‘जनतेतील अस्वस्थता दडपण्यासाठी राज्य सरकारकडून कोरोनाच्या नावाखाली सामाजिक आणीबाणी’, भाजपचा घणाघात

| Updated on: Jun 28, 2021 | 3:29 PM

समाजात मोठा असंतोष पसरत आहे. हा असंतोष प्रकट होईल या भीतीपोटी राज्यातील आघाडी सरकारने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची दहशत पसरवत सामाजिक आणिबाणी लागू करत असल्याचा घणाघात केशव उपाध्ये यांनी केलाय.

जनतेतील अस्वस्थता दडपण्यासाठी राज्य सरकारकडून कोरोनाच्या नावाखाली सामाजिक आणीबाणी, भाजपचा घणाघात
Follow us on

मुंबई : कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटमुळे राज्यात पुन्हा एकदा निर्बंध लागू करण्यात आले आहेत. आजपासून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने दुपारी 4 पर्यंतच सुरु ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आलाय. यावरुन आता भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केलीय. महाराष्ट्रात गेल्या 15 महिन्यांत वेगवेगळ्या पध्दतीने लॉकडाऊन, कडक निर्बंध सुरु आहेत. या निर्बंधांमुळे सामान्य माणसापुढे जगायचं कसं? प्रश्न उभा राहिला आहे. समाजात मोठा असंतोष पसरत आहे. हा असंतोष प्रकट होईल या भीतीपोटी राज्यातील आघाडी सरकारने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची दहशत पसरवत सामाजिक आणिबाणी लागू करत असल्याचा घणाघात केशव उपाध्ये यांनी केलाय. (Keshav Upadhyay criticizes Thackeray government over Corona restrictions)

मराठा आरक्षणातील अपयशामुळे मराठा समाजात असंतोष, ओबीसीचे राजकीय आरक्षण टिकवण्यात आलेले अपयश, राज्य सरकारच्या धोरणहीन कारभारामुळे निर्माण झालेले तरूणासमोरील बेकारीचे संकट, यामुळे राज्यातील सर्वच घटकात राज्य सरकारविरोधात कमालीचा असंतोष आहे. रविवारी सोशल मीडियावर व्हायरल झालेला तरूणाचा व्हिडीओ हा आजच्या महाराष्ट्राच्या जनतेत आलेल्या वैफल्याचे प्रतिनिधीत्व करणारा आहे. शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष, रोजगाराचे प्रश्न, छोटे व्यावसायिक, व्यापारी वर्गाचे प्रश्न यामुळे जनता जेरीस आलेली आहे. या संतप्त जनतेला तोंड देण्याचे धाडस या सरकारमध्ये नाही. त्यामुळे पळपूटेपणाचा मार्ग अवलंबत तिसऱ्या लाटेची दहशत पसरवली जात आहे, अशी टीका उपाध्ये यांनी केलीय.

‘सर्वसामान्य जनतेनं जगायचं कसं?’

राज्यात पुन्हा निर्बंध लादत लोकांना घरी बसवून ठेवण्याचा प्रयत्न आघाडी सरकार करत आहे. दुसरी लाट, तिसरी लाट अशी भिती जनतेच्या मनात निर्माण करून लोकांना घरात बसवले जाते. मात्र त्यांनी जगायचं कसं? हा प्रश्न सोडवण्यासाठी कोणताही प्रयत्न ठाकरे सरकारकडून केला जात नाही, असा आरोप उपाध्ये यांनी केलाय. राज्य सरकारने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवत नव्याने निर्बंध लागू केले आहेत. राज्यात सतत लॉकडाऊन करूनही सर्वाधिक रूग्ण, मृत्यू आणि प्रभावी उपाययोजनांचा अभाव या बाबतीत महाराष्ट्राचाच क्रमांक पहिला लागतो. राज्यासमोरचे प्रश्न पाहता जनतेमध्ये प्रचंड रोष आहे. या संतापलेल्या जनतेला तोंड देऊ लागू नये म्हणून महाविकास आघाडीचे सरकार नव्याने निर्बंध लागू करत आहे, अशा शब्दात उपाध्ये यांनी महाविकास आघाडी सरकारवर तोफ डागलीय.

‘राज्य सरकारला गांभीर्य नाही’

देशभरात लॉकडाऊन लागू होण्यापूर्वीच महाराष्ट्रात ठाकरे सरकारने लॉकडाऊन घोषित केला होता. या घटनेला आता 15 महिने होत आले. तरी कोरोनाच्या बाबतीत राज्यातील परिस्थिती सुधारलेली नाही. सततच्या निर्बंधांमुळे जनतेपुढील समस्या वाढतच आहेत. मात्र राज्य सरकारला याचे गांभीर्य नाही, हे सरकारच्या धोरणावरून वारंवार दिसून येतं. कोरोनाच्या नावाखाली जनतेला वेठीस धरून सामाजिक आणीबाणी या सरकारकडून लादली जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय.

संबंधित बातम्या :

मुंबईकरांना दिलासा, आता कस्तुरबा रुग्णालयात ‘डेल्टा प्लस’ चाचणी होणार, अवघ्या दोन दिवसात मिळणार रिपोर्ट

मुंबईकरांसाठी गूड न्यूज, 50 टक्के लहान मुलांमध्ये आढळल्या अँटीबॉडीज

Keshav Upadhyay criticizes Thackeray government over Corona restrictions