर्व वादांसह पृथ्वीराज चव्हाण यांच्या राजकीय करिअरवर टाकलेला प्रकाश. (know how prithviraj chavan entered in politics)

यशवंतराव शिकले, त्याच शाळेत प्रवेश

पृथ्वीराज चव्हाण यांचा जन्म इंदोरचा. कऱ्हाडच्या नगरपालिकेच्या शाळेत त्यांचं सातवीपर्यंत शिक्षण झालं. त्यानंतर राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी कराडच्या ज्या टिळक हायस्कूलमध्ये शिक्षण घेतलं. त्याच शाळेत इयत्ता आठवीला प्रवेश घेतला. त्यानंतर पुढील शिक्षण दिल्लीत झालं. त्यांनी राजस्थानच्या बीआयटीस पिलानीमधून बीई-ऑनर्सची पदवी घेतली. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते अमेरिकेला गेले. बर्कलेमधील कॅलिफोर्निया विद्यापीठातून त्यांनी एमएसची पदवी घेतली. त्यानंतर एअरोनॉटिकल क्षेत्रात त्यांनी काही काळ नोकरीही केली.

घरातूनच वारसा

पृथ्वीराज चव्हाण यांना घरातूनच राजकारणाचा वारसा मिळाला होता. त्याचे वडील आनंदराव चव्हाण आणि आई प्रेमलाताई चव्हाण हे दोघेही काँग्रेसचे खंदे समर्थक होते. त्यामुळे त्यांना लहानपणापासूनच राजकारणाचं बाळकडू घरातून मिळालं. त्यांचे वडील इंदोरच्या होळकर संस्थानमध्ये कायदा सल्लागार होते. ते जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री आणि इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळातही होते.

राजीव गांधींचा रात्री फोन आला

1991च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने पृथ्वीबाबांना उमेदवारी दिली होती. राजीव गांधींना तंत्रज्ञानाचा अभ्यास असलेली टीम निवडायची होती. त्यामुळे पृथ्वीबाबांना उमेदवारी देण्यात आली. पृथ्वीबाबा तेव्हा पुण्याच्या सर्किट हाऊसमध्ये मुक्कामी होते. रात्री दोनच्या सुमारास सर्किट हाऊसमध्ये दूरध्वनी वाजला. काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष राजीव गांधी यांचा फोन होता. पृथ्वीबाबांच्या आईने फोन उचलला होता. तेव्हा राजीव गांधींनी पृथ्वीराज यांना उमेदवारी देण्यात आली असून उद्या कराडमध्ये जाऊन अर्ज भरा, असं सांगून निवडणुकीच्या शुभेच्छाही दिल्या आणि आशा रितीने पृथ्वीबाबांचा राजकारणात प्रवेश झाला.

राजकीय कारकिर्द

1991-1995, 1995-1998 या काळात ते लोकसभेचे सदस्य होते. ते कराड लोकसभा मतदारसंघातून तीनदा विजयी झाले आहेत. त्यांना सायन्स व टेक्नॉलॉजीच्या मंत्रालयाचे सल्लागार समितीचे सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्यानंतर 1992-93मध्ये ते इलेक्ट्रॉनिक अॅटोमिक एनर्जी मंत्रालयाचे सल्लागार सदस्य होते. 1994-1996मध्ये त्यांनी विज्ञान, माहिती व तंत्रज्ञान, पर्यावरण आणि वन खात्याच्या मंत्रालयाच्या सल्लागार समितीचे सदस्य म्हणूनही काम पाहिलं. 1998-99मध्ये ते राज्यसभेवर निवडून गेले. त्यानंतर 2002मध्ये त्यांची पुन्हा राज्यसभा सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांनी अर्थ नियोजन समितीचे सल्लागार सदस्य, संरक्षण मंत्रालयाच्या समितीचे सल्लागार सदस्य म्हणून काम पाहिले होते. 2000-2001मध्ये ते काँग्रेसचे प्रवक्तेही होते. त्यानंतर 2004 ते 2009पर्यंत ते पंतप्रधान कार्यालयात राज्यमंत्री होते.

मुख्यमंत्रीपदाची शपथ

पृथ्वीबाबांनी 11 नोव्हेंबर 2010 रोजी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर 28 एप्रिल 2011 रोजी ते विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आले. चार वर्षे ते मुख्यमंत्रीपदी होते. 26 सप्टेंबर 2014 मध्ये त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.

पवारांशी वाद

पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यातील वाद चांगलाच गाजला. तीन-तीन महिने फाईलींवर सह्याच होत नाहीत. सत्तेमध्ये बसलेल्या लोकांचा सही करायला हात का थरथरतो हे मला माहिती नाही, त्यांच्या हाताला लकवा भरला की काय? हे बघायला पाहिजे, अशी टीका शरद पवारांनी पवारांवर केली होती. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त `आठवणीतले विलासराव’ या पुस्तकाचे प्रकाशन पवार यांच्याहस्ते झाले. त्यावेळी पवारांनी ही टीका केली. केंद्रातून थेट राज्यात आलेल्या पृथ्वीबाबांना एखाद्या फायलीवर संशय आला की थेट बाजूला ठेवत होते. त्यामुळे मंत्री आणि आमदारही वैतागले होते. खासकरून राष्ट्रवादीचे नेते वैतागले होते. त्याची तक्रार पवारांकडे करण्यात आली होती. त्यामुळे पवारांनी त्यांच्यावर ही टीका केली होती.

नव्या सरकारमधून बाहेर

2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेसोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडी करून राज्यात सरकार स्थापन केलं. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात नवं सरकार राज्यात आलं. त्यामुळे चव्हाण यांना चांगलं खातं मिळेल, अशी चर्चा होती. मात्र, वजनदार खातं शिल्लक नसल्याने त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली नाही. त्यानंतर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठीही त्यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. आता विधानसभा अध्यक्षपदासाठी चव्हाण यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे त्यांच्याकडे हे पद जातं का? याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. (know how prithviraj chavan entered in politics)

आसामची जबाबदारी

नुकत्याच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाला. त्यात आसामचाही समावेश होता. काँग्रेसने पृथ्वीराज चव्हाण यांना आसामच्या स्क्रीनिंग कमिटीचं अध्यक्षपद दिलं होतं. त्यांच्या अध्यक्षतेखालील या समितीने आसाममध्ये उमदेवारांना तिकीट दिलं. त्यामुळे दिल्लीत चव्हाण यांचं वजन कायम असल्याचं पुन्हा एकदा दिसून आलं. (know how prithviraj chavan entered in politics)

 

संबंधित बातम्या:

उदयनराजेंशी अबोला, गोरेंशी पंगा; निंबाळकर राजघराण्याचे 29 वे वंशज रामराजेंचे हे वाद माहीत आहे का?

अमोल मिटकरींच्या भाषणांची अजितदादांना भुरळ; थेट विधान परिषदेवर संधी; कसा मिळाला टर्निंग पॉइंट? वाचा

चौथ्यांदा आमदार, हत्येचाही आरोप; वाचा, कोण आहेत किसन कथोरे?

(know how prithviraj chavan entered in politics)