लोकसेवा आयोगाच्या सदस्यांची रिक्त पदे भरण्यासाठीही ‘वाझे ‘ हवेत का?, भाजपचा खोचक सवाल

| Updated on: Aug 02, 2021 | 4:18 PM

ही चालढकल पाहता सदस्यांची रिक्त पदे भरण्यासाठी आघाडी सरकारला एखाद्या 'वाझे' ची प्रतीक्षा आहे का, असा खोचक सवाल भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी केलाय.

लोकसेवा आयोगाच्या सदस्यांची रिक्त पदे भरण्यासाठीही वाझे  हवेत का?, भाजपचा खोचक सवाल
उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी
Follow us on

मुंबई : राज्य लोकसेवा आयोगाच्या 4 रिक्त जागा 31 जुलैपूर्वी भरण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळ अधिवेशनात केली होती. आता त्यांनी ही पदे भरण्यासाठी अजित पवार यांनी 30 सप्टेंबरची मुदत दिली आहे. ही चालढकल पाहता सदस्यांची रिक्त पदे भरण्यासाठी आघाडी सरकारला एखाद्या ‘वाझे’ ची प्रतीक्षा आहे का, असा खोचक सवाल भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी केलाय. (Madhav Bhandari criticizes Mahavikas Aghadi government over vacancy in MPSC)

राज्य लोकसेला आयोगाचे एकूण 6 सदस्य असतात. या पैकी 4 सदस्यांच्या जागा अनेक महिन्यांपासून भरल्याच गेल्या नाहीत. आयोगाच्या सदस्यांच्या रिक्त जागा 31 जुलैपूर्वी भरण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळ अधिवेशनात केली होती. ही मुदत संपल्यावर अजितदादांनी या जागा भरण्यासाठी 30 सप्टेंबर ही तारीख जाहीर केलीय. लोकसेवा आयोग सदस्यांच्या जागा भरण्यासाठी एवढा वेळ लागण्याएवढा हा जटील विषय नाही. ‘योग्य’ सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी आघाडी सरकार एखाद्या वाझेंची वाट पहात असावे, अशी शंका येऊ लागली आहे, अशी टीकाही भांडारी यांनी केलीय.

सरकारच्या दिरंगाईचा फटका विद्यार्थ्यांना

आयोग सदस्यांच्या रिक्त जागा भरल्या न गेल्याने लोकसेवा आयोगाला पूर्ण क्षमतेने काम करता येत नाही. परीक्षा घेणे, निकाल लावणे, पदांची भरती करणे अशी आयोगाची अनेक कामे वेळेत पूर्ण होण्यात अडचणी निर्माण होतात. या दिरंगाईचा फटका विद्यार्थ्यांना बसतो आहे. शेकडो होतकरू युवक परीक्षा होण्याची आणि परीक्षांचा निकाल लागण्याची वाट बघत राहतात. लोकसेवा आयोगाच्या दिरंगाईमुळेच स्वप्नील लोणकर या तरुणाने आत्महत्या केली, हे लक्षात घेऊन राज्य सरकारने आयोग सदस्यांच्या रिक्त जागा तातडीने भराव्या, अशी मागणीही त्यांनी केलीय.

रोहित पवारांचा राज्यपालांना टोला

राज्य शासनाने MPSC सदस्यांची यादी पाठवलीय. विधान परिषद आमदारांची यादी नसल्याने आपण ती यादी तातडीने मंजूर कराल असा विश्वास वाटतो, असा सणसणीत टोला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लगावला आहे. एका युजर्सने ट्विट करुन, 31 जुलैपूर्वी आपण MPSC आयोगातील रिक्त जागा भरणार होता, त्याचं काय झालं?, असा सवाल विचारला. त्यावर रोहित पवारांनी हे उत्तर दिलं.

ठाकरे सरकारने विधान परिषदेसाठी 12 आमदारांची यादी महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवली आहे. परंतु कित्येक महिने उलटून गेली तरी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ती यादी मंजूर केलेली नाहीय. हाच धागा पकडून रोहित पवार यांनी राज्यपालांना चिमटा काढला.

संबंधित बातम्या :

सरकारने MPSC सदस्यांची यादी पाठवलीय, विधान परिषद आमदारांची यादी नसल्याने मंजूर कराल हा विश्वास, रोहित पवारांचा राज्यपालांना सणसणीत टोला

मुंबईची लोकल कधी सुरू होणार?; वाचा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले?

Madhav Bhandari criticizes Mahavikas Aghadi government over vacancy in MPSC