‘मुंबई विमानतळाचं मुख्यालय अहमदाबादला हलवणं हा मोदींचा महाराष्ट्राच्या जनतेला संदेश’, काँग्रेसचा गंभीर आरोप

| Updated on: Jul 20, 2021 | 5:04 PM

मुंबई विमानतळाचे मुख्यालय मुंबईतून अहमदाबादला हलवणं हा मोदींचा महाराष्ट्राच्या जनतेला संदेश आहे, अशी टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलीय.

मुंबई विमानतळाचं मुख्यालय अहमदाबादला हलवणं हा मोदींचा महाराष्ट्राच्या जनतेला संदेश, काँग्रेसचा गंभीर आरोप
सचिन सावंत, प्रवक्ते, काँग्रेस
Follow us on

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचं व्यवस्थापन आता पूर्णपणे अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेडकडे गेलं आहे. त्यानंतर विमानतळाचं मुख्यालय मुंबईतून अहमदाबादला हलवण्याचा निर्णय अदानी समुहानं घेतला आहे. त्यावरुन आता राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील घटकपक्षातील नेते आक्रमक झाले आहेत शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. मुंबई विमानतळाचे मुख्यालय मुंबईतून अहमदाबादला हलवणं हा मोदींचा महाराष्ट्राच्या जनतेला संदेश आहे, अशी टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलीय. (Sachin Sawant criticizes BJP over relocation of Mumbai airport headquarters to Ahmedabad)

मुंबई विमानतळाचे मुख्यालय मुंबईतून अहमदाबादला हलवणे हा मोदींचा महाराष्ट्राच्या जनतेला संदेश आहे. विमानतळावर झालेलं दांडीया नृत्य बरंच काही सांगून जाते. मुंबईचे महत्त्व कमी करण्यासाठी गेल्या 7 वर्षांत जे प्रयत्न झाले त्याचा हा एक भाग आहे. जागतिक वित्तीय केंद्र असेच गुजरातला नेले. महाराष्ट्राने कोणत्याही उद्योगांना वा उद्योजकांना आपपरभाव दाखवला नाही. अनेक उद्योजक महाराष्ट्रात आले व महाराष्ट्राचे झाले. मुंबई विमानतळ आधी GVK या आंध्रप्रदेशच्या कंपनीकडे होते. GVK ने मुंबई विमानतळाचे मुख्यालय आंध्रप्रदेशला नेले नाही किंवा विमानतळावर कुचीपुडी नृत्य करवले नाही, असा जोरदार टोला सचिन सावंत यांनी लगावला आहे.

शिवसेना खासदार विनायक राऊतांचा इशारा

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनीही भाजपला इशारा दिलाय. राऊत म्हणाले, ‘ही अत्यंत निषेधार्ह बाब आहे. मुंबईचे अहमदाबाद करण्याचे हे काम सुरू आहे. मुंबई विमानतळाचे महत्व कमी करून अहमदाबादचे महत्व वाढवण्याचे हे काम आहे. त्यापेक्षा अहमदाबादला स्वतंत्र स्टेट्सचा दर्जा देऊन त्याचे महत्व वाढावा. आयजीच्या जिवावर बायजीचा उद्धार आणि सासूच्या जीवावर जावई सुभेदार अशी वागणूक केंद्र सरकारच्या माध्यमातून केली जात आहे. शिवसेना हे सहन करणार नाही. मुंबई विमानतळाचे मुख्यालय हे मुंबईतच राहील, यासाठी शिवसेना आक्रमक राहील, असा इशारा विनायक राऊत यांनी दिला.

संबंधित बातम्या :

मुंबई आंतराराष्ट्रीय विमानतळाचे व्यवस्थापन अदानींकडे, मराठी तरुणांसाठी मनसेची बॅनरबाजी

Pegasus Spyware : एक-दोन मीडिया हाऊसला चायनीज फंडिंग, देवेंद्र फडणवीसांचा मोठा आरोप

Sachin Sawant criticizes BJP over relocation of Mumbai airport headquarters to Ahmedabad