शहापूर तालुका भगवा करणार : पांडुरंग बरोरा

| Updated on: Jul 10, 2019 | 3:43 PM

शहापूरमध्ये भीषण पाणीटंचाई आहे, ती दूर करण्यासाठी मी शिवसेनेत प्रवेश घेत आहे. तसेच शहापूर तालुका टंचाई मुक्त आणि विधानसभा भगवा युक्त करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन असे पांडुरंग बरोरा यांनी सांगितले.

शहापूर तालुका भगवा करणार : पांडुरंग बरोरा
Follow us on

मुंबई : शहापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिलेले आमदार पांडुरंग बरोरा यांनी आज (10 जुलै) शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात पांडुरंग बरोरा यांना शिवबंधन बांधलं. यावेळी शिवसेना नेते एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे दिग्गज नेते उपस्थित होते. आमदार बरोरा यांनी काल आपला राजीनामा विधासभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सुपूर्द केला. त्यानंतर आज त्यांनी शिवसेना भवनात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी त्यांनी शहापूरमध्ये भीषण पाणीटंचाई आहे, ती दूर करण्यासाठी मी शिवसेनेत प्रवेश घेत आहे. तसेच शहापूर तालुका टंचाईमुक्त आणि विधानसभा भगवा युक्त करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन असे पांडुरंग बरोरा यांनी सांगितले.

मुंबईची लाईफलाईन म्हणून आपण लोकलला ओळखतो. पण मी मुंबईची लाईफलाईन म्हणून माझ्या शहापूर तालुक्याला ओळखतो. कारण शहापूर तालुक्यात मुंबईला पाणीपुरवठा करणारी तानसा, भातसा, वैतरणा ही तिन्ही धरणे आहेत. माझ्या जिल्ह्यातून सर्व मुंबईला पाणीपुरवठा होत असतानाही, माझ्या तालुक्यातील लोकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे मी माझ्या तालुक्यातील भीषण पाणीटंचाई दूर करण्यासाठी शिवसेनेत प्रवेश घेतला असे मत पांडुरंग बरोरा यांनी पक्षप्रवेशावेळी व्यक्त केलं.

त्याशिवाय माझ्या तीन पिढ्या शरद पवारांसोबत गेल्या. पण काळानुसार वेळ बदलत जाते. माझी शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर कोणतीही नाराजी नसल्याचेही बरोरा यांनी यावेळी सांगितले.

2014 ला विधानसभेच्या निवडणुकीत मी पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून गेलो. त्यानतंर मी सातत्याने जनतेच्या विकासाच्या कामाकडे लक्ष केंद्रीत केले. पण गेल्या 20 वर्षात जेवढा निधी मला आघाडी सरकारने दिला आहे. तेवढा निधी तालुक्याला येत्या 5 वर्षात युती सरकार देणार आहे. या माध्यामातून भारावून जाऊन मी शिवसेनेत प्रवेश घेतला, असेही त्यांनी सांगितले.

“गेल्या 5 वर्षापासून मी पाण्यासाठी भांडत होतो. मात्र या अधिवेशनात एकनाथ शिंदे यांनी पाणी टंचाईचा प्रस्ताव मंजूर करुन घेतला. त्यानुसार शहापूर पाणी टंचाई दूर करणे हाच माझा प्रमुख उद्देश असल्याचा बरोरा यांनी सांगितले. तसेच संपूर्ण तालुक्यात बेरोगजारी, पाणी टंचाई, एमएमआरडीचा विस्तार, प्रशासकीय विभाग या प्रमुख समस्या आहेत आणि त्या सोडवण्यासाठी मी शिवसेनेत प्रवेश घेत आहे. तसेच शहापूर तालुका टंचाई मुक्त आणि शहापूर विधानसभा भगवा युक्त करण्याचा नक्की प्रयत्न करीन असेही पांडुरंग बरोरा यांनी सांगितले.”

कोण आहेत पांडुरंग बरोरा?

  • आमदार पांडुरंग बरोरा राष्ट्रवादीचे वाडा-शहापूरचे  आमदार आहेत.
  • बरोरा यांचे 40 वर्षांपासून राष्ट्रवादीशी आणि शरद पवार, अजित पवार यांच्याशी घनिष्ठ संबंध आहेत.
  • पांडुरंग बरोरा हे 2014 मध्ये मोदी लाटेतही राष्ट्रवादीकडून निवडून आलेले एकमेव आदिवासी आमदार आहेत.

संबंधित बातम्या :

राष्ट्रवादीचे आमदार पांडुरंग बरोरा शिवसेनेत दाखल

आमदार पांडुरंग बरोरांच्या शिवसेना प्रवेशाला भावाचा विरोध, राष्ट्रवादीकडून लढण्याची तयारी