‘गरीबांना लुटायचे आणि उद्योगपती मित्रांचे खिसे भरायचे हा मोदींचा एक कलमी कार्यक्रम’, नाना पटोलेंचा घणाघात

| Updated on: Nov 10, 2021 | 5:47 PM

'केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यापासून गरिबांना लुटायचे आणि उद्योगमंत्री खिसे भरायचे हा एक कलमी कार्यक्रम सुरु आहे. याचाच परिणाम म्हणून देशात इंधनाचे दर गगनाला भिडले असून महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे', अशा शब्दात पटोलेंनी भाजपवर निशाणा साधलाय.

गरीबांना लुटायचे आणि उद्योगपती मित्रांचे खिसे भरायचे हा मोदींचा एक कलमी कार्यक्रम, नाना पटोलेंचा घणाघात
नाना पटोले, अतुल लोंढे
Follow us on

मुंबई : इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार टीका केलीय. ‘केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यापासून गरिबांना लुटायचे आणि उद्योगमंत्री खिसे भरायचे हा एक कलमी कार्यक्रम सुरु आहे. याचाच परिणाम म्हणून देशात इंधनाचे दर गगनाला भिडले असून महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे’, अशा शब्दात पटोलेंनी भाजपवर निशाणा साधलाय. (Nana Patole criticizes the central government and the BJP)

एकाबाजूला दरवाढ, महागाई आणि दुस-या बाजूला प्रचंड प्रमाणात वाढलेली बेरोजगारी व केंद्राचे शेतकरी विरोधी धोरण यामुळे गरीब, शेतकरी व सर्वसामान्यांचे जगणे कठिण झाले आहे. मोदी सरकारने कृत्रीमरित्या महागाई वाढवून देशातील जनतेची लूट चालवली आहे. याबाबत जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने 14 ते 19 नोव्हेंबरपर्यंत जनजागरण सप्ताह अभियान राबविण्यात येणार असून जेलभरो आंदोलनही करण्यात येणार असल्याची घोषणा पटोले यांनी केलीय.

‘केंद्र सरकारकडून गरीबांची लूट सुरु’

पटोले म्हणाले की, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार सातत्याने इंधनाचे दर आणि महागाई वाढवून देशातील गरीब मध्यमवर्गीय जनतेची लूट करत आहे. गेल्या एका वर्षात खाद्य तेलाच्या किंमती दुपटीने वाढल्या आहेत. इंधनाच्या किंमतीत एका वर्षात प्रति लिटर जवळपास 35 रूपयांची वाढ सरकारने केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी होत असताना देशात मात्र त्या दररोज वाढत आहेत. यूपीए सरकारवेळी 440 रुपयांना मिळणारा एलपीजीगॅस आता 950 रुपयांपर्यंत महाग झाला आहे. उज्ज्वला योजनेच्या नावाखाली गरिबांची थट्टा केली जात आहे. उज्ज्वला योजनेत मोफत गॅसच्या नावाखाली गरिबांचे केरोसिन बंद केले आणि आता गॅस 950 रुपयांपर्यंत महाग केला, गेल्या 8 महिन्यात केंद्र सरकारने जवळपास 75 वेळा इंधन दरवाढ केली. पेट्रोल 110 रुपये, डिझेल 96 रुपये लिटर असून गॅसच्या किंमतीही सातत्याने वाढवून इंधनावरील कररुपाने मोदी सरकारने सात वर्षात तब्बल 25 लाख कोटी रुपयांची नफेखारी करून जनतेचे आर्थिक शोषण चालवले आहे.

’14 ते 19 नोव्हेंबरपर्यंत जनजागरण अभियान’

या कृत्रीम दरवाढीविरोधात काँग्रेस पक्षाने वारंवार रस्त्यावर उतरून आंदोलने केली आहेत. पण जनतेचे रक्त शोषून उद्योगपती मित्रांचे खिसे भरण्यात मग्न असलेल्या मोदी सरकारला सर्वसामान्य जनतेच्या हालआपेष्ठा दिसत नाहीत. मोदी सरकारच्या या लोकविरोधी धोरणाबाबत जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती दिनापासून म्हणजेच 14 ते 19 नोव्हेंबरपर्यंत जनजागरण अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियाना अंतर्गत काँग्रेस पक्षाचे नेते, मंत्री, आमदार, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी कार्यकर्ते प्रत्येक शहरात आणि गाव खेड्यात लोकांच्या घरी जाऊन त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन गावात मुक्काम करून लोकांशी संवाद साधतील. केंद्र सरकारने इंधनदरवाढ करून महागाई कशी वाढवली आहे याची माहिती लोकांना देतील. या सर्व कार्यक्रमाची माहिती प्रदेश काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडल्सवरून उपलब्ध करून दिली जाईल आणि जनजागृतीसाठी सोशल मीडियाचाही वापर केला जाईल असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

‘भाजपकडून महाराष्ट्राची बदनामी सुरु’

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि एक मंत्री यांच्यात आरोप प्रत्यारोपांचा सामना चाललेला आहे. दोन्ही नेते जबाबदार पदावर आहेत. त्यांनी एकमेकांवर अंडरवर्ल्ड, दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे आरोप केले आहेत. यातून महाराष्ट्राची बदनामी सुरु आहे. त्यांनी आपल्या आरोपांचे पुरावे द्यावेत. काँग्रेस पक्षासाठी इंधन दरवाढ, वाढती महागाई , बेरोजगारी, शेतक-यांचे प्रश्न हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. आम्ही हे मुद्दे घेऊन आम्ही जनतेमध्ये जाऊन जनजागृती करून केंद्रातील मोदी सरकारविरोधात आंदोलन करणार आहोत.

‘भाजपकडून एसटी कर्मचाऱ्यांचा वापर सुरु’

एसटी कर्मचाऱ्यांचा संप सामोपचाराने मिटला पाहिजे. सणासुदीचे दिवस आहेत सर्वसामान्य जनतेला संपाचा त्रास होऊ नये ही सुरुवातीपासून काँग्रेस पक्षाची भूमिका राहिली आहे. सरकारने एसटी कर्मचा-यांच्या महागाई भत्ता, पगार यात वाढ करून त्यांच्या मागण्याही मान्य केल्या आहेत. पण भाजप नेते एस टी कर्मचाऱ्यांची दिशाभूल करत आहेत. आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी भाजप एसटी कर्मचाऱ्यांचा वापर करत आहे, असा आरोपही पटोले यांनी केलाय.

इतर बातम्या :

‘फडणवीसांच्या काळात मुनगंटीवारांकडे गेल्यावर हाकलून दिलं होतं’, एसटी कर्मचारी आंदोलनावरुन राऊतांचा भाजपवर पलटवार

एस.टी.कर्मचाऱ्यांचा संप चिघळतोय, फडणवीसांनी सरकारला मार्ग सांगितला? सरकार करणार का?

Nana Patole criticizes the central government and the BJP