मुंबई : ठाकरे गटाच्या नेत्या मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर (Eknath Shinde) घणाघाती टीका केली आहे. अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीवरून त्यांनी शिंदे गटावर घणाघात केला आहे. दिवंगत आमदार रमेश लटके हे शिवसैनिक होते. आमच्यामधून जे सोडून गेले आहेत, ते सतत दावा करत असतात आम्ही शिवसैनिक आहोत, आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहोत, मग रमेश लटके हे पण शिवसैनिक होते. त्यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. तुम्ही जर खरच शिवसैनिक आहात तर मग एवढी टोकाची भूमिका का घेत आहात असा सवाल मनिषा कायंदे यांनी शिंदे गटाला केला आहे.
पुढे बोलताना कायंदे यांनी म्हटलं आहे की, आम्हाला याबद्दल फार काही बोलायचं नाही. मात्र आम्हाला जे चिन्ह मिळालं आहे मशाल हे चिन्ह आम्ही घराघरात पोहोचवू. रमेश लटके यांचं काम आणि शिवसेनेचे विचार यामुळे अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत आमचा विजय निश्चित होईल असं कायंदे यांनी म्हटलं आहे.
मनिषा कायंदे यांनी शिंदे गटावर निशाणा साधताना काही सवाल उपस्थित केले आहेत. तुम्ही स्व:तला शिवसैनिक म्हणतात. अजूनही आम्ही शिवसेनेतच आहोत म्हणतात. तर मग तुम्हाला घरातील वाद सोडायला गोवा, सुरत, गुवाहाटीला का जावे लागले? तुम्हाला महाशक्तीची मदत का घ्यावी लागली असा सवाल कायंदे यांनी उपस्थित केला आहे. घरातील वाद घरार देखील मिटवता आले असते असंही त्या यावेळी म्हणाल्या आहेत.