
प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी काही दिवसांपूर्वी शेतकरी कर्जमाफीसाठी नागपूरमध्ये आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर राज्य सरकारने 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अशातच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकरी कर्जमाफी बाबत वादग्रस्त विधान केले आहे. या विधानामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरण्याची शक्यता आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी नेमकं काय म्हटलं ते सविस्तर जाणून घेऊयात.
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पंढरपूरमधील एका कार्यक्रमात बोलताना शेतकरी कर्जमाफीबाबत वादग्रस्त विधान केले आहे. सोसायटी काढायची, कर्ज घ्यायचे,कर्जबाजारी व्हायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची असं विखे पाटील यांनी केले आहे. चूक लक्षात येताच त्यांनी ‘आपल्या महायुती सरकारने कर्जमाफी जाहीरच केली आहे, आपण शेतकऱ्यांची शंभर टक्के कर्जमाफी करणार आहोत’ असं म्हटलं आहे.
राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सध्या नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करत आहेत. यावर बोलताना विखे पाटील यांनी, ‘कोविडच्या काळामध्ये दोन अडीच वर्षे उद्धव ठाकरे कुठे होते? ते माझं कुटुंब तुमची जबाबदारी म्हणतं लोकांना वाऱ्यावर सोडत घरात बसले होते आणि आता मराठवाड्यात शेतकऱ्यांना दिलासा द्यायला फिरत आहेत’ अशी टीका उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.
बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते. या आंदोलनाची दखल घेत सरकारने कर्जमाफीची घोषणा केली आहे. 30 जून 2026 पर्यंत शेकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे. मात्र सरकारने आपल्या शब्दात बदल केला किंवा कर्जमाफी दिली नाही तर पुन्हा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलनाचा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. त्यामुळे सरकार 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफी करण्याची शक्यता आहे. दरम्यान, आता विखे पाटलांनी शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त विधान केले आहे, त्यामुळे बच्चू कडू आणि इतर नेत्यांकडून विखे यांना प्रत्युत्तर दिले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे प्रकरण आणखी तापण्याची शक्यता आहे.