खाते वाटपाचा तिढा फसला, आता दिल्लीत फैसला, अमित शाह यांची मध्यस्थी; शिंदे, फडणवीस, पवार दिल्लीला जाणार

राज्य मंत्रिमंडळात नव्या मंत्र्यांचा समावेश होऊन आठवडा उलटला तरी राज्य सरकारचं खाते वाटप झालेलं नाहीये. बहुधा मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी खाते वाटप जाहीर केलं जातं.

खाते वाटपाचा तिढा फसला, आता दिल्लीत फैसला, अमित शाह यांची मध्यस्थी; शिंदे, फडणवीस, पवार दिल्लीला जाणार
eknath shinde
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jul 12, 2023 | 3:51 PM

मुंबई : अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा एक गट महायुतीत सामील झाला आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर त्यांच्या सहकाऱ्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मात्र, आठ दिवस उलटून गेले तरी खाते वाटपाचा तिढा सुटलेलाच नाहीये. त्यामुळे हे मंत्री बिनखात्याचाच कारभार हाकत आहेत. गेल्या तीन दिवसांपासून महायुतीत खाते वाटपाचा तिढा सोडवण्याचा प्रयत्न होतोय. पण तिढा काही सुटता सुटत नाहीये. त्यामुळे आता तेट हा प्रश्न दिल्ली दरबारी जाण्याची शक्यता आहे. थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दरबारात हा प्रश्न मांडला जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे शाह यांच्यासोबतच्या बैठकीत काय चर्चा होते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खाते वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. जोपर्यंत खाते वाटप होत नाही तोपर्यंत विस्तार करता येणार नाहीये. खाते वाटपावरच मंत्र्यांची संख्या ठरणार आहे. खाते वाटपानंतर किती मंत्र्यांना शपथ द्यायची आणि त्यांना कोणती खाती द्यायची हे ठरणार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तारही लटकला आहे. खाते वाटपाचा तिडा सुटत नसल्याने हा प्रश्न दिल्ली दरबारी जाणार आहे. आजच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दिल्लीला रवाना होणार आहे. दिल्लीत अमित शाह यांची भेट घेऊन खाते वाटपावर चर्चा केली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

अर्थ खात्याला विरोध

युतीत सध्या भाजपकडे अर्थखाते आहे. मात्र, अर्थ खातं अजित पवार यांना देण्यास शिंदे गटाने विरोध दर्शविला आहे. त्यामुळे भाजपची कोंडी झाली आहे. गृह खाते हे फडणवीस यांच्याकडेच राहणार आहे. तर महसूल खाते काढून राधाकृष्ण विखे पाटील यांची नाराजी ओढवून घेता येणार नाहीये. तर, अर्थ खातं राष्ट्रवादीला देण्यास शिंदे गटाने विरोध दर्शविला आहे. त्यामुळे भाजपसमोर धर्मसंकट उभं राहिलं आहे. या शिवाय आणखी दोन ते तीन खात्यांवरून महायुतीत बेबनाव आहे. प्रमुख खाती न सोडण्याचा शिंदे गटाने निर्धार केला आहे. तर राष्ट्रवादीलाही महत्त्वाची खाती हवी आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्लीत जाऊनच या खाते वाटपावर तोडगा काढला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

बैठकांचं सत्र पाण्यात?

दरम्यान, गेली तीन दिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठका सुरू आहेत. वर्षा बंगल्यावर मध्यरात्रीपर्यंत या तिन्ही नेत्यांच्या बैठका सुरू आहेत. त्यावर खाते वाटप आणि मंत्रिमंडळ विस्तार यावर चर्चा होत आहे. काही खात्यांबाबत या तिन्ही पक्षांची सहमती झाली आहे. पण दोन ते तीन खात्यांबाबत या तिन्ही पक्षांची अजून सहमती होताना दिसत नाहीये. शिंदे गटात अनेक आमदार मंत्रिपदाची आस लावून बसले आहेत. त्यामुळे आपल्या वाट्याचं एकही मंत्रिपद राष्ट्रवादीला देण्यास शिंदे गट उत्सुक नाहीयेत. त्यामुळे हा तिढा वाढल्याचं सांगितलं जात आहे.

Follow Us