महाविकास आघाडी सरकार पोलीस आणि गुंडांच्या जोरावर चाललंय, चंद्रकांत पाटलांचा घणाघात

| Updated on: Aug 27, 2021 | 4:31 PM

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवलाय. हे सरकार पोलीस आणि गुंडांच्या जोरावर चाललंय, असा आरोप पाटील यांनी सांगलीत बोलताना केलाय. तसंच परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात याचिका दाखल करण्याचं काम सुरु आहे.

महाविकास आघाडी सरकार पोलीस आणि गुंडांच्या जोरावर चाललंय, चंद्रकांत पाटलांचा घणाघात
चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष
Follow us on

सांगली : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची अटक आणि सुटकेनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळतंय. राज्यात शिवसेना विरुद्ध भाजप असं चित्र पाहायला मिळतंय. या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवलाय. हे सरकार पोलीस आणि गुंडांच्या जोरावर चाललंय, असा आरोप पाटील यांनी सांगलीत बोलताना केलाय. तसंच परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात याचिका दाखल करण्याचं काम सुरु आहे. कायद्याच्या दृष्टीनं केसेस दाखल होत आहे. नाशिक युनिटने चार केसेस दाखल केल्या आहेत. आपल्याला वकिलांची तगडी फौज निर्माण करायची असल्याचंही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. (Mahavikas Aghadi government is run by the police and goons -Chandrakant Patil)

महाविकास आघाडीतील तीन पक्ष आता शेवटची तडफड करत आहेत. राणेंच्या विषयात उद्धव ठाकरे यांचं वाक्य वाहून गेलं. आपण उद्धव ठाकरे हे काय बोलले होते हे सांगायला कमी पडलो. आम्ही तुटू फुटू असं त्यांना वाटतंय. पण आम्ही सुद्धा संयमाने एक एक बॉम्ब टाकतो आणि गायब होतो, असा इशाराही पाटील यांनी यावेळी दिलाय. सत्ता गेल्यानंतर मनस्थिती टिकवणं अवघड आहे. पण इथून कुणीही जाणार नाही, असा विश्वासही पाटीलि यांनी यावेळी व्यक्त केलाय.

‘महाविकास आघाडीकडून लोकांना उल्लू बनवण्याचं काम सुरु’

ओबीसी आरक्षण पूर्ववत झाल्याशिवाय भाजप एकही निवडणूक होऊ देणार नाही. नेहमी एकमेकांविरोधात भांडायचं आणि फुटायची वेळ आली की एकमेकांना घट्ट पकडून ठेवायचं. लोकांना उल्लू बनवण्याचं काम सुरु आहे. लोक निवडणुकीची वाट पाहत आहे. पंढरपूर प्रमाणे देगलुरची पोटनिवडणूकही भाजप जिंकणार असा विश्वासही पाटील यावेळी व्यक्त केलाय.

सुशांतसिंह, दिशा सालियान मृत्यू प्रकरणावरुन राणेंचा इशारा

सुशांतसिह राजपूतची हत्या आणि दिशा सालियानची बलात्कार करुन हत्या झाली. त्याचे आरोपी मिळाले नाही. नारायण राणेच्या पाठीमागे लागू नका. नाहीतर मी आता थोडं बोलतोय. नाहीतर सगळं बोलावं लागेल ते परवडणारं नाही, अशा शब्दात राणेंनी शिवसेनेला एकप्रकारे दम भरलाय. मी कुठलाही गुन्हा केला नाही. आपण सत्तेत आहोत, ती सत्तेची मस्ती दाखवण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. काही हरकत नाही. आम्ही काही कायम विरोधी पक्षात राहण्यासाठी आलो नाही. भविष्यात आम्हीही सत्तेत येऊ. त्यामुळे अधिकारी, पोलिसांनी कायद्यात राहून काम करावं. कायद्याच्या बाहेर जाऊन काम कराल तर तुम्हाला कारवाईला सामोरं जावं लागेल, असा इशारा राणेंनी अधिकारी आणि पोलिसांना दिला आहे.

क्रिमिनल होतो तर मुख्यमंत्री कसं केलं?

जर मी क्रिमिनल होतो तर मुख्यमंत्री कसं केलं? इतके दिवस मंत्री कसा राहिलो? असा सवालही राणेंनी विरोधकांना केलाय. आता मोदींच्या काळात केंद्रीय मंत्री झालो. पण पहिली पदं यांनीच दिली ना. तेव्हा नव्हतं का कुणी विरोध करायला? असंही राणे म्हणालेत. साहेबांना जेव्हा दहशतवाद्यांकडून धोका होता, तेव्हा त्यांना मातोश्री सोडायला सांगितलं तेव्हा साहेबांनी सुपुत्राला सोबत घेतलं नाही, असा टोला राणेंनी लगावलाय.

इतर बातम्या : 

राजकारणात वातावरण बदल होतोय, काही विषाणुही येतायेत, आमच्यासाठी विषय संपला: आदित्य ठाकरे

दिशा सालियानची बलात्कारानंतर हत्या, सगळं बोललो तर परवडणार नाही : नारायण राणे

Mahavikas Aghadi government is run by the police and goons – Chandrakant Patil