मुंबई | 27 ऑगस्ट 2023 :सामनाच्या रोखठोक सदरातून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाष्य करण्यात आलं आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या आत्महत्या प्रकरणावरही सामनात भाष्य करण्यात आलं आहे.फसवाफसवीचे नवे बुद्धिबळ, हिंदुत्व कोणी शिकवायचे? या शीर्षकाखाली आजचं सामनाचं रोखठोक सदर प्रसिद्ध झालं आहे. रिझर्व्ह बँकेने भाजपच्या मर्जीतील पन्नास कर्जबुडव्यांची हजारो कोटींची कर्जे माफ केली, पण एका नितीन देसाईने कर्ज फेडता येत नाही म्हणून आत्महत्या केली, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.
महाराष्ट्रासह संपूर्ण देश फसवाफसवीच्या बुद्धिबळात अडकून पडला आहे. रिझर्व्ह बँकेसह सर्व राष्ट्रीय यंत्रणांवर एका गटाचा कब्जा आहे. रिझर्व्ह बँकेने भाजपच्या मर्जीतील पन्नास कर्जबुडव्यांची हजारो कोटींची कर्जे माफ केली, पण एका नितीन देसाईने कर्ज फेडता येत नाही म्हणून आत्महत्या केली. लोकसभा निवडणुकीत हिंदुत्व, लव्ह जिहादसारखे विषय येतील, पण हिंदुत्व शिकवणारी आजची घराणी मोगलांची मांडलिक होती. आज ही सर्व घराणी भाजपात आहेत.
भारतीय जनता पक्षाचे एक खासदार व अभिनेते सनी देओल यांनी बँकांचे 56 कोटींचे कर्ज थकवले. त्यामुळे त्यांच्या जुहू येथील बंगल्याचा लिलाव पुकारण्यात आला. पण बँकेने पुढच्या चोवीस तासांत तांत्रिक कारण देत लिलाव रद्द केला. त्याआधी पंधरा दिवसांपूर्वी कला दिग्दर्शक नितीन देसाई यांना आत्महत्या करावी लागली. बँकांचे कर्ज डोक्यावर असल्याने त्यांच्या ‘एनडी’ स्टुडिओवर जप्तीची कारवाई सुरू झाली. त्या धक्क्यातून देसाई यांना आत्महत्येचा मार्ग स्वीकारावा लागला. कर्ज बुडवणाऱ्यांना अभय दिले जाते, पण ते भारतीय जनता पक्षाच्या आतल्या गोटातील असतील तर. नितीन देसाईंचे प्राणही वाचवता आले असते. श्री. राहुल गांधी हे सरकारच्या आर्थिक घोटाळ्यावर मोदी सरकारला प्रश्न विचारतात तेव्हा सरकार निरुत्तर होत असते. गांधी यांनी लोकसभेत 2020 साली देशातील 50 प्रमुख ‘विलफुल डिफाल्टर्स’ म्हणजे कर्ज बुडव्यांबाबत प्रश्न विचारले, पण सरकारने उत्तर देण्यास नकार दिला.
त्यानंतर श्री. साकेत गोखले यांनी माहितीच्या अधिकारात रिझर्व्ह बँकेकडून कर्जबुडव्यांचा तपशील मागितला. त्यानुसार 50 कंपन्या व व्यक्तींची यादी देण्यात आली. जैन इन्फ्रा प्रोजेक्ट लिमिटेड या कंपनीला 1073 कोटींची कर्जमाफी देण्यात आली. शिवाय इतर 50 कंपन्यांनाही हजारो कोटींची कर्जे माफ केली. एकेका कंपनीचे किमान 500 कोटींचे कर्ज माफ करून जणू मलिदाच वाटला. या सर्व कंपन्या व त्यांचे मालक, भागीदार हे भाजपच्या नात्यागोत्यातील आहेत, पण नितीन
देसाई यांना शंभर-सव्वाशे कोटींसाठी आत्महत्या करावी लागली. मराठी माणसाने हे विसरता कामा नये.
सध्या आपल्या देशात फसवाफसवीचे जोरदार बुद्धिबळ सुरू आहे. भारतीय जनता पक्षाच्या ‘वाशिंग मशीन वर बोलायचे तरी किती, असा प्रश्न आता पडला आहे. लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तशा केंद्रीय तपास यंत्रणा अधिक आक्रमक व हिंसक बनताना दिसत आहेत. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीने समन्स पाठवले आहे.
छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या निकटवर्तीयांवर तपास यंत्रणांनी धाडी टाकल्या आहेत. ममता बनर्जी यांचे खासदार भाचे अभिषेक बानर्जी यांच्या जवळच्या लोकांवर नव्याने धाडी पडल्या, तरी यापैकी कोणीही भाजपला शरण जायला तयार नाही. अशा शरणागतीचे प्रकार फक्त महाराष्ट्रात झाले. दिल्लीपुढे न झुकणाऱ्या महाराष्ट्राला हे लांच्छन काही लोकांनी लावले. या मराठी नेत्यांच्या मदतीने आता महाराष्ट्र लुटला जात आहे.
ईडी, इन्कम टाक्सचे लोक सत्तेचा कसा गैरवापर करीत आहेत ते छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सांगितले. छत्तीसगडमधून भारतीय जनता पक्ष बघेल यांनी हद्दपार केला. आता भाजपच्या जागी त्यांच्या केंद्रीय नेतृत्वाने ‘ईडी’ आणि ‘इन्कम टाक्स वाल्याना उतरवले आहे, असे श्री. बघेल म्हणतात. उत्तर प्रदेशात खाण माफियांनी हैदोस घातला आहे. बेकायदेशीरपणे सर्व चालले आहे, पण झारखंडमधील ‘खाण’ व्यवहाराची चौकशी करण्यासाठी ईडी तेथे घुसली आहे. ‘ईडी’चे संचालक संजय मिश्रा है कर्तव्यकठोर खरेच असतील तर त्यांनी भाजप वाशिंग मशीनमधून आलेल्या सर्व ‘ईडी’ वीरांच्या कारवाईस चालना द्यायला हवी.
आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व सर्मा, महाराष्ट्रात अजित पवार, हसन मुश्रीफ, भावना गवळीपासून असे अनेक आहेत, ज्यांच्यावरील कारवाया ‘ईडी’ने भाजपच्या प्रवेशानंतर थांबवल्या. केंद्रीय तपास यंत्रणांचे हे बेकायदेशीर कृत्य आहे. एका रात्रीत हे लोक ‘हिंदुत्ववादी’ आणि मोदीभक्त झाले व त्यांच्यावरील कारवाया थांबवल्या.