मुंबई महापालिकेच्या 82 हजार कोटींच्या ठेवी अभासी! प्रत्यक्षात महापालिकेच्या तिजोरीत खळखळाट, काँग्रेसचा दावा

| Updated on: Oct 19, 2021 | 1:13 PM

मुंबईकरांच्या नागरी कामाच्या फाईल्स निधी अभावी पडून असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. ऑगस्ट 2021 च्या आकडेवारीनुसार मुंबई महापालिकेच्या ठेवींचा आकडा 82 हजार 410 कोटी रुपये सांगण्यात आला आहे.

मुंबई महापालिकेच्या 82 हजार कोटींच्या ठेवी अभासी! प्रत्यक्षात महापालिकेच्या तिजोरीत खळखळाट, काँग्रेसचा दावा
मुंबई महापालिका
Follow us on

मुंबई : मुंबई महापालिकेच्या 82 हजार कोटी रुपयांच्या ठेवी असल्याचं सांगितलं जातं. पण या ठेवी केवळ अभासी आहेत. प्रत्यक्षात महापालिकेच्या तिजोरीत खळखळाट असल्याचा दावा मुंबई महापालिकेतील काँग्रेसचे नेते रवी राजा यांनी केलाय. मुंबईकरांच्या नागरी कामाच्या फाईल्स निधी अभावी पडून असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. ऑगस्ट 2021 च्या आकडेवारीनुसार मुंबई महापालिकेच्या ठेवींचा आकडा 82 हजार 410 कोटी रुपये सांगण्यात आला आहे. (Ravi Raja claims that Mumbai Municipal Corporation’s deposits of Rs 82,000 crore are virtual)

यंदा 9 हजार कोटीच्या ठेवी जमा झाल्या. पण महापालिकेनं 5 हजार कोटी रुपयांचा वापर इतर कामासाठी केल्यानं यंदा प्रत्यक्षात 3 हजार कोटींच्याच ठेवी ठेवण्यात आल्या. त्यामुळे यंदा महापालिकेच्या मुदत ठेवीची रक्कम वाढली नसल्याचं रवी राजा यांनी म्हटलंय. महापालिका आता 82 हजार कोटींच्या ठेवी असल्याचं सांगत आहे. पण प्रत्यक्षांत यातील 50 हजार कोटीच्या ठेवी या कर्मचारी निधी आणि मोठ्या प्रकल्पांच्या ठेवी आहे. त्यामुळे केवळ 30 हजार कोटी रुपये महापालिका वापरु शकते. महापालिकेनं यंदा ठेवीतील 5 हजार कोटी रुपये हे कोरोना काळात वापरले, पण त्याचा हिशेब दिला पाहिजे. गेल्या दोन वर्षात पालिकेनं उत्पन्नाचे स्त्रोत वाढवले नसल्यानं महापालिकेची आर्थिक स्थिती नाजुक बनत चालल्याचंही रवी राजा यांनी म्हटलंय.

भाजप नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात- यशवंत जाधव

मुंबई महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे. डिसेंबरमध्ये मुंबईत राजकीय भूकंपाचे संकेत जाधव यांनी दिले आहेत. भाजपचे 15 ते 20 नगरसेवक शिवसेनेते प्रवेश करणार आहेत. पक्ष नेतृत्वाच्या मनमानी कारभाराला कंटाळलेले नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा यशवंत जाधव यांनी केला आहे.

‘मी एक सांगतो आहे की, मुंबई महापालिकेत असलेले भाजपचे काही नगरसेवक निश्चितपणे त्यांच्या नेतृत्वाला कंटाळले आहेत. नेतृत्वाचा मनमानी कारभार, त्यांना कुठेही विचारात न घेणं, त्यांना डावलणं, यातून त्यांची निराशा होत आहे. परिणामी अशी मंडळी निश्चितपणे वेगळा विचार करत आहेत. त्याचा जो निकाल आहे तो डिसेंबरला मुंबई शहराला कळेल. भाजपची ही मंडळी शिवसेनेच्या संपर्कात आहेत. जे नेतृत्व आहे ते त्यांना जुमानत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्यावेळी त्यांनी शिवसेनेचा आधार वाटतोय’, असा दावा जाधव यांनी केलाय.

शिवसेनेचा फुसका बार, भाजपचा पलटवार

भाजपाचे नगरसेवक फुटणार हा शिवसेनेचा फुसका बार आहे आणि असे फुसके बार सोडण्याची त्यांची जुनी सवय आहे. आता त्यांचा पक्ष उपऱ्यांच्या जोरावर चालत असून बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना डावलले जात आहे. गेले 25 वर्षे युतीत असताना त्यांना जेव्हा जेव्हा उमेदवार सापडत नव्हते तेव्हा आम्ही त्यांना लोकसभेसाठी, विधानसभेसाठी आणि महापालिकेसाठी सुद्धा उमेदवार दिलेले आहेत. स्वबळावर लढण्याची भाषा करणाऱ्यांना महापालिकेतही सक्षम उमेदवार सापडत नसल्यामुळे भाजप नगरसेवक फोडण्याची भाषा करत आहेत, असा सणसणीत टोला भाजप नेते भालचंद्र शिरसाट यांनी लगावला आहे.

इतर बातम्या :

VIDEO: पंकजा मुंडेंकडे मध्यप्रदेशाची जबाबदारी, विधानसभा, लोकसभेचा प्रचार करणार

विद्यापीठांकडून महाविद्यालयांसाठी नियमावली जाहीर, उद्यापासून महाविद्यालये सुरु होणार

Ravi Raja claims that Mumbai Municipal Corporation’s deposits of Rs 82,000 crore are virtual