भाजपने रणशिंग फुंकलं, उस्मानाबादची जागा कुणाची? केंद्रीय मंत्री आज दौऱ्यावर, शिंदे गटाचाही दावा?

| Updated on: Jan 04, 2023 | 10:27 AM

मराठवाड्यातील किती जागा भाजपा आणि किती जागा शिंदे गट लढणार आहे, हे अस्पष्ट असल्याने भाजप नेत्यांच्या दौऱ्याने शिंदे गटात अस्वस्थता आहे.

भाजपने रणशिंग फुंकलं, उस्मानाबादची जागा कुणाची? केंद्रीय मंत्री आज दौऱ्यावर, शिंदे गटाचाही दावा?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

संतोष जाधव, उस्मानाबादः भारतीय जनता पार्टीने (BJP) 2024 च्या उस्मानाबाद लोकसभा मतदार संघ निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. उस्मानाबादेत (Osmanabad) आज निवडणुकीचं रणशिंग फुंकलं जातंय. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा (Ajay Kumar Mishra) हे आज उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर असून त्यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उस्मानाबाद लोकसभेची जबाबदारी सोपवली आहे. आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या नेतृत्वात या दौऱ्यात विविध स्तरावरील बैठका व कार्यक्रम होणार आहेत.

अजय कुमार मिश्रा हे लोकसभा मतदार संघातील बूथ प्रमुख बैठक, कोअर कमिटी आढावा बैठक घेणार आहेत. उस्मानाबाद लोकसभा मतदार संघावर भाजपने दावा ठोकत तयारी सुरु केल्याने शिंदे गटात अस्वस्थता आहे.

अर्जुन खोतकर काय म्हणाले?

कालच शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर यांनी मोठा दावा केला होता. शिंदे गटाचे उपनेते अर्जुन खोतकर म्हणाले, भाजपच्या दाव्यांना फार गांभीर्याने घेऊ नका.

मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, उस्मानाबाद आणि औरंगाबाद या लोकसभेच्या जागा आमच्या असून या लोकसभेच्या जागा शिंदे गट लढवणार असे अर्जुन खोतकर यांनी स्पष्ट केले आहे.

भाजप आणि शिंदे गट एकत्र असताना असे वक्तव्य करतांना, भाजप नेत्यांनी भान ठेवले पाहिजे कारण आशा वक्तव्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल होऊ शकते, असेही खोतकर म्हणाले आहेत.

अजय कुमार मिश्रांचा दौरा सुरू

उस्मानाबादेत केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय कुमार मिश्रा यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली आहे. आज वाघोली गावात बुथ प्रमुखांसोबत बैठका आहेत. तर सकाळी उस्मानाबाद शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून पुढील बैठकीला सुरुवात होईल.

लोकसभा प्रवास समितीतील सदस्यांसोबत तसेच समाजातील विविध मान्यवरांसोबत त्यांच्या बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. या दौऱ्यात ते तुळजापूरच्या भवानीमातेचंही दर्शन घेणार आहेत.

उस्मानाबादेत काय स्थिती?

भाजप शिवसेना युतीच्या वेळी 2019 मध्ये उस्मानाबाद लोकसभा मतदार संघ हा शिवसेनेकडे म्हणजे ठाकरे यांच्याकडे होता. मात्र आता शिवसेनेत ठाकरे व शिंदे हे 2 गट पडल्याने शिंदे गटाने उस्मानाबाद लोकसभा मतदार संघावर दावा केला आहे.

माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी काल हिंगोली, परभणी,  उस्मानाबाद, औरंगाबाद या लोकसभा जागा शिंदे गटाला हव्यात असे सांगत दावा ठोकला होता. त्यामुळे उस्मानाबादचा सामना दोन शिवसेनेत रंगणार का ठाकरे-भाजपात रंगणार, हे पाहणं औत्सुक्याचं आहे.