पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर घणाघात, आता काँग्रेसनं कोरोना काळात केलेल्या मदतकार्याची यादीच दिली

| Updated on: Feb 07, 2022 | 11:06 PM

देशातील जनता अडचणीत असताना काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते लोकांची मदत करत होते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र देशाची संपत्ती विकत होते. त्यांना सर्वसामान्यांच्या प्रश्नांशी काही देणेघेणे नाही ते स्वतःला देशाचे पंतप्रधान नाही तर भाजपचे प्रचारक समजतात', अशी घणाघाती टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर घणाघात, आता काँग्रेसनं कोरोना काळात केलेल्या मदतकार्याची यादीच दिली
मोदींना नाना पटोले यांचा इशारा
Follow us on

मुंबई : लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काँग्रेस आणि महाराष्ट्र सरकारवर जोरदार टीका केली. पंतप्रधानांच्या या टीकेला आता महाराष्ट्र काँग्रेसकडून (Maharashtra Congress) जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. कोरोना संकटाच्या काळात काँग्रेसकडून करण्यात आलेल्या मदतकार्याची यादीच काँग्रेसनं दिली आहे. त्याचबरोबर ‘कोरोना काळातील आपल्या सरकारचे अपयश व केलेल्या चुका झाकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेस पक्षावर खोटे नाटे आरोप करत आहेत हे अत्यंत दुर्देवी आहे. देशातील जनता अडचणीत असताना काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते लोकांची मदत करत होते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र देशाची संपत्ती विकत होते. त्यांना सर्वसामान्यांच्या प्रश्नांशी काही देणेघेणे नाही ते स्वतःला देशाचे पंतप्रधान नाही तर भाजपचे प्रचारक समजतात’, अशी घणाघाती टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे.

‘संकटात असणा-या लोकांची मदत करण्याचा मानवधर्म आम्ही निभावला’

नाना पटोले म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असंवेदनशीलतेच्या सर्व मर्यादा पार केल्या आहेत. जगात कोरोनाचे रूग्ण मिळण्यास सुरुवात झाली होती तेव्हा राहुल गांधी उपाययोजना करण्यास सांगत होते त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी नमस्ते ट्रम्प करण्यात व्यस्त होते. आपल्या प्रसिद्धीच्या हव्यासापोटी पंतप्रधानांनी केलेल्या बेजबाबदार वर्तनामुळेच देशात कोरोनाचे रूग्ण वाढले. कोणतीही तयारी न करता लावलेल्या लॉकडाऊनमुळे देशभरातील गरीब, मजूर, कामगारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. मोदींच्या गुजरातमध्ये हे उत्तर भारतीय कामगार उपासमारीने त्रस्त असताना महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाने व महाविकास आघाडी सरकारने त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली. आमच्या नेत्या सोनियाजी गांधी व राहुलजी गांधी यांच्या सूचनेप्रमाणे काँग्रेस पक्षाने परप्रांतीय बांधवांची निवासाची जेवणाची व त्यांच्या गावी जाण्याची व्यवस्था केली. संकटात असणा-या लोकांची मदत करण्याचा मानवधर्म आम्ही निभावला.

‘उल्टा चोर कोतवाल को डांटे’

‘ज्यावेळी काँग्रेस कार्यकर्ते लोकांची मदत करत होते त्यावेळी पंतप्रधान मोदी लोकांना टाळ्या थाळ्या वाजवायला सांगून देशाची संपत्ती आपल्या उद्योगपती मित्रांना वाटत होते. कर्नाटक आणि मध्यप्रदेशातील काँग्रेस सरकारे पाडण्यात व्यस्त असल्याने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी पंतप्रधानांकडे वेळ नव्हता. गावी जाण्यासाठी शेकडो किलोमीटरची पायपीट करताना अनेक मजूरांचा मृत्यू झाला, काही बांधव रेल्वेखाली चिरडले गेले, त्यावेळी त्यांची मदत न करणारे, त्यांच्या मृत्यूबद्दल तोंडातून एक शब्द न काढणारे पंतप्रधान आज गरिबांची मदत केली म्हणून काँग्रेसवर टीका करत आहेत. पंतप्रधानांचे हे वागणे म्हणजे उल्टा चोर कोतवाल को डांटे असेच आहे’, असा टोलाही पटोले यांनी लगावला.

काँग्रेसनं दिलेली मदतकार्याची यादी

>> महाराष्ट्र काँग्रेसच्या वतीनं राज्यातील 1 कोटी 10 लाख नागरिकांना धान्य, प्रवास आणि आरोग्य किटचे वाटप

>> 2 लाख 10 हजार स्थलांतरित मजूर आणि गरजू नागरिकांना नियमित भोजनाची व्यवस्था

>> सुमारे 36.5 लाख नागरिकांना धान्य आणि रेशन किटचे वाटप

>> श्रमिक स्पेशल ट्रेनच्या माध्यमातून 22 हजार 702 मजुरांना त्यांच्या राज्यात परत पाठवले. काँग्रेसनं प्रवास खर्च उचलला. काँग्रेसनं 11 श्रमिक स्पेशल रेल्वे गाड्यांचा पूर्ण खर्च आणि 24 श्रमिक स्पेशल रेल्वे गाड्यांचा अंशत: खर्च उचलला.

>> 1 लाख 33 हजार 992 स्थलांतरित मजुरांना आणि 2 हजार 577 विद्यार्थ्यांना स्वत:च्या राज्यात जाण्यासाठीचा वाहतूक खर्च काँग्रेस पक्षानं उचलला. काँग्रेस पक्षानं खासगी वाहतूक व्यवस्था आणि रेल्वे प्रवासाचा खर्च उचलला.

>> स्थलांतरित मजुरांसाठी प्रत्येक जिल्हानिहाय हेल्पलाईन कार्यरत करण्यात आली होती.

>> हेल्पलाईन द्वारे थेट 40 लाख नागरिकांना महाराष्ट्र काँग्रेसच्या वतीनं मदत करण्यात आली.

>> 24.6 लाख नागरिकांना औषधे आणि आरोग्य संवर्धक किटचे वाटप

>> डॉक्टर, नर्सेस, पोलीस आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुमारे 14 हजार पीपीई किटचे वाटप

>> रक्ताचा तुटवडा जाणवल्यानंतर 20 हजार काँग्रेस कार्यकर्त्यांकडून रक्तदान

>> सांगली, नागपूर, पुणे, मुंबई, रायगड आणि कोल्हापूर येथे स्थलांतरित मजुरांसाठी मोबाईल क्लिनिकची सुरुवात

इतर बातम्या :

PM Narendra Modi Speech : फुटीरतावादी मानसिकता काँग्रेसच्या DNAमध्येच; मोदींची संसदेत जहरी टीका

PM Narendra Modi : कोरोना काळातील स्थलांतरावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्र सरकार आणि काँग्रेसवर गंभीर आरोप, काय म्हणाले मोदी?