“शिवसेना-भाजपमधील वाद राजकारणाचा भाग, ते घरात एकत्र बसून जेवणही करु शकतात”

| Updated on: Aug 26, 2021 | 5:08 PM

अंतराराष्ट्रीय हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनी मोठं वक्तव्य केलंय. महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपमधील तणाव हा राजकारणाचा भाग आहे. हे सगळं चालू राहतं. ते घरात एकत्र जेवणही करु शकतात, असं प्रवीण तोगडिया यांनी म्हटलंय.

शिवसेना-भाजपमधील वाद राजकारणाचा भाग, ते घरात एकत्र बसून जेवणही करु शकतात
प्रवीण तोगडिया, उद्धव ठाकरे, नारायण राणे
Follow us on

नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटक आणि जामीनावरुन झालेलं राजकारण संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं. या मुद्द्यावरुन राज्यात सध्या शिवसेना विरुद्ध भाजप असं चित्र पाहायला मिळतंय. मात्र, याबाबत बोलताना अंतराराष्ट्रीय हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनी मोठं वक्तव्य केलंय. महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपमधील तणाव हा राजकारणाचा भाग आहे. हे सगळं चालू राहतं. ते घरात एकत्र जेवणही करु शकतात, असं प्रवीण तोगडिया यांनी म्हटलंय. तसंच देशातील विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांचा मुद्दा उचलून धरावा, देश हिताचा मुद्दा उचलेल त्या पक्षाचा आम्ही उदो उदो करु, असं तोडगिया यांनी म्हटलंय. (Praveen Togadiya’s comment on BJP-ShivSena dispute in Maharashtra)

भारताला तालिबानचा सर्वात मोठा धोका आहे. कारण तालिबानी विचाराचं केंद्र भारत आहेत. तालिबानला तोंड देण्यासाठी भारत सरकारने तबलिकी जमात, दारुल देवबंद, जमायते उलेमा हिंद या संघटनेवर बंदी घालायला हवी. नागपुरातील मदरशांमध्ये मौलवी तबलिकी जमातचं प्रशिक्षण देत आहेत. अफगाणिस्तानातील एकाही मुस्लिमाला भारतात स्थान नको, फक्त शिखांना राहू द्या, अशी मागणीही त्यांनी केलीय. राम मंदिराचे हिरो तिनच आहेत ते म्हणजे अशोक सिंघल, बाळासाहेब ठाकरे आणि कल्याण सिंग, असंही तोगडिया यांनी म्हटलंय.

राणे-ठाकरे वादावरुन सदाभाऊंचा काँग्रेस-राष्ट्रवादीला टोला

भाजप आणि शिवसेनेच्या भांडणात काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन कोल्हे मजा बघत आहेत. दोघांच्या भांडणात दुसराच कोल्हा स्वत:चे हित साधत आहे. भाजप-सेना एकत्र येऊ नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न आहे, असा गंभीर आरोपही यावेळी खोतांनी केलाय. शरद पवार यांनी तर बाळासाहेब ठाकरे यांना अटक करण्याची तयारी केली होती, अशी खोचक टीकाही खोत यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर केलीय. तसंच अनिल परब यांसारख्या बुद्धिजिवी माणसानं असं करणं योग्य नाही. आग भडकवण्यासाठी, भाजप शिवसेनेत दरी वाढवण्याचे काहींचे प्रयत्न सुरु आहेत, असा आरोपही खोत यांनी केलाय. महाराष्ट्रात यापूर्वी अनेक वक्तव्य केली गेली. मात्र, कधी दंगल झाली नाही. सरकार पुरस्कृत गोंधळ घातला गेला. राज्यातील जनतेचे प्रश्न बाजूला ठेवून वेगळे प्रश्न तयार करण्याची ही सुरुवात आहे. ही एकप्रकारची खेळी असल्याचा आरोपही खोत यांनी केला आहे.

बावनकुळेंचा शिवसेनेला इशारा

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरुन महाराष्ट्रात मोठा गदारोळ पाहायला मिळाला. शिवसैनिकांनी आक्रमक होत विविध शहरातल्या भाजप कार्यालयांवर हल्ले चढवले. कुठे दगडफेक झाली तर कुठे सेना-भाजप कार्यकर्ते भिडले. पुणे-नाशिक-अमरावतीच्या भाजप कार्यालयांवर सेनेचे कार्यकर्ते चाल करुन गेले. याच आक्रमक सेना कार्यकर्त्यांना भाजपनेही तोडीस तोड प्रत्युत्तर देण्याचं ठरवलं आहे. आता जर भाजपच्या कार्यालयावर हल्ला झाला तर ‘ईट का जवाब पत्थर से देंगे’, अशी आक्रमक भूमिका भाजप नेते आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली आहे.

संबंधित बातम्या :

काहींचं राजकीय पर्यटन सुरू, जुने व्हायरस परत आलेत, त्यांचा बंदोबस्त करायचाय; मुख्यमंत्र्यांचा सूचक इशारा

भाजपच्या पोकळ धमक्यांना राज्यातील कुठलाही नेता घाबरत नाही; नवाब मलिकांनी सुनावले

Praveen Togadiya’s comment on BJP-ShivSena dispute in Maharashtra