राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र जसंच्या तसं, ठाकरे सरकारला महत्त्वाचा सल्ला!

प्रत्येक नुकसानग्रस्त घराला शेतकऱ्याला ५०,००० रूपयांची मदत सरकारनं ताबडतोब जाहीर करावी आणि प्रत्यक्षात तत्काळ द्यावी. आधी कोरोना संसर्ग आणि नंतर अतिवृष्टीनं शेतकरी पार कोलमडला आहे, अशा वेळी निव्वळ आश्वासनं आणि शब्दांपेक्ष शीघ्र कृतीची गरज आहे, अशी मागणी करणारी पत्र राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे.

राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र जसंच्या तसं, ठाकरे सरकारला महत्त्वाचा सल्ला!
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे
| Edited By: Akshay Adhav | Updated on: Sep 30, 2021 | 8:08 AM

मुंबई : कधी कोकण, पश्चिम महाराष्ट्रात तर कधी उत्तर महाराष्ट्रात महापूर-ढगफुटीचे थैमान सुरु आहे. आता ‘गुलाब’ चक्रीवादळाने विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात हाहाकार उडवला आहे. धरणे ओव्हरफ्लो, नद्या कोपल्या, गावे जलमय, तलाव-बंधारे फुटले, ठिकठिकाणी महापूर, पूल, रस्ते आणि शेतीही पाण्याखाली असे भयंकर चित्र मराठवाड्यात जागोजागी दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्र लिहून शेतकऱ्यांसाठी प्रत्येकी 50 हजार रुपयांच्या मदतीची मागणी केली आहे.

राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र जसंच्या तसं

“महाराष्ट्राच्या काही भागात, मुख्यत: मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात, पावसानं कहर केला आहे. हाता-तोंडाशी आलेलं पीक तर गेलंच आहे, परंतु घरा-दाराचं नुकसानही फार झालं आहे. ही वेळ आणीबाणीची आहे.”

“अशा वेळेस पंचनाम्यांचे सोपस्कार होत रहातील, परंतु त्याआधी प्रत्येक नुकसानग्रस्त घराला शेतकऱ्याला ५०,००० रूपयांची मदत सरकारनं ताबडतोब जाहीर करावी आणि प्रत्यक्षात तत्काळ द्यावी. आधी कोरोना संसर्ग आणि नंतर अतिवृष्टीनं शेतकरी पार कोलमडला आहे, अशा वेळी निव्वळ आश्वासनं आणि शब्दांपेक्ष शीघ्र कृतीची गरज आहे.”

“प्रशासकीय पातळीवर नंतर पंचनामे होत रहातील. त्यात शेतीच्या नुकसानीबरोबर घरांच्या व पाळीव गुरांच्या नुकसानीचाही विचार होईल आणि रितसर मदत केली जाईल. परंतु मी ज्या काहींशी बोललो त्यानुसार, तोपर्यंत वाट पहाण्याएवढी ताकद आत्ता शेतकरी बांधवांकडे नाही, ह्याचा विचार करावा आणि सत्वर पावलं टाकावीत. तसेच ही परिस्थिती बघता शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी आग्रही मागणी मी ह्या पत्रकाद्वारे राज्य सरकारकडे करत आहे.”

राज ठाकरे अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना

गोदाकाठला धोक्याचा इशारा

मराठवाड्यातील जवळपास प्रत्येक धरण, बंधारा ओव्हरफ्लो झाला आहे. ऑगस्ट महिन्यात 60-70 टक्के भरलेल्या जायकवाडी धरणाचे 27 पैकी 18 दरवाजे प्रत्येकी 6 इंच उघडण्याची वेळ या अतिवृष्टीने आली आहे. त्यामुळे प्रतिसेकंद 10 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदावरीच्या पात्रात होत आहे. आधीच गोदावरी अतिवृष्टीने तुडुंब भरलेली; त्यात पाण्याचा हा विसर्ग… म्हणजे गोदाकाठचा संपूर्ण परिसर आणखी काही काळ धोक्याच्या इशाऱ्यातच राहणार आहे.

हे ही वाचा :

महाराष्ट्रात संकटांची मालिका, मराठवाडा जलमय, केंद्र सरकारने भरीव निधी द्यावा : संजय राऊत

Follow Us