मुंबईः राज्यसभा निवडणुकीत शिवसेना तर आता विधानसभा निवडणुकीतही (MLC Election) भाजपने काँग्रेसला थेट आस्मान दाखवलं. अत्यंत शर्थीच्या लढाईत अखेरपर्यंत भाजपचे प्रसाद लाड पराभूत होतील आणि भाई जगताप जिंकतील, असं वाटत होतं. मात्र अखेरच्या क्षणापर्यंत काँग्रेसचे चंद्रकांत हांडोरे आणि भाई जगताप या दोघांनाही समाधानकारक मते नव्हती. अखेर भाई जगताप यांचा विजय झाला आणि चंद्रकांत हांडोरे यांना केवळ 22 मते मिळाल्याने त्यांना निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. भाजपच्या प्रसाद लाड यांना 26 मतं मिळाली. एकूणच महाविकास आघाडीतील अंतर्गत बंडाळी विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने चव्हाट्यावर आली. महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील अतिरिक्त मतांचा फायदा काँग्रेसच्या उमेदवाराला होईल, असं वाटत होतं. मात्र भाजपने दुसऱ्या आणि तिसऱ्या पसंतीच्या मतांच्या जोरावर पुन्हा एकदा आपला उमेदवार निवडून आणला. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी एकूण 11 उमेदवार रिंगणात उभे होते. आज सकाळपासून राज्यातील 285 आमदारांनी मतदानाला हजेरी लावली. विधान परिषदेचं मतदान गुप्त पद्धतीनं होत असल्यामुळे शेवटपर्यंत निकालाची उत्सुकता ताणली गेली. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मदतीनेही काँग्रेसला आपला उमेदवार निवडून आणता आला नाही, त्यामुळे आता महाराष्ट्र काँग्रेसच्या भवितव्याबाबत निश्चितच प्रश्न उभा राहणार आहे.
विधान परिषदेच्या आजच्या निवडणुकीत 11 उमेदवार उभे होते. त्यापैकी 10 उमेदवार विजयी झाले असून भाजपच्या प्रसाद लाड यांचा विजय झाला. उमेदवारांना मिळालेली मते अशी-
भाजपा
महाराष्ट्रातील आमदारांचं संख्याबळ एकूण 285 एवढं आहे. विधान परिषदेवर निवडून जाण्यासाठी प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराला किमान 26 मतांच्या कोट्याची गरज होती. मात्र भाजप आणि काँग्रेसने आपापल्या आमदारांच्या संख्याबळापेक्षा एक-एक उमेदवार जास्त उभा केल्यामुळे या निवडणुकीत जास्त रंगत आली. भाजपकडे 55 मतं आणि 7 अपक्षांचा पाठिंबा होता. त्यानुसार भाजपचे पाच उमेदवार निवडून येण्यासाठी 10 अतिरिक्त मतांची गरज होती. तर काँग्रेसकडे 44 मतं होती. दोन उमेदवार निवडून येण्यासाठी काँग्रेसला आणखी 8 मतांची गरज होती. तर शिवसेना आणि राष्ट्रवादीने आपापल्या मतांच्या कोट्यानुसार दोन-दोन उमेदवार दिले. त्यामुळे भाजपचे प्रसाद लाड आणि भाई जगताप या दोघांमध्ये खरी लढत झाली. अखेरीस भाजपच्या प्रसाद लाड यांचा विजय झाला.