मनसेच्या मोर्चाचा मार्ग अखेर ठरला!

| Updated on: Jan 30, 2020 | 10:15 AM

भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान अर्थात राणीच्या बागेपासून मनसेच्या मोर्चाला सुरुवात होणार आहे.

मनसेच्या मोर्चाचा मार्ग अखेर ठरला!
Follow us on

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 9 फेब्रुवारीला निघणाऱ्या मोर्चाचा मार्ग (MNS March Route) अखेर ठरला आहे. मुंबईतील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानापासून आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे. मुंबई पोलिसांकडे मोर्चाची परवानगी अद्याप बाकी आहे.

मनसेचा मोर्चा हा ‘नागरिकत्व सुधारणा कायदा’ अर्थात ‘सीएए’ किंवा ‘राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी’ म्हणजे ‘एनआरसी’च्या समर्थनार्थ नसल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच स्पष्ट केलं आहे. हा मोर्चा पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान अर्थात राणीच्या बागेपासून मनसेच्या मोर्चाला सुरुवात होणार आहे. तिथपासून सीएसएमटीला असलेल्या आझाद मैदानापर्यंत मोर्चा जाईल. मोर्चाच्या परवानगीचं पत्र मनसेकडून पोलिसांना पाठवण्यात येत आहे.

राज ठाकरे यांनी मनसेच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत ‘कृष्णकुंज’ मंगळवारी बैठक घेतली होती. या बैठकीत राज ठाकरेंनी ‘सीएए’च्या मुद्द्यावर मनसेची भूमिका स्पष्ट केली होती. सीएए आणि एनआरसीला पाठिंबा देण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये गोंधळ होता. त्यासंदर्भातच पदाधिकाऱ्यांच्या शंकांचं निरसन करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. मनसेचा मोर्चा यशस्वी झाला पाहिजे, अशी सूचना राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिली होती.

देशाच्या इतर भागातून लोक देशात सरळ घुसखोरी करतात. त्यामुळे आपल्याला इतर देशांप्रमाणे कठोर व्हायला हवं. म्हणून पहिल्यांदा या देशात आलेले बांग्लादेशी आणि पाकिस्तानी मुस्लिम बाहेर काढले पाहिजेत. यासाठी माझा केंद्राला पूर्ण पाठिंबा आहे, असं राज ठाकरे महाअधिवेशनातील भाषणात म्हणाले होते.

MNS March Route)