मुंबई पोलीस आयुक्तांनी केलेल्या 12 उपायुक्तांच्या बदल्यांना गृहमंत्र्यांची तीन दिवसात स्थगिती

| Updated on: Jul 05, 2020 | 6:34 PM

मुंबई पोलीस दलातील 12 उपायुक्तांची दोन जुलैला बदली करण्यात आली होती. (Mumbai Police DCP Transfer Stay by Home Minister)

मुंबई पोलीस आयुक्तांनी केलेल्या 12 उपायुक्तांच्या बदल्यांना गृहमंत्र्यांची तीन दिवसात स्थगिती
Follow us on

मुंबई : मुंबई पोलीस आयुक्तांनी केलेल्या मुंबईतील अंतर्गत बदल्यांना मुख्यमंत्री आणि गृह मंत्रालय कार्यालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटरवरुन दिली. मुंबई पोलीस दलातील 12 उपायुक्तांची दोन जुलैला बदली करण्यात आली होती. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर या बदल्यांना महत्त्व होते. (Mumbai Police DCP Transfer Stay by Home Minister)

डॉ. रश्मी करंदीकर, शंकर शिंदे, परमजीत सिंग दहिया, संग्रामसिंग निशाणदार, प्रशांत कदम, शहाजी उमप, मोहन दहीकर अशा 12 उपायुक्तांच्या बदलीचे आदेश गृह विभागाने गुरुवारी काढले होते, मात्र त्याला अवघ्या तीन दिवसात स्थगिती मिळाली आहे. याचे नेमके कारण अस्पष्ट आहे. आमच्या सरकारमध्ये कुठलेही मतभेद नाहीत, असे अनिल देशमुख यांनी सांगितले.

बदल्यांच्या मुद्द्यावर आधीच राजकारण तापले आहे. आधी आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलीवरुन हेवेदावे सुरु असताना आता पोलीस उपायुक्तांची बदली ऑर्डर आणि त्याला स्थगिती मिळाल्याने चर्चा सुरु झाली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी “दोन दिवसात डीसीपीच्या बदल्या थांबवून दाखवल्या” असे म्हणत ठाकरे सरकारला खिजवले.

खुद्द काँग्रेस नेते संजय निरुपम यांनीही सरकारला घरचा आहेर देण्याची प्रथा कायम ठेवली आहे. “गृह मंत्रालयाने 2 जुलै रोजी 10 डीसीपींची बदली केली होती. आज रद्द केली. का? कोणतेही कारण दिले गेले नाही. राज्य प्रशासनाच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे. महाराष्ट्राच्या नवीन सरकारचे हे ‘नवीन नॉर्मल’ आहे” असा टोला निरुपम यांनी लगावला.