महाविकास आघाडीत काँग्रेसच्या नाराजीची चर्चा, दिल्लीला जाऊन सोनिया गांधींकडे खदखद व्यक्त करणार

| Updated on: Aug 06, 2020 | 4:37 PM

महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस नेते नाराज असल्याची चर्चा आहे. या नेत्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीची वेळ मागितली आहे, अशी माहिती एका काँग्रेस नेत्याने 'टीव्ही 9 मराठी'ला दिली आहे (Maharashtra Congress Ministers will meet Sonia Gandhi)

महाविकास आघाडीत काँग्रेसच्या नाराजीची चर्चा,  दिल्लीला जाऊन सोनिया गांधींकडे खदखद व्यक्त करणार
Follow us on

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस नेते नाराज असल्याची चर्चा आहे. या नेत्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीची वेळ मागितली आहे, अशी माहिती एका काँग्रेस नेत्याने ‘टीव्ही 9 मराठी’ला दिली आहे (Maharashtra Congress Ministers will meet Sonia Gandhi).

महाविकास आघाडी सरकारमधील समन्वयाबाबत अनेक काँग्रेस नेते नाराज असल्याची चर्चा आहे. ते आपली नाराजी सोनिया गांधी यांच्याकडे व्यक्त करणार आहेत. त्यांनी सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी वेळ मागितली आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सोमवार किंवा मंगळवारी दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण काही दिवसांपूर्वी नाराज असल्याची माहिती समोर आली होती. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या समन्वय समितीची बैठक पार पडली. या बैठकीत त्यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न करण्यात आले होते.

अशोक चव्हाण यांच्यासह आणखी काही काँग्रेस मंत्री नाराज असल्याची चर्चा आहे. समन्वय समितीतून नाराजी दूर होत नाही. त्यामुळे महाराष्ट्राचे काँग्रेस मंत्री सोनिया गांधी यांच्याकडे नाराजी व्यक्त करतील, अशीदेखील चर्चा आहे. विशेष म्हणजे सोनिया गांधी यांच्यासोबतच्या दिल्लीतील बैठकीत महाष्ट्रातील काँग्रेसचे सर्व मंत्री उपस्थित राहणार असल्याची माहिती एका काँग्रेस नेत्याने दिली आहे (Maharashtra Congress Ministers will meet Sonia Gandhi).

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीप्रमाणे काँग्रेसदेखील महत्त्वाचा पक्ष आहे. मात्र, या सरकारमधून काँग्रेसला डावललं जात आहे, असं काँग्रेस मंत्र्यांचं म्हणणं आहे. त्याच पार्श्वभूमीवर ते दिल्लीत जावून सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. तिथे ते आपली खदखद काँग्रेस अध्यक्षांकडे व्यक्त करणार असल्याची माहिती एका काँग्रेस नेत्याने दिली आहे. काँग्रेस नेत्यांच्या या तक्रारीवर सोनिया गांधी काय निर्णय घेतात, हे महत्त्वाचं आहे. पण, काँग्रेस नेत्यांची नाराजी महाविकास आघाडी सरकारला महागात पडू शकते.

राज्य मंत्रिमंडळाची 23 जुलै रोजी बैठक पार पडली होती. या बैठकीत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विभाजनाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र, तो अशोक चव्हाण यांनाच माहिती नव्हता. आपल्याला माहिती न देता, अधिकाऱ्यांनी असा प्रस्ताव तयार करुन, थेट मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरीसाठी सादर केला जातो, हे अत्यंत असमन्वयाचं असल्याचं अशोक चव्हाण यांचं म्हणणं आहे. याबाबत अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांकडे तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अशोक चव्हाण यांच्या नाराजीची बातमी कुणीतरी पेरली असल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं.

दरम्यान, याआधी राज्य सरकारच्या निर्णय प्रक्रियेत काँग्रेसला स्थान नसल्याचं वक्तव्य बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांनी केलं होतं. त्यानंतर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनीदेखील याप्रकरणी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर काँग्रेस मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर काँग्रेस नेत्यांनी नाराजी दूर झाल्याचं स्पष्ट केलं होतं. “तीन भावंडांमध्ये मतभेद असतात, आमचं तर तीन पक्षाचं सरकार आहे”, असं बाळासाहेब थोरात त्यावेळी म्हणाले होते.

संबंधित बातम्या :

अशोक चव्हाणांच्या नाराजीची बातमी पेरली असावी, बाळासाहेब थोरातांचा दावा

आधी थोरात, मग अशोक चव्हाण, आता नितीन राऊतांकडून नाराजी व्यक्त

तीन पक्षांचे चार दिग्गज, दीड तास चर्चा, ‘वर्षा’वर खलबतं, अखेर अशोक चव्हाणांची नाराजी दूर