हे आघाडीचं सरकार, काँग्रेसचं सरकार आल्यावर वीजेचं बिल माफ करणार, नाना पटोलेंचं सूचक विधान

| Updated on: Feb 18, 2021 | 6:32 PM

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडाऱ्यातील भाषणात वीज बिलाबाबत मोठी घोषणा केलीय.

हे आघाडीचं सरकार, काँग्रेसचं सरकार आल्यावर वीजेचं बिल माफ करणार, नाना पटोलेंचं सूचक विधान
नाना पटोले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
Follow us on

भंडारा : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडाऱ्यातील भाषणात वीज बिलाबाबत मोठी घोषणा केलीय. “शेती पंपाचं अर्धे बिल माफ केले जाईन. या अर्ध्या बिलातून वीजेसाठी पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील. हे आघाडीचं सरकार असून काँग्रेसचं सरकार आल्यावर वीजेचं बिल माफ करु,” असं मत नाना पटोले यांनी व्यक्त केलं. यावेळी त्यांनी आमचं सरकार असलं म्हणून आम्ही गप्प बसणार नाही, असंही नमूद केलं (Nana Patole announce that Congress Government will waive electricity bill in Maharashtra).

नाना पटोले म्हणाले, “शेती पंपाचे बिलं दुरुस्त केले जातील. शेती पंपाचं अर्ध बिल माफ करण्यात येईल. वीज बिलाच्या या अर्ध्या पैशात वीजेच्या पायाभूत सुविधा (इन्फ्रास्टक्चर) उभ्या केल्या जातील. काँग्रेसचं सरकार आल्यावर वीजेचं बिल माफ करु, आता आघाडीचं सरकार आहे. लॅाकडाऊनमध्ये आलेलं काही बिल माफ करावं, ही काँग्रेसची भूमिका आहे. आमचं सरकार असलं म्हणून आम्ही गप्प बसणार नाही.”

“भंडारा, गोंदियातील धान खान्यायोग्य नाही, असा केंद्र सरकारचा फतवा”

“विरोधकांकडून राज्य सरकारबद्दल विष पसरवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. त्यावर उत्तर देणं हे माझं काम आहे. भंडारा, गोंदियातील धान खान्यायोग्य नाही, असा फतवा केंद्र सरकारने काढला. त्यामुळे राईसमिलवाल्यांचा वाद निर्माण झाला. राज्य सरकारने राईसमिलवाल्यांना धान उचलण्याच्या सूचना दिल्यात. जे नुकसान होईल ते राज्य सरकार स्वीकारेल. रावसाहेब दानवे यांनी धान खरेदी टाळत ठेवली म्हणून धान खरेदीचा प्रश्न लांबला,” असंही नाना पटोले म्हणाले.

“काँग्रेसनं संविधान सांभाळलं म्हणून चहावाला देशाचा पंतप्रधान झाला”

नाना पटोले म्हणाले, “बाबासाहेबांनी दिलेलं संविधान काँग्रेसनं सांभाळलं म्हणून चहावाला देशाचा पंतप्रधान झाला. नाना पटोले काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष होऊ शकले. कोरोनासाठी ताटं वाजवायला लावले. त्याने कोरोना गेला का? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ताटं वाजवायला लावून देशात अवदसा आणली.

“26 जानेवारीला शेतकऱ्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न”

“शेतकऱ्यांना दिल्लीत येण्याला मनाई केली जात असेल, तर मग ही कसली लोकशाही आहे. 26 जानेवारीच्या घटनेचा निषेध करायला हवा. लाल किल्ल्यावर झेंडा फडकवणारा भाजप आणि संघाचा माणूस होता. 26 जानेवारीला शेतकऱ्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला. 2 लोकांसाठी शेतकऱ्यांच्या विरोधात कायदे करण्यात आले,” असंही त्यांनी सांगितलं.

“मोदी सरकारच्या काळात अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चनची टिवटिव का बंद?”

नाना पटोले म्हणाले, “मनमोहन सिंग सरकारच्या वेळेत अक्षय कुमार आणि अमिताभ ट्वीट करायचे, मग आता त्यांची टिवटिव का बंद झाली? तेव्हा ‘कार घेऊन पण पेट्रोल टाकायला लोन घ्यावं लागेल’ असं ट्विट अमिताभने केलं होतं. आम्ही काळे झेंडे घेऊन लोकशाहीच्या माध्यमातून यांचा विरोध करणार आहोत. काँग्रेसची इज्जत वाचवण्यासाठी सेलिब्रिटींचा वापर केला नाही. लोकप्रियतेचा फायदा घेऊन देशातील जनतेला बरबाद करण्याचं काम होत असेल तर आम्ही विरोध करु. भाजप या सेलिब्रिटींवर दबाव आणत आहे.”

“सुशांत सिंग प्रकरणात 3 महिने राज्य सरकारची बदनामी, यात भाजपचा मोठा नेता”

“सुशांत सिंग प्रकरणात 3 महिने भाजपने राज्य सरकारची बदनाम केली. यात भाजपचा राज्यातील एक मोठा नेता अडकलाय. म्हणून सीबीआयने तो अहवाल दाबून ठेवला आहे. मोदींचा चार्ज काढण्यासाठी मी प्रदेशाध्यपदाचा चार्ज घेतलाय. नितीन गडकरींनी एक बंदर स्वस्तात विकलं. फास्ट टॅग सुरु झालं, त्यातंही भ्रष्टाचार आहे. दोन तीन दिवसांत मी यावर बोलणार आहे,” असा आरोपही नाना पटोले यांनी केला.

“आतापर्यंत मॅच फिक्सिंगचा कार्यकाळ खूप चालला, आता सर्वसामान्यांना न्याय मिळेल. देशाला स्वातंत्र्य काँग्रेस विचाराने मिळाले,” असंही पटोले यांनी सांगितलं.

हेही वाचा :

मोदींचा चार्ज काढण्यासाठी मी प्रदेशाध्यपदाचा चार्ज घेतला, नाना पटोले मैदानात

‘त्यांचा चेहरा लोकशाहीचा, आत्मा हुकूमशाहीचा आणि कृती परिवाराच्या सेवेची’, मुनगंटीवारांचा नाना पटोलेंवर निशाणा

अमिताभ बच्चन देशाचा आदर्श नाही, कॅनडाच्या अक्षय कुमारला भारतावर बोलण्याचा अधिकार काय? : राष्ट्रवादी

व्हिडीओ पाहा :

Nana Patole announce that Congress Government will waive electricity bill in Maharashtra