युवा आमदार, सुरुवात दमदार, आदित्य ठाकरे आणि रोहित पवारांची मतदारसंघात कामं सुरु

| Updated on: Dec 11, 2019 | 10:25 AM

सत्तानाट्य संपल्यानंतर सरकार स्थापन झालं आणि त्यानंतर लगेच या दोन्ही तरुण आमदारांनी आपापल्या मतदारसंघात काम आणि योजनांची आखणी सुरु केली आहे.

युवा आमदार, सुरुवात दमदार, आदित्य ठाकरे आणि रोहित पवारांची मतदारसंघात कामं सुरु
Follow us on

मुंबई : आदित्य ठाकरे आणि रोहित पवार (MLA Aaditya Thackeray and Rohit Pawar) यंदा पहिल्यांदाचा विधानसभेची पायरी चढले. सत्तानाट्य संपल्यानंतर सरकार स्थापन झालं आणि त्यानंतर लगेच या दोन्ही तरुण आमदारांनी आपापल्या मतदारसंघात काम आणि योजनांची आखणी सुरु केली आहे. (MLA Aaditya Thackeray and Rohit Pawar)

शिवसेना आणि राष्ट्रवादीचे युवा चेहरे कामाला लागले आहेत. वरळीत आदित्य ठाकरेंची ए प्लस मोहीम तर कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवारांचा पवार पॅटर्न सुरु झाला आहे.

यंदा 30 हून अधिक तरुण आमदारांची फौज विधानसभेत पोहोचली आहे. आदित्य ठाकरे, रोहित पवार, ऋतुराज पाटील, राम सातपुते, देवेंद्र भुयार, संदीप क्षीरसागर असे असंख्य आमदार नव्या उमेदीचे आहेत. त्यात प्रामुख्यानं आदित्य ठाकरे आणि रोहित पवारांनी आपापल्या मतदारसंघात कामं आणि योजनांचा धडाका सुरु केला आहे.

वरळीत आदित्य ठाकरेंची ए प्लस मोहीम

  • वरळीत आदित्य ठाकरेंनी ए प्लस मोहीम हाती घेतली आहे.
  • कचरामुक्त वरळीसाठी एकूण नवी 70 ठिकाणं तयार होणार आहेत.
  • वरळीच्या सर्व चौकांचं नूतनीकरण आणि सुशोभीकरण हाती घेतलं आहे.
  • त्याशिवाय वरळी सीफेसचं नूतनीकरण, रस्ते अशी अनेक कामं या मोहिमेत राबवली जाणार आहेत

रोहित पवारांचा पवार पॅटर्न

  • तिकडे कर्जत-जामखेडमध्येही रोहित पवार कामाला लागले आहेत.
  • कर्जत-जामखेडमधला जिव्हाळ्याचा पाणीप्रश्न हाती घेतला गेला आहे.
  • शिवाय कुकडी प्रकल्पात गेलेल्या शेतजमिनींचा मोबदलाही मिळण्यास सुरुवात झाली आहे.
  • कुकडी प्रकल्पासाठी जमिनी संपादीत केल्या होत्या. मात्र 25-30 वर्ष होऊनही त्याचा मोबदला सरकार दरबारी अडकून पडला होता. मात्र आता पहिल्या टप्प्यात 62 लाभार्थींना 6 कोटी 85 लाखांचे धनादेश देण्यात आले आहेत.
  • याशिवाय कर्जत तालुक्यांतील मंदिरांच्या विकासासाठी अभिनेता मिलिंद गुणाजींच्या माध्यमातून नवी योजनाही राबवली जाणार आहे.

दोन्ही तरुण आमदारांनी आपापल्या मतदारसंघात धमाकेदार सुरुवात केली आहे. आता फक्त त्यात सातत्य राहावं आणि योजना लोकांपर्यंत पोहोचाव्यात अशी आशा करुयात.